District Information Office, Raigad

District Information Office, Raigad Official page of District Information Office, Raigad

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातीलउच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सु...
04/06/2026

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु

रायगड-अलिबाग,दि.04 (जिमाका) :- राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतीगृहे सुरु करणे या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह, वाशी नवी मुंबई (व्ही. बिल्डिंग पहिला मजला, प्लॉट नंबर 7, सेक्टर 19 वी, वाशी नवी मुंबई) येथे सुरु झाले आहे.
सन 2026-27 पासून पुढे वसतिगृहासाठी विहित मुदतीत अर्ज करणाऱ्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देय राहील. तसेच, ज्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षाकरिता प्रवेश देय राहील. तद्नंतर या योजनेंतर्गत जागा रिक्त राहिल्यास पात्र विद्याथ्यांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश देय राहील. तथापि, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेताना 12 वी परीक्षेच्या अंतिम निकालाचे गुण विचारात घेण्यात येतील.
सन 2026-27 साठी अभ्यासक्रमनिहाय व जात प्रवर्गनिहाय रिक्त जागा दर्शविणारे विवरणपत्र पुढीलप्रमाणे आहे:-प्रवर्ग- इतर मागास वर्ग, एकूण आरक्षण 51 टक्के, प्रवर्ग- विमुक्त जाती व भटक्या जमाती, एकूण आरक्षण 33 टक्के, प्रवर्ग- विशेष मागास प्रवर्ग, एकूण आरक्षण 6 टक्के, प्रवर्ग- दिव्यांग , एकूण आरक्षण 4 टक्के, प्रवर्ग- अनाथ, एकूण आरक्षण 2 टक्के, प्रवर्ग- आर्थिक मागास प्रवर्ग (EWS), एकूण आरक्षण 4 टक्के.
शासन निर्णयातील सविस्तरअटी व शर्ती तसेच वसतिगृहाची अधिक माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग, जि.रायगड येथे उपलब्ध होईल.
000000

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या नाव आणि नियमावलीतील सुधारणाराय...
04/06/2026

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक
कल्याणकारी मंडळाच्या नाव आणि नियमावलीतील सुधारणा

रायगड-अलिबाग,दि.04 (जिमाका) :-शासनाच्या गृह विभागाकडील दि.20 मे 2026 चे शासन शुद्धीपत्रक आणि परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार, राज्यातील ऑटो-रिक्षा व मीटर्ड टॅक्सी चालक/मालकांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी स्थापित करण्यात आलेल्या कल्याणकारी मंडळाच्या नावात आणि नियमावलीत शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल जयंत चव्हाण यांनी दिली आहे.
या कल्याणकारी मंडळाचे नाव बदलून आता "धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ" असे करण्यात आले आहे. यापूर्वी या मंडळाचे सभासदत्व केवळ ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांपुरतेच मर्यादित होते. मात्र, जास्तीत जास्त वाहन चालकांना विविध सरकारी कल्याणकारी योजना व सुविधांचा लाभ मिळावा या उ‌द्देशाने शासनाने आता याच्या पात्रतेमध्ये मोठी सुधारणा केली आहे. नवीन नियमांनुसार, ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबतच, सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणारे आणि वैध 'बॅज' (Badge) व अनुज्ञप्ती (Driving License) धारक असलेले सर्व चालक या मंडळाचे सभासद होण्यासाठी पात्र ठरले आहेत.
सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांच्या अधिकृत बॅजधारक चालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पात्र चालकांनी जास्तीत जास्त संख्येने या कल्याणकारी मंडळाचे सभासद व्हावे.
000000

*रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक**जुईली महेंद्र दळवी यांचे नामनिर्देशन पत्र मागे**रत...
03/06/2026

*रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक*
*जुईली महेंद्र दळवी यांचे नामनिर्देशन पत्र मागे*

*रत्नागिरी, दि. 3 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी एकूण दाखल 6 उमेदवारांपैकी जुईली महेंद्र दळवी यांचे नामनिर्देशन पत्र आज मागे घेण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार 4 जून हा आहे.*
जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी 30 मे रोजी 1 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी आज श्रीमती दळवी यांचे नामनिर्देशन पत्र मागे घेतले.
000

रायगड जिल्ह्यात 01 जून अखेर 70 टँकरद्वारे पाणीपुरवठा73 गावे व 258 वाड्यांतील 1 लाख 31 हजार 99 नागरिकांना दिलासारायगड-अलि...
03/06/2026

रायगड जिल्ह्यात 01 जून अखेर 70 टँकरद्वारे पाणीपुरवठा
73 गावे व 258 वाड्यांतील 1 लाख 31 हजार 99 नागरिकांना दिलासा

रायगड-अलिबाग,दि.03 (जिमाका) :- जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दि.01 जून 2026 अखेर जिल्ह्यात एकूण 70 टँकर कार्यरत असून त्याद्वारे 73 गावे व 258 वाड्यांमधील 1 लाख 31 हजार 99 नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व टँकर खासगी स्वरूपातील असून शासकीय टँकर अथवा मदतीचे टँकर कार्यरत नाहीत. सर्वाधिक टंचाईग्रस्त परिस्थिती पेण तालुक्यात असून येथे 9 गावे व 76 वाड्यांसाठी 12 टँकर कार्यरत आहेत. या माध्यमातून 24 हजार 746 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
महाड तालुक्यात 14 गावे व 98 वाड्यांसाठी 9 टँकरद्वारे 27 हजार 620 नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. पनवेल तालुक्यात 10 गावे व 8 वाड्यांसाठी 9 टँकरद्वारे 18 हजार 553 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. कर्जत तालुक्यात 7 गावे व 21 वाड्यांसाठी 13 टँकर, खालापूर तालुक्यात 5 गावे व 9 वाड्यांसाठी टँकर 6, तर माणगाव तालुक्यात 4 गावे व 15 वाड्यांसाठी 5 टँकर कार्यरत आहेत.
याशिवाय अलिबाग तालुक्यात टँकर 3, उरण तालुक्यात 5 वाड्या टँकर 1, सुधागड-पाली तालुक्यात 2 वाड्या टँकर 1, रोहा तालुक्यात 3 गावे टँकर 1, पोलादपूर तालुक्यात 9 गावे व 17 वाड्या टँकर 3, म्हसळा तालुक्यात 6 गावे व 1 वाडी टँकर 5, तसेच श्रीवर्धन तालुक्यात 2 गाव व 6 वाड्यांना टँकर 2 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाईग्रस्त भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
00000000

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजनेंतर्गतशाळांनी प्रस्ताव सादर करावेतरायगड-अलिबाग,दि.03(जिमाका):- इतर...
03/06/2026

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजनेंतर्गत
शाळांनी प्रस्ताव सादर करावेत

रायगड-अलिबाग,दि.03(जिमाका):- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजनेंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.
धनगर समाजाच्या उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठी इंग्रजी माध्यमाचा वापर होत असल्यामुळे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नयेत तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी या समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, दि.04 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयान्वये धनगर समाजाच्या विद्याथ्यांना इंग्रजी मध्येमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे ही योजना सन 2019 पासून सुरु करण्यात आली आहे. तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दि.16 मे 2025 च्या शासन निर्णयान्वये धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेचे नाव राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना असे झाले आहे.
या योजनेंतर्गत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली पासून इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण देण्यास शासना मान्यता दिली आहे.
विद्यार्थी व शाळेकरीता या योजनेंत्तर्गत देण्यात येणारे लाभ पुढीलप्रमाणे आहेत :- नामांकित शाळेच्या नियमानुसार विद्यार्थ्यांसाठी रेनकोट, भोजन, निवास खर्च, ट्युशन फी, सुरक्षा अनामत, शिक्षण शुल्क इत्यादीसाठी देय रक्कम संबंधित नामांकित निवासी शाळेला देण्यात येईल. निवासी शाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षातून दोनादा पालकांना भेटण्यासाठी स्वग्रामी जाण्याकरिता प्रवास खर्च देण्यात येईल. तसेच वर्षातून दोनदा पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत येऊन भेटण्याकरिता प्रवास खर्च देण्यात येईल. सदरचे शुल्क, संबंधित विद्यार्थी इयत्ता 12 वी पास होईपर्यंत देय राहील (मात्र सदर विद्यार्थी दरवर्षी उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्याला नामांकित शाळेतून काढून टाकण्यात येईल.) तसेच प्रस्ताव प्राप्त झालेल्या शाळेस तपासणी करीता भेटी दिली जाईल व त्यानुषंगाने निकषांच्या आधारे गुणांकन करुन प्राप्त गुणानुसार शाळांना खालीलप्रमाणे शुल्क निर्धारीत करण्यात येतील. एकूण गुण-80 किवा त्यापेक्षा अधिक, प्रती विद्याथी मंजूर शुक्क (वार्षिक) रु.70000/- किंवा प्रत्यक्ष फी यापैकी जे कमी असेल ते.
एकूण गुण-70 ते 79, प्रती विद्याथी मंजूर शुक्क (वार्षिक)- रु.60000/- किवा प्रत्यक्ष फी यापैकी जे कमी असेल ते.
एकूण गुण-60 ते 69, प्रती विद्याथी मंजूर शुक्क (वार्षिक)- रु.50000/- किवा प्रत्यक्ष फो यापैकी जे कमी असेल ते. 60 पेक्षा कमी, प्रती विद्याथी मंजूर शुक्क (वार्षिक)- 60 पेक्षा कमी गुण प्राप्त झालेल्या शाळांचे प्रस्ताव अप्राप्त ठरतील.
विद्यार्थ्यांकरीता या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी धनगर समाजाचा असावा.. विद्यार्थ्यांच्या पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या धनगर समाजाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. सदर प्रतीची मूळ प्रमाणपत्रासोबत तपासणी करण्याकरीता उपलब्ध करण्यात यावे.. जर विद्यार्थी दारिद्रयरेषेखालील असेल तर त्यासंबंधीच्या यादीतील अनुक्रमांक नमूद करण्यात यावा. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकाच्या कुटुंबांची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु.1.00 लाख इतकी राहील.
तसेच विजाभज, इमाव व विमान कल्याण विभाग, शासन निर्णय दि.04 सप्टेंबर 2019 शासन निर्णयान्वये शाळाविषयक निकष व वसत्तिगृहविषयक निकष नमुद केल्या आहेत. तसेच सदरच्या योजनेची अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग, जि.रायगड येथे उपलब्ध होईल.
0000000

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया युनिट करीता अर्ज सादर करावेतरायगड-अलिबाग,दि.03(जिमाका):- कडधान्य पिकांच्या ...
03/06/2026

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया युनिट करीता अर्ज सादर करावेत

रायगड-अलिबाग,दि.03(जिमाका):- कडधान्य पिकांच्या मुल्यवर्धनास चालन देऊन शेकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने काढणीनंतरची पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास आर्थिक सहाय्य प्रदान करणे या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था FPO क्लस्टर स्तर महासंघ CLF प्राथमिक कृषी पतसंस्था PACS उद्योजक तसेच प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुक इतर पात्र व्यक्ती/संस्था यांना सहाय्यक देऊन कडधान्य मूल्यसाखळी अधिक कार्यक्षम व सक्षम करणे हा मुख्य उद्देश असून याकरिता इच्छूकांनी कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया युनिट करिता अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी केले आहे.
योजना- कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, बाब/घटक प्रक्रिया युनिट, पीक कडधान्य, अनुदान दर प्रकल्प खर्चाच्या 33 % किंवा जास्तीत जास्त रु. 25 लाख प्रति युनिट यापैकी जे कमी असेल ते.
पात्र लाभार्थी घटक-योजनेंतर्गत खालील घटकांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल, शेतकरी उत्पादक संस्थ (FPOs), क्लस्टर स्तर महासंघ (CLFs), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), वैयक्तिक अर्जदार, कोणत्याही अधिनियमांतर्गत नोंदणीकृत इतर उपक्रम
पात्रता निकष - गट लाभार्थी-संबंधित संस्था किमान मागील दोन वर्षांपासून विधिवत नोंदणीकृत व कार्यरत असावी. प्रकल्प खर्चाच किमान 15 टक्के रक्कम तसेच कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वत: उभारण्याची आर्थिक क्षमता असावी.
वैयक्तिक लाभार्थी-अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असावे. एका कुटुंबातील (स्वत: पती/पत्नी व अविवाहित मुले) केवळ एका व्यक्तीस आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येईल. प्रकल्प खर्चाच्या किमान 15 टक्के रक्कम तसेच कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वत: उभारण्याची आर्थिक क्षमता असावी, अनुसूचित जाती/जमाती, महिला, डोंगराळ क्षेत्रे व आकांक्षी जिल्हे यांना प्राधान्य असेल
अर्थसहाय्य प्रमाण-आर्थिक सहाय्य - प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल रु. 25.00 लाख प्रति युनिट (यापैकी जे कमी असेल ते) अनुदान केवळ यंत्र सामग्री खरेदी तसेच इमारत/गोदाम/ साठवण पायाभूत बांधकामासाठी दिले जाईल. जमीन वीज मनुष्यबळ इत्यादी खर्चासाठी अनुदान देय राहणार नाही. तसेच इमारत/गोदाम/साठवण पायाभूत सुविधा बांधकामासाठी दिले जाईल.
000000

03/06/2026

६ जून व २७ जून शिवराज्याभिषेक सोहळयास येणाऱ्या शिवभक्तांकरिता #रायगड जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी.
#शिवराज्याभिषेकसोहळा

हवामान अपडेट | IMDआज (२ जून) उष्ण व दमट वातावरणासह दुपारनंतर हलका पाऊस/मेघगर्जना होऊ शकते. ३ ते ५ जून रोजी विजांच्या कडक...
02/06/2026

हवामान अपडेट | IMD
आज (२ जून) उष्ण व दमट वातावरणासह दुपारनंतर हलका पाऊस/मेघगर्जना होऊ शकते. ३ ते ५ जून रोजी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस व ताशी ३०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. ⛈️⚡🌬️

शिवराज्याभिषेक सोहळा-2026 करिताजड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारीरायगड-अलिबाग,दि.02(जिमाका):- श्री शिवराज्याभिषेक...
02/06/2026

शिवराज्याभिषेक सोहळा-2026 करिता
जड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी

रायगड-अलिबाग,दि.02(जिमाका):- श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दि.05 जून रोजी सायं.4.00 ते दि.06 जून 2026 रोजी रात्रौ 10.00 वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा नागोठणे ते कशेडी पर्यत तसेच माणगांव-निजामपुर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावरील होणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतुक बंदी अधिसूचना जारी केली आहे.
श्री शिवराज्याभिषेक सोहळा-2026 हा कार्यक्रम दि.05 जून व दि.06 जून 2026 रोजी किल्ले रायगड येथे साजरा होणार आहॆ. या कार्यक्रमासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापुर, मुंबई वैगेरे ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने श्री शिवभक्त हे आपआपली वाहने घेवून येत असतात. तसेच या कार्यक्रमाकरीता आयोजकांच्या सामानाची वाहने देखील मोठ्या प्रमाणात श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येत असतात. या सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त हे रायगड किल्ला येथे माणगांव-निजामपुर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला असे जाण्याचे एकूण तीन मार्ग आहेत. या मार्गावरून शिवभक्त हे आपआपल्या वाहनाने मोठ्या संख्येने येत असतात. तसेच शासकीय यंत्रणा यांच्या वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. सदर शिवभक्तांची वाहने ही मुंबई-गोवा महामार्गावरून कशेडी घाट ते महाड, तसेच वाकणफाटा-नागोठणे-कोलाड-माणगांव-महाड या महामार्गावरून येत असतात. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची देखील प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असते अशावेळी अपघात, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कार्यकमाच्या वेळी कोठे ही वाहतुक कोंडी निर्माण होवू नये व श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता येणारे शिवभक्त यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी वाहतूक बंदी जाहीर केली आहॆ.
सदरची वाहतूक बंदी अधिसूचना ही दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिका या वाहनांना लागू राहणार नाही.
या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी दिले आहेत.
00000

अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजनरायगड-अलिबाग, दि.2(जिमाका):-...
02/06/2026

अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी
उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन

रायगड-अलिबाग, दि.2(जिमाका):- अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या "अमृत पर्यटन" उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम (Entrepreneurship Development Programme - EDP) आयोजित करण्यात आला आहे.
अमृत पर्यटन हा महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी, स्थानिक रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी तसेच पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील पर्यटन स्थळे, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने व पर्यटन व्यवसायांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून, या क्षेत्रात व्यवसाय विस्तार, रोजगार निर्मिती व आर्थिक प्रगतीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळावा आणि त्यांना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये प्राप्त व्हावीत, या उद्देशाने या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात Tour & Travels व्यवसायिक, Tourist Guides, Cook & Caterers, होमस्टे व रिसॉर्ट संचालक, पर्यटन सेवा पुरवठादार, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाशी संबंधित उद्योजक तसेच पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती सहभागी होऊ शकतात.
कार्यक्रमादरम्यान सहभागी उद्योजकांना व्यवसाय उभारणी व विस्तारासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रभावी व्यवसाय नियोजन, आधुनिक विपणन तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग, पर्यटन क्षेत्रातील नवीन व्यावसायिक संधी तसेच शासनाच्या विविध योजना व सहाय्याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
तसेच अनुभवी तज्ज्ञ व क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांकडून प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असून, सहभागी उद्योजकांना पर्यटन व्यवसाय अधिक प्रभावीपणे विकसित करण्यासाठी आवश्यक दिशा व मार्गदर्शन मिळणार आहे.
अमृत पर्यटन अंतर्गत पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमाचा लाभ पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व उद्योजक, व्यावसायिक आणि इच्छुक युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: अमृत रायगड जिल्हा कार्यालय, कलेक्टर ऑफिस परिसर, (भूसंपादन) उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, हिराकोट तलावासमोर, अलिबाग (9112228759/8149552143/ 8879278740)
00000000

Address

Collector Office Premises, Opp. Addl. Collector's Office, Near Hirakot Lake
Alibag
402201

Alerts

Be the first to know and let us send you an email when District Information Office, Raigad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to District Information Office, Raigad:

Share