24/08/2026
महाराणी येसूबाई फाउंडेशनने जि. प. शाळेला दिले सीसीटीव्ही महाराणी येसूबाई फाउंडेशनच्या वतीने क्षेत्र माहुली सातारा जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेरा भेट दिल्यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काळजी घेतली आहे.
संगममाहुली गावच्या मातीला इतिहासाचा समृद्ध वारसा आणि परंपरेचा वसा लाभला आहे. याच ऐतिहासिक भूमीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून महाराणी येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजेशिर्के यांनी सीसीटीव्ही यंत्रणा देण्याचा शब्द पाळला आहे. या उपक्रमातून दानशूरपणाची परंपरा जपण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.
फाउंडेशनचे हे कार्य चिरंतन स्मरणात राहील, असे गौरवोद्गार सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बिल्ले यांनी काढले.
सातारा तालुक्यातील संगममाहुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराणी येसूबाई फाउंडेशनच्या वतीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महाराणी येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहासराजे शिर्के, ‘मास’चे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, इतिहास अभ्यासक निलेश पंडित. बंटीराजे भोसले. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने, दिलीपराव गायकवाड, शिक्षिका हेमा ढाणे, शारदा कांबळे, रोहिणी जगताप, रूपाली ननावरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन ढवळे, महिला पोलीस जयश्री सुतार, कावेरी साळुंखे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
गुन्हेगारीला वचक ठेवण्यासाठी सी.सी.टी.व्ही. काळाची गरज निर्माण झालेली आहे. “महाराणी येसूबाई फाउंडेशनच्या वतीने शाळेच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे देण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. या शाळेला सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची फाउंडेशनने गरज पूर्ण केली आहे. आजच्या काळात समाजात विविध प्रकारची गुन्हेगारी वाढत आहे. गुन्हेगारीला वचक ठेवण्यासाठी तसेच गुन्हा घडू नये यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरते.”
“माणसाची साक्ष किंवा जबाब बदलू शकतो; मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली घटना बदलता येत नाही. त्यामुळे अनेकदा न्यायालयीन प्रक्रियेतही सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शाळांमध्ये ग्रंथालयांची गरज अधोरेखित करत पोलीस अधिकारी बिल्ले यांनी दानशूर व्यक्तींनी सातारा जिल्हा परिषद शाळांना पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले. “आजच्या मुलांनी अधिकाधिक पुस्तके वाचली पाहिजेत. मुलांना चांगली पुस्तके उपलब्ध करून दिली तर त्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यास मदत होईल. पुस्तकांमधून मुलांचे ज्ञान, विचार आणि कल्पनाशक्ती विकसित होते,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी शाळेतील आपल्या जुन्या आठवणीही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जाग्या केल्या.
फाउंडेशनचे संस्थापक श्री सुहास राजेशिर्के म्हणाले, “संगममाहुली या गावाशी आमचे एक वेगळे आणि भावनिक नाते आहे. महाराणी येसूबाई यांचे पार्थिव याच मातीत दफन करण्यात आले होते. शिरकाई देवीची कृपा आणि महाराणी येसूबाई यांच्या त्यागाची प्रेरणा घेऊन या शाळेला सीसीटीव्ही देण्याचा विचार मनात आला आणि दिलेला शब्द पूर्ण करणे हे माझे आद्य कर्तव्य मानले.”
“या शाळेतून उद्याच्या महाराणी येसूबाई आणि शाहू महाराजांसारखी कर्तृत्ववान पिढी घडणार आहे. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मुलांना सुरक्षित वातावरण मिळाले, तर त्यांच्या शिक्षणाला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला अधिक बळ मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांची उत्सुकता आणि प्रश्न ऐकून उपस्थित मान्यवरही अचंबित झाले. बिल्ले यांनी प्रत्येक प्रश्नाचे समर्पक उत्तर देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी महिला पोलीस जयश्री सुतार आणि कावेरी साळुंखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन ढवळे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ आणि मान्यवरांची उपस्थिती होती.