16/04/2026
लातूरच्या रंगभूमीचा शोमॅन !
आपण ज्या हलगीच्या ठेक्यावर ताल धरतोय ती आपल्याच वडीलांच्या अंतिम यात्रेत वजेतय, हे न कळणाऱ्या अजाणत्या वयात हरवलेलं पितृछत्र आणि घरोघरी राबून घरातली चार पोटं भरण्यासाठी कष्ट उपसणारे आईचे दोन हात. अशा टोकाच्या प्रतिकुलतेचे घाव झेलत एका कलाकार रुपी हिऱ्याला पैलू पडले. त्या हिऱ्याने लातूर, मराठवाडाच नव्हे तर मराठी रंगभूमिवर कलेची मुक्त उधळण करीत समोरच्या प्रत्येकाला आपल्या रंगात आणि प्रेमात अक्षरश: भिजवून टाकलं. हा स्वयंप्रकाशित हिरा म्हणजे लातूरचे सेवाव्रत्ती नाट्यकर्मी कल्याण वाघमारे. बाल कलाकार, अभिनेता, सिने कलाकार, नाट्य दिग्दर्शक अशा प्रवासानंतर जो सहवासात येणाऱ्या प्रत्येकाकडून 'गुरु' बनवला जातो आणि तरिही मित्रच राहतो.... सव्वाशे वर्षांचा वारसा असलेल्या आणि अनेक दिग्गज कलावंत देणाऱ्या लातूरच्या रंगभूमिचा खऱ्या अर्थाने 'शोमॅन' म्हणता येईल अशा कल्याण वाघमारे यांच्याविषयी...
एखाद्याच्या ठायी गुणवत्ता ठासून भरलेली असते, तो वारंवार ती सिध्दही करतो मात्र तो कायम दुर्लक्षितच राहतो. तरीही स्वत:ला सिद्ध करण्याच्या या कसोटीला सामोरे जाण्यास त्याच्या भाह्या वर सारलेल्याच असतात... कधीही हार न मानण्यासाठी. असंच काहीसं आयुष्य कल्याण वाघमारे यांचं आहे. जन्मापासून संघर्षाशी नातं असलेल्या कल्याण प्रभू वाघमारे यांनी बाल कलाकार ते नाट्य दिग्दर्शक असा प्रवास करण्यासाठी आयुष्य वेचलंय. आपल्या अभिनयाच्या वेडापायी अनेक संघर्ष, तडजोडी करत हा माणूस नटसम्राटाप्रमाणे उभा आहे... रंगमंचाच्या सर्व बाजुंना... कधी अभिनेता, कधी दिग्दर्शक, कधी प्रकाश योजना करत, कधी संगीत देत, कधी वेशभूषा करत, कधी मेकअप करत, कधी परिक्षक तर कधी प्रेक्षक म्हणून.
कल्याण वाघमारे यांना मी पहिल्यांदा भेटलो ते २००४च्या दरम्यान. लातूरात गुडीपाडव्याच्या पुर्व संध्येला होणाऱ्या चैत्रपल्लवी संगीतोत्सवात कल्याण वाघमारे आणि किरण माने या जोडगोळीने 'क' सादर केली तेव्हा. कल्याण-किरणची ती 'क' पाहुण कलेजा खल्लास झाला आणि दोन्ही कलाकार काळजात घर करून बसले. २००६ ला नागपुरला झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत कल्याण स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठाच्या टीमचे दिग्दर्शक होते. त्यांनी बसवलेल्या (तुमच्यातला मी)एकांकीका, प्रहसनाने महोत्सव गाजवला. विद्यापीठाच्या इतिहासात पहील्यांदा स्वारातीम विद्यापीठाला अभिनय विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. त्यानंतर २००७ ला मी विद्यापीठाच्या संघाचा भाग झालो आणि कल्याणच्या कर्तृत्वाचे कांगोरे समोर येत गेले. यासगळ्यात मलाही त्यांच्या दिग्दर्शनात 'टाळी' ही एकांकीका करण्याची संधी मिळाली. किरण माने यांनी ती लिहीली होती. किरण यांनी लिहावे आणि कल्याण यांनी दिग्दर्शित करावे. हा जणू अलिखित नियमच होता. या जोडीने लातूरच्या रंगमंचाला अनेक कलाकार दिले. कल्याण यांचा जास्त सहवास लाभला नाही मात्र त्यांच्याविषयी प्रचंड कुतुहल निर्माण झाले. पुढे पत्रकारीतेत आल्यावर कल्याण यांचा काहीसा संपर्क वाढला. या काळात त्यांनी अनेक नव्या - जुण्या कलाकारांची ओळख करून दिली आणि त्यांच्यावर लिहीण्याची विनंती केली. मात्र कधीही त्यांनी स्वत:वर लिहीण्यास सांगितले नाही.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे कल्याण वाघमारे यांचे अभिनयाप्रतीचे प्रेम शालेय जीवनापासूनचेच. टीव्हीवर येणाऱ्या 'फटीचर' या पंकज कपुरच्या मालिकेने आणि त्यांच्याशी मिळत्या-जुळत्या चेहरापट्टीमुळे ते प्रेम अधिक रुजले. पंकज कपूरच्या चेहऱ्यावरील वांग, खड्डे-खड्डे आणि आपल्या चेहऱ्यावरील वांग याचं नातं या बालमनाने जुळवले. यातच लातूर शहरात रोटरीच्या वतीने फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात कल्याण यांनी सहभाग घेतला. आपल्या आवडत्या कलाकाराचा वेश आणि आवडत्या 'फटीचर' मालिकेतील प्रसंग साकारायचे ठरवतो. यासाठी आवश्यक असणारा कोट एका नातेवाईकाकडून मागून आणला आणि बहिण उषा यांच्याकडून त्याला ठिगळं लावून घेतली. ऐन वेळी आवश्यक असणारा सहकलाकार आला नाही आणि कल्याणने त्याची भूमिकाही स्वत:च पार पाडली. या गोंधळात कुठेतरी खोचाटा लागून पाहुण्याकडून मागुन आणलेला कोट फाटला आणि समोर संकट उभे राहीले. आधी तर मागुन आणला आणि नंतर तो फाडला हे स्वाभीमानी आई केशरबाई यांना पटलं नाही आणि त्यांनी रागाच्या भरात कल्याणचे 'कल्याण' केले.
कल्याण वाघमारे यांचा शिक्षणाचा प्रवास नगर परिषद शाळेतून सुरू झाला. नंतर देशीकेंद्रमध्ये ४ थी पर्यंतचे शिक्षण घेतले आणि ५वी ते १० राजस्थान विद्यालयातून पुर्ण केले. इथेच थोरात सरांचे कलात्मक मार्गदर्षण लाभले . खऱ्या अर्थाने राजस्थानमध्येच त्यांना नाट्यक्षेत्राकडे हात घट्ट पकडून नेणारा 'किरण' भेटला. दहावी नंतर ११ वीला शाहु महाविद्यालयात प्रवशे घेतला आणि परिस्थितीशी झगडताना अभ्यासाशी जुळवून घेता आले नाही. इथूनच शैक्षणिक वनवास सुरू झाला. ११ वीत कल्याण नापास झाला.सगळ्या घडामोडीत अभिनय आणि नाटकाशी असलेली नाळ कायम घट्ट राहीली.
१९९५ ला संजय आयाचित हे 'रंगवेध'च्या माध्यमातून एक बालनाट्य बसवत होते. त्यात किरण माने आणि ओम शिंदे हे कल्याणचे शालेय मित्र काम करीत होते. त्यांच्याशी असलेल्या मैत्रीतून मग रिअरर्सलला जाणे वाढले आणि कल्याणमधील अभिनयाची गोडी अधिक वाढली. कल्याण यांचे रोज येणे आणि अभिनयाची आवड पाहुन संजय आयाचित यांनी कल्याणवर संगीत संयोजन पाहण्याची संधी दिली. संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आणि कल्याणला नवा हुरूप आला. मोठा भाऊ गंगाधर यांनी मग टेपही घेऊन दिला. तालीम छान झाली आणि स्पर्धेला पोहोचले. आयुष्यात पहील्यांदा पार्श्वसंगीत करायच होत. दोन अंकी नाटकादरम्यान संगीत देण्यासाठी ऐनवेळी संजय आयाचित बाजुला बसले तेंव्हा म्युझिकचा सेन्स आणि टायमिंग ही एक गोष्ट कल्याणला नाटकाबद्दल अधिक सजग करून गेली. नाटक केवळ पहायचं नाही तर ते जगावं लागतं, अंगात भिनवावं लागतं हे कल्याणच्या मनावर खोलवर बिंबलं. आणि मग 'कल्याण आणि नाटक' हे जणू समीकरणच बनले. कल्याण एवढा नाटक वेडा झाला की नाटकासाठी आईने त्याला घराबाहेरही काढले. पण तोपर्यंत नाटकाचं व्यसन कल्याणच्या नसानसात भीनलं होतं.
१९९७ कणकवलीला राज्य नाट्य शिबीर होणार होतं. ३० दिवसांचे हे निवासी शिबीर होतं. पण जायचं कसं? खरा प्रश्न होता हे कणकवली येतं कुठं? नंतर पैसे आणि बाकीचे प्रश्न तर होतेच. शिवाय घरून परवानगीची अडचण. तरीही कल्याण किरण आणि ओम सोबतीने तिथे गेले. स्व.डॉ.शशिकांत बऱ्हारणपूरकर तिथे मार्गदर्शक होते. ३० जणांसाठी हे शिबीर होतं.याच शिबिरात नाटकाचे अनेक तज्ञ मार्गदर्शक कल्याणला लाभले.त्याच शिबीरात कल्याणला स्वत:तील दिग्दर्शकाची जाणीव झाली. तिथून परत आल्यावर दुसऱ्यावर्षी १९९८ ला लातूरात शिबीर झालं. पहील्या शिबीराची शिदोरी सोबत होतीच. श्री भालचंद्र झा यात मार्गदर्शन करत होते. इथं झा यांच्या चित्रकथी या एकांकिकेत काम करण्याची संधी मिळाली
त्यानंतर रंगवेधच्या 'षंढ'मधून अभिनय केला.पावन वैद्य सरांच्या पॉकेट डायरीच्या चार पानावर ची ही नाट्यसंकल्पना... केवळ १२ शब्दांभोवती फिरणारं तब्बल सव्वा दोन तासांच हे नाटक होतं. निलेश केळकर यांनी ते दिग्दर्शीत केले होते. केळकर हे नाट्यप्रशिक्षक होते त्यांच्याशी षंढमधून सुत जुळले आणि त्यांच्या सोबत कल्याण ने मुंबई , अंधेरी, जळगाव, जयसिंगपूर इत्यादी ठिकाणी सहाय्यक म्हणून काम पाहिले दरम्यान लेखक-दिग्दर्शक-निर्माता एन. चंद्रा यांच्या मुलांसाठीच्या शिबिरात सहाय्यक म्हणून जाण्याचीही संधी मिळाली. मात्र दुर्दैवाने निलेश केळकर बेपत्ता झाले आणि मुंबईतील कवाडे बंद झाली. त्यानंतर कल्याणने परत लातूर गाठले. 'आणखी एक नारायण निकम' या रंगवेधच्या शेवटच्या नाटकात काम केलं पुढे रंगवेधही थांबली आणि २००२ पासून कल्याण खऱ्या अर्थानं पूर्णवेळ नाटकवाला बनला. दरम्यान बाळकृष्ण धायगुडे तात्यांच्या 'श्रमसाफल्य' नाट्यसंस्थेतून 'लाल मुंग्या चावत नसतात', 'गांधी कधी येणार' मधून वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या. 'कुलकर्णी व्हर्सेस देशपांडे'मधील भूमिकेसाठी चाहत्यांनी कल्याणसोबत फोटोग्राफही काढले आणि ऑटोग्राफही मागितले. 'अथ: माणूस जगान ह..या स्वतंत्र भाषाशैली असलेल्या नाटकातील'आंफी'या
भूमिकेसाठी राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचं रौप्य पदक मिळालं.तसेच कामगार स्पर्धेत ही अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं पुढं तात्यांच्या दिगदर्शनात कुमारी सौ कांबळे,देवा शपथ खरं सांगेन.., लाकूडतोड्याची गोष्ट अशा नाटकातील भूमिकेसाठी कामगार कल्याणच्या स्पर्धेतील अभिनयाचं पारितोषक मिळालं. त्यानंतर सलग पाच वर्षे अभिनयाची त्यातही दोन वेळा प्रथम कल्याण यांनी पटकावलं. याच काळात महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातून दिग्दर्शनाचा प्रवास सुरू झाला. स्नेह संमेलनासाठी 'तूझं ते माझं' हे नाटक बसवलं. मग राजर्षि शाहु महाविद्यालयासाठी अकांत तसेच तुमच्यातला मी , आभास की भास, उजेडफुला, प्रवास, टाळी, बाजार, चक्रव्यूह, ऐन आषाढात पंढरपुरात, तुझी जन्मठेप आशा कित्येक अनेक एकांकिका केल्या. नाटकाला पहीले पारितोषिक मिळाले.कल्याण यांनी दिगदर्शन केलेली नाटकं फ़ंदी, देवा शपथ खरं सांगेन, तू वेडा कुंभार ,शेवंता जिती हाय, तू यावं, यातला विनोद गांभीर्याने घ्यावा, अस्त ,मनाचिये गुंती कल्याण सांगतात की जेंव्हा लातूरातील नाट्यसंस्था थांबल्या. तेंव्हा या संस्थामध्ये पुढची फळी उभी राहीली नाही. आर्थिक अडचण हेही यामागचे कारण होतेच. मग कल्याण आणि काही नाट्यप्रेमींनी मिळून संडे थिएटर संकल्पना सुरू केली आणि अनेक कलावंत पुढे आले. जवळपास ५०० विद्यार्थी कलावंत म्हणून घडले आहेत. लातूरात युवक महोत्सवापूर्वी शिबीर आयोजित करण्याची प्रथा कल्याण यांनीच सुरू केली. ती आता शेजारच्या जिल्ह्यांतही पसरली आहे. मात्र युवक महोत्सवा पलिकडे लातूरात नाट्य चळवळ म्हणून काही अपवाद सोडले तर काहीच नाही. आता सांस्कृतिक मंत्री लातूरचे असल्याने त्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा,एखादी एकांकिका स्पर्धा, महोत्सव, नाट्यशिबीर लातूरात व्हाव असेही कल्याण यांना वाटते.
२००८ ला विवाह बंधनात अडकल्यानंतर 'ज्योती'ने कल्याणचं आयुष्य उजळलं. नवऱ्याची 'नाटकं' लक्षात आल्यानंतर ज्योती यांनी कल्याणला शक्य तेवढी मोकळीक दिली. दरम्यान संसारात महेश्वरी, ईश्वरी आणि ज्ञानेश्वरी या पणत्या उजळल्या या पणत्यांनी कल्याणच्या नाट्यवेडाला स्पॉटलाईटचा प्रकाश दिला. नवरा बाहेरगावी दोन दिवसांसाठी गेला की आठ दिवस येणार नाही हे गृहीत धरूनच ज्योती बॅग भरून ठेवतात. कल्याणच्या या नाट्य वेडाला ज्योती यांनीही नेहमी प्रोत्साहन दिले.
बदलत्या तंत्रानूसार कल्याण यांनीही आपल्या रंगमंचाचा परिघही मोठा केला. शॉर्टफिल्ममध्येही त्यांनी आपला ठसा उमटविला. त्यांनी २००९ साली दिग्दर्शित केलेल्या 'येस वूई कॅन'या शॉर्ट फिल्मला (वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल महाराष्ट्र सरकार ) सर्वोत्कृष्ट दिगदर्शनाचा द्वितीय पुरस्कारही मिळाला. जाहीरातींना व्हाईस ओव्हर देणे म्हणजेच आवाज देणे आणि व्हीडीओ शुटींग-एडीटींगच्या कामातही तरबेज बनले. आता हाच त्यांचा व्यावसाय झाला आहे. दरम्यानच्या काळात पवन वैद्य यांच्यामुळे 'येडा' नावाच्या सिनेमात प्रोडक्शन कंट्रोलर म्हणूनही काम केले. ईटीव्हीच्या क्राईम डायरी, अपराध अशा मालिकांमधूनही काम केले. 'पिक' या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन आणि स्क्रिन प्लेही कल्याण यांनी केले. ही शॉर्टफिल्मही बरीच गाजली. त्यानंतर 'अ फिल्मबाय सोमाजी गोमाजी कापसे'ही नुकतीच केलेली शॉर्टफिल्म लवकरच पहावयास मिळेल.दरम्यानच्या काळात पुणे एफटीआय च्या आगतिक या लघुपटात मुख्य भूमिकाही साकारली . तसेच 'जान तेरे नाम ' या नाटकाचे ५ व्यावसायिक प्रयोगहीझाले.
आयुष्यात अनेक संघर्ष करणाऱ्या कल्याणने लातूर व परिसरातील माझ्यासह अनेकांचे रंगमंचावर उभे राहण्याचे आणि अभिनयाचे स्वप्न पुर्ण केले आहे. नुकत्याच लातूरात चित्रित झालेल्या मुक्ता बर्वे अभिनीत 'Y'या चित्रपटासाठी स्थानिक कलाकारांची निवड करण्याचे काम त्यांनी केले.
एक मुलगा टीव्हीवरील मालिकेतील कलाकाराशी स्वत:त साधर्म्य पाहतो आणि आज तोच अनेकांना टीव्हीवर प्रत्यक्षात झळकावतो. स्वप्नवत अशीच कल्याण वाघमारे यांची कारकिर्द आहे. मात्र तरीही ते तेवढेच जमीनीवर आहेत. हीच तर मोठ्या कलाकाराची आणि माणसाची निशाणी असते. लातूरच्या रंगभूमीचा इतिहास जेव्हा केव्हा लिहीला जाईल तेव्हा तो कल्याण यांच्या नावाशिवाय कधीच पूर्ण होणार नाही. आज मोबाईल आणि समाज माध्यमांनी अनेकांच्या केलेला मंच उपलब्ध झाला आहे. मात्र रंगमंचाची महती कल्याण वाघमारे यांच्यासारख्यांनी आयुष्य वेचल्यानेच टिकून आहे. या नाटकाळलेल्या माणसाला त्रिवास सलाम!
किरण आयुष्यातला 'किरण'
कल्याण वाघमारे आणि किरण माने ही जोडगोळी लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी वरदानच ठरली. कल्याणसाठी किरण हा खऱ्या अर्थाने आयुष्याची वाट दाखविणारा किरण ठरला. किरण माने अभिनेते तर होतेच सोबतच त्यांच्या लेखणीने अनेक वास्तववादी एकांकीका, नाटकांना जन्म दिला. किरणने लिहावे आणि कल्याणने ते दिग्दर्शित करावे हा जणू नियमच. दोघांनी लातूरच्या नाट्यक्षेत्रात असंख्य प्रयोग केले. हं, पाषाणकर तूमचं काय चाललंय, क, गोची शाकुंतल, तुमच्यातला मी, टाळी, बाजार, कात असे अनेक प्रयोग या जोडीने सोबतीने केले. त्याशिवाय क, आकांत, कुलकर्णी व्हर्सेस देशपांडे, गोची शाकुंतल दोघांनी अभिनयही केला. गोची शाकुंतलचे तर ७० व्यावसायिक प्रयोग झाले. मात्र दुर्दैवाने किरणने मार्ग बदलला आणि ही हीट जोडी विलग झाली (तुटली नाही). किरण सोबत असता तर मी आणखी खूप समृद्ध असतो, हे कल्याण यांचे वाक्यच खूप काही सांगून जाते.
- रविकिरण गळगे,लातूर
-*दिपरत्न निलंगेकर सर यांच्या वॉलवरुन*