02/06/2026
जनगणना २०२७ : आयुक्त श्री. नवल किशोर राम यांची आढावा बैठक; १४ जूनपूर्वी शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे निर्देश
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी आज अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा येथे जनगणना अधिकारी, चार्ज अधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन जनगणना कामकाजाची सविस्तर समीक्षा केली. यावेळी जनगणना प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रलंबित कामे तसेच नागरिकांपर्यंत पोहोचताना निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
जनगणना २०२७ हे राष्ट्रनिर्मितीचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य असून ते वेळेत, अचूक आणि प्रभावीपणे पूर्ण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी मा. आयुक्तांनी नमूद केले. त्यांनी जनगणना अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक प्रभागातील जनगणना कामकाजाच्या प्रगतीचा दररोज आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. क्षेत्रीय स्तरावर उद्भवणाऱ्या अडचणींची नोंद करून त्यावर तातडीने उपाययोजना करणे, नागरिकांना जनगणनेचे महत्त्व समजावून सांगून त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे, तसेच जनगणना नोंदी अचूक, पारदर्शक आणि त्रुटीरहित राहतील याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी मा. आयुक्तांनी जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य असल्याचे सांगत त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी जबाबदारीने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन केले. दि. १४ जूनपूर्वी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून जनगणना कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणेने एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनगणना कार्यात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नसून संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मा. आयुक्तांनी दिला. तसेच, ज्या प्रगणक (Enumerator) व पर्यवेक्षक (Supervisor) यांनी नेमून दिलेल्या कर्तव्यावर हजर राहण्यास टाळाटाळ केली किंवा जनगणना कार्यात सहकार्य केले नाही, त्यांच्याविरुद्ध जनगणना अधिनियम, १९४८ अन्वये फौजदारी कारवाई करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश संबंधित कार्यालय प्रमुखांना देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एका सहाय्यक आयुक्त तथा चार्ज अधिकाऱ्यांकडून जनगणना कामकाजात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. जनगणना कार्यात शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबिले जाणार असून जबाबदारी टाळणाऱ्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
जनगणना प्रक्रियेदरम्यान नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून नागरिकांनी प्रगणकांचे ओळखपत्र तपासून त्यांना अचूक, संपूर्ण आणि वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. अचूक जनगणना ही भविष्यातील विकास आराखडे, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि कल्याणकारी योजनांच्या प्रभावी नियोजनासाठी अत्यावश्यक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या प्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. उपायुक्त श्री. विजय लांडगे, मा. उपायुक्त श्रीमती आशा राऊत, मा. उपायुक्त श्री. विजयकुमार थोरात, मा. उपायुक्त श्री. अरविंद माळी, मा. उपायुक्त श्री. तुषार बाबर, तसेच सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त, अधिकारी, कर्मचारी आणि सुमारे ५०० पर्यवेक्षक व प्रगणक उपस्थित होते.
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE
#जनगणना२०२७ #पुणे #विकासाचापाया Census India 2027