Collector Raigad

Collector Raigad Shri Kishan N. Jawale, Collector & DM, Raigad (Official Account)

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहणरायगड-अलिबाग,(जिमाका)दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच...
01/05/2026

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उप वनसंरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र राठोड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नितीन वाघमारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीकांत गायकवाड, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुनिल इंदलकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी निलेश लांडगे, तहसिलदार (महसूल) चंद्रसेन पवार आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0000000

*रिमोट ऑपरेटिंग बोया ठरला देवदूत; काशीद समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोन पर्यटकांना जीवदान**रायगडअलिबाग, दि.29 (जिमाका) :* जिल...
29/04/2026

*रिमोट ऑपरेटिंग बोया ठरला देवदूत; काशीद समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोन पर्यटकांना जीवदान*

*रायगडअलिबाग, दि.29 (जिमाका) :* जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यामुळे आज काशीद समुद्रकिनारी एक मोठा अनर्थ टळला. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडणाऱ्या डोंबिवली येथील दोन पर्यटकांना 'रिमोट ऑपरेटिंग बोया'च्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. फुरकन शेख (वय २८) आणि कैफ शेख (वय २२) अशी या वाचवलेल्या पर्यटकांची नावे असून, हे दोघेही सध्या सुस्थितीत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवलीहून आलेले हे पर्यटक काशीद बीचवर पर्यटनासाठी आले होते. समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना अचानक दोघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल श्री.रोटकर आणि जीवरक्षक शिवम लाड यांनी तत्परता दाखवत परिस्थिती हाताळली.
विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून नुकत्याच आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झालेल्या अत्याधुनिक 'रिमोट ऑपरेटिंग बोया'चा वापर या बचावकार्यात करण्यात आला. या उपकरणाच्या अचूक वापरामुळे जीवरक्षकांना बुडणाऱ्या पर्यटकांपर्यंत वेगाने पोहोचणे शक्य झाले आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त झालेल्या निधीतून नुकतेच १२ एप्रिल २०२६ रोजी नागाव, काशीद आणि हरिहरेश्वर या वर्दळीच्या समुद्रकिनाऱ्यांसाठी या रिमोट ऑपरेटिंग बोयांचे वाटप करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या दूरदृष्टीमुळे उपलब्ध करून देण्यात आलेले हे तंत्रज्ञान पहिल्याच काही दिवसांत दोन व्यक्तींचे प्राण वाचवण्यासाठी मैलाचा दगड ठरले आहे. या यशस्वी बचावकार्यानंतर दोन्ही पर्यटकांना त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने पुढील वैद्यकीय उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संकटसमयी पोलिसांनी आणि स्थानिक जीवरक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0000000

*केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा*      *— खा.श्रीरंग बारणे**जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण स...
29/04/2026

*केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा*
*— खा.श्रीरंग बारणे*

*जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक संपन्न*

रायगड-अलिबाग,दि.29 (जिमाका) : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे. वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के लाभ मिळेल, यासाठी दक्षता बाळगावी, तसेच योजनांच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची सर्व संबंधित विभागांनी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले.
तर केंद्र शासनाच्या योजना राबविताना जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या किंवा निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित घटकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी दिल्या. योजनांची अंमलबजावणी करताना पारदर्शकता, गुणवत्तेची खात्री आणि वेळेचे नियोजन यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची आढावा बैठक खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या सहअध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली.
या बैठकीस आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका राजाकेणी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, लोकहिताच्या विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अधिक सजग राहून सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यावर भर द्यावा. योजनांच्या अंमलबजावणीत उदासीनता दूर करून त्या प्रभावीपणे राबविण्यासाठी सातत्याने आढावा घेणे गरजेचे आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची नियमित तपासणी करावी. पूर्ण झालेल्या योजनांमधून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत आहे की नाही, याची खातरजमा करून आवश्यक त्या दुरुस्त्या तात्काळ करण्यात याव्यात, असेही त्यांनी निर्देश दिले.
खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मंजूर रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. रस्ते बांधकामाच्या प्रस्तावांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कामे नियोजनबद्ध पद्धतीने राबविणे आवश्यक आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे केवायसी त्वरीत पूर्ण करावे तसेच सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे.
निसर्गचक्रामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ सर्वेक्षण करून त्यांना शासकीय योजनांद्वारे मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागांना दिले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सीएसआर निधीतून शाळांमध्ये आरओ यंत्रणा बसविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्ह्यात क्रीडा सुविधांचा विकास करण्यासाठी कुस्ती स्पर्धांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि अद्ययावत क्रीडा संकुलासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.
बैठकीत केंद्र शासनाचा लोककल्याणकारी निधी राज्य शासनामार्फत जिल्ह्यांना उपलब्ध होत असून या निधीचा नियमानुसार व पारदर्शकपणे वापर होणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. विविध योजनांच्या अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) कार्यरत असून, योजनांमध्ये येणाऱ्या अडचणी त्वरित सोडविण्यासाठी विभागांनी परस्पर समन्वय साधावा, असेही यावेळी सूचित करण्यात आले.
तसेच,लोकप्रतिनिधींनी आपल्या विभागातील सुरू असलेल्या कामांबाबत सूचना लेखी स्वरूपात सादर कराव्यात. ज्या ठिकाणी कामांमध्ये त्रुटी किंवा विलंब आढळून येईल, त्या प्रकरणांवर तातडीने कारवाई करून संबंधित जबाबदार घटकांना जबाबदार धरण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जल जीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, कृषी पायाभूत निधी योजना, डिजिटल इंडिया भूमी अभिलेख नूतनीकरण कार्यक्रम, प्रधानमंत्री फसल बीमा योजना (भात व नाचणी), हवामान आधारित फळपीक विमा योजना, ई-राष्ट्रीय कृषी बाजार योजना, एकात्मिक बाल विकास सेवा योजना तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आदी विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागांतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती सादर केली. योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा सुचविण्यात आल्या. तसेच नागरिकांना योजनांचा लाभ सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी केले.
000000

भ्रष्टाचार आणि दिरंगाईमुक्त प्रशासनासाठी कटिबद्ध राहा; रायगडला सेवा हक्क अंमलबजावणीत राज्यात आदर्श बनवूया— जिल्हाधिकारी ...
28/04/2026

भ्रष्टाचार आणि दिरंगाईमुक्त प्रशासनासाठी कटिबद्ध राहा; रायगडला सेवा हक्क अंमलबजावणीत राज्यात आदर्श बनवूया
— जिल्हाधिकारी किसन जावळे

रायगड, दि. २८ (जिमाका):
सामान्य नागरिकाला शासकीय सेवा मिळवताना होणारा मनस्ताप, विलंब आणि कागदपत्रांचा डोंगर आता इतिहासजमा होणार असून, रायगड जिल्ह्याला सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्यात अग्रक्रमांकावर नेण्याचा निर्धार जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी व्यक्त केला.
'सेवा हक्क दिना'चे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराची शपथ दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी जावळे यांनी प्रशासकीय मानसिकतेत बदलाची गरज अधोरेखित करताना स्पष्ट केले की, देशाला विकसित आणि समृद्ध करण्याच्या प्रवासात सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानणे अत्यावश्यक आहे. सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्यापेक्षा नागरिकांना घरबसल्या आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी कंबर कसण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेषतः सेतू केंद्रांमध्ये कामासाठी येणाऱ्या जनतेशी सौजन्याने वागून, त्यांना विनाकारण ताटकळत न ठेवता अनावश्यक कागदपत्रांची मागणी टाळावी, असे त्यांनी निर्देश दिले. ज्या विभागांची कामगिरी सध्या समाधानकारक नाही, त्यांनी तातडीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ मधील तरतुदींचा सखोल अभ्यास करून आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी. प्रत्येक विभागाची सेवा वितरणाची टक्केवारी ९८ च्या पुढे असणे आवश्यक असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा सुमार कामगिरी करणाऱ्या विभागांसाठी पाच हजार रुपयांच्या दंडाची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी देखील प्रशासकीय यंत्रणेला अधिक गतीमान होण्याचे आवाहन केले. शासकीय सेवा देताना केवळ औपचारिकता न पाळता त्या सेवा पात्र नागरिकांपर्यंत विहित मुदतीत पोहोचवणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व उत्कृष्ट सेवा वितरणाबद्दल काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये श्री. संतोष दराडे (सहा. पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा), श्री. मितेश विलास म्हात्रे (पोहेका/२३२०, जिल्हा विशेष शाखा), श्री. संतोष जनार्दन रूपनवर (पोहेका/१०७२, खोपोली पोलीस ठाणे), श्री. दिनेश कृष्णा भंडारे (पोहेका/११८०, खालापूर पोलीस ठाणे), श्रीमती मनीषा वामनराव जयभाये (ग्रामपंचायत अधिकारी, करंजाडे), श्री. विजय किसन अहिरे (ग्रामपंचायत अधिकारी, वरसे), श्री. वैभव बाळकृष्ण पाटील (ग्रामपंचायत अधिकारी, वारसावे), श्री. मुकेश पखाळ (उपविभागीय अधिकारी, अलीबाग), श्री. संदीप सानप (उपविभागीय अधिकारी, माणगाव), श्री. भंजनजय जाधव (तहसीलदार, कर्जत), श्रीमती राजश्री साळवी (महसूल नायब तहसीलदार, मुरुड) व श्री. भारत फुलमाळी (निवासी नायब तहसीलदार, सुधागड) यांचा समावेश होता.
या दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शपथेमध्ये, "मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, मला सुपुर्द केलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकतेने, निष्ठेने आणि संवेदनशीलतेने पार पाडेन," अशा शब्दांत कर्मचाऱ्यांनी आपली कटिबद्धता जाहीर केली.
आगामी वर्षभरात जिल्ह्याला 'स्मार्ट आणि लोकाभिमुख' सेवांचे मॉडेल बनवण्यासाठी महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषद यांसारख्या सर्व महत्त्वाच्या यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटनलोकसेवा हक्क दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी किसन जावळ...
28/04/2026

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन

लोकसेवा हक्क दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते वरसोली येथील आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले.
तसेच यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी (साप्र) रवींद्र शेळके, डी.सी. ओ. श्री तनपुरे, विस्तार अधिकारी एच कोकार्डे, श्री भगत, महसूल नायब तहसिलदार पी. राठोड,ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

जनगणना २०२७ साठी रायगड जिल्हा प्रशासन सज्जडिजिटल पद्धतीने होणार माहिती संकलन; नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी कि...
28/04/2026

जनगणना २०२७ साठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज

डिजिटल पद्धतीने होणार माहिती संकलन; नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड -अलिबाग,(जिमाका)दि. २७ : भारत सरकारच्या निर्देशानुसार आगामी जनगणना २०२७ साठी रायगड जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली असून, यावेळी पहिल्यांदाच मोबाईल अॅपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने माहिती संकलन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा प्रधान जिल्हा जनगणना अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
देशाच्या इतिहासातील ही १६ वी तर स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना असणार आहे. जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिला टप्पा घरयादी व घरगणना या स्वरूपात १ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या टप्प्यात १ मे ते १५ मे दरम्यान नागरिकांना https://se.census.gov.in⁠� या संकेतस्थळावरून Self-Enumeration द्वारे स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. त्यानंतर प्रगणकांकडून प्रत्यक्ष भेटी देऊन मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती संकलन केले जाणार आहे. दुसरा टप्पा प्रत्यक्ष जनगणना स्वरूपात फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहे.
जनगणना मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १५ तहसीलदार, १६ मुख्याधिकारी तसेच पनवेल महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना ४ ते ६ मार्च २०२६ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रशिक्षण देण्यात आले.
रायगड जिल्ह्यासाठी ६९ क्षेत्रीय प्रशिक्षक (Field Trainers) नियुक्त करण्यात आले असून, हे प्रशिक्षक तालुका व नगरपालिका स्तरावरील ५ हजार ९८ प्रगणक आणि ८६३ पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. तसेच जिल्ह्याचे मास्टर ट्रेनर प्रकाश संकपाळ, उपविभागीय अधिकारी कर्जत, तसेच समन्वय अधिकारी हरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिन्यात प्रशिक्षण सत्रे पार पडली.
जनगणनेदरम्यान विचारली जाणारी वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय आदी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून ती केवळ सांख्यिकीय व विकास नियोजनासाठीच वापरली जाणार आहे.
“जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या ...
28/04/2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्ती
प्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

रायगड - अलिबाग,(जिमाका) दि. २७ : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या प्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी विभागीय व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया,विलास शिंदे
विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया,दीपा सहानी,अग्रणी बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया,विजयकुमार कुलकर्णी,
व्यवस्थापकीय संचालक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,मंदार वर्तक तसेच विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी प्राप्त उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सर्व बँकांनी कृती आराखडा तयार करून नियोजित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड जी. एस. हरळय्या,
यांनी उपस्थितांचे अभिनंदन करून आभार मानले.

“आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज”— जिल्हाधिकारी किशन जावळेरायगड-अलिबाग, दि. 27 (जिमाक...
27/04/2026

“आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज”
— जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड-अलिबाग, दि. 27 (जिमाका) : आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज बनली असून प्रत्येक नागरिकाने उत्पन्नाचे योग्य नियोजन, खर्चावर नियंत्रण, गुंतवणुकीचे भान आणि कर्जाचे जबाबदारीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई आणि जिल्ह्याची अग्रणी बँक, ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 एप्रिल रोजी प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित Training of Trainers (ToT) कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद रायगड यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, रिझर्व्ह बँकेच्या उपमहाप्रबंधक डॉ. ज्योती सक्सेना, बँक ऑफ इंडिया रायगड विभाग प्रमुख दीपनविता सहानी, उप विभागीय प्रमुख भारत सहाय, जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, तसेच रिझर्व्ह बँकेचे रायगड जिल्हा अधिकारी विशाल गोंडखे, बेंजामिन डिकोस्टा, विविध शाळांतील शिक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी सांगितले की, आर्थिक शिस्त ही केवळ बचतीपुरती मर्यादित नसून उत्पन्नाचे नियोजन, खर्चावर नियंत्रण, योग्य गुंतवणूक आणि कर्ज व्यवस्थापन या सर्व बाबींचा त्यामध्ये समावेश होतो. बदलत्या आर्थिक परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने आर्थिकदृष्ट्या सजग राहणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून आर्थिक साक्षरतेची जाणीव निर्माण करण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून बचतीचे महत्त्व, बँकिंग व्यवहार आणि विविध शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिल्यास भविष्यात जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध आर्थिक समावेशन योजनांचा उल्लेख करून प्रधानमंत्री जनधन योजना विमा योजना, पेन्शन योजना आणि डिजिटल व्यवहारांचा व्यापक प्रसार करण्याचे आवाहन केले. तसेच डिजिटल व्यवहार करताना सायबर सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना रिझर्व्ह बँकेच्या उपमहाप्रबंधक डॉ. ज्योती सक्सेना यांनी सांगितले की, या प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना बँकिंग व्यवहारांचे ज्ञान, डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी तसेच रिझर्व्ह बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन आर्थिक साक्षरतेत सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने शालेय शिक्षणाबरोबर आर्थिक साक्षरतेचे ज्ञान दिल्यास पुढील पिढी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षणामध्ये रिझर्व्ह बँकेविषयी माहिती, ग्राहकांच्या ठेव रकमेबाबत डीआयसीजीसी (DICGC) संदर्भातील माहिती, डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच खऱ्या नोटा ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिझर्व्ह बँकेचे अधिकारी विशाल गोंडखे यांनी केले, तर जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले व उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून उर्वरित शिक्षकांसाठी जिल्हाभर अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून संपूर्ण जिल्हा आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

22/04/2026

'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता
पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी नियोजन व अंमबजावणी करावी

रायगड अलिबाग,(जिमाका)दि,22:- राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता व उष्णलहरींचा धोका लक्षात घेता, पशुसंवर्धन विभागाने राज्यातील पशुपालक, कुक्कुटपालक व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विभागाने सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, पशुपालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन विभाग डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.
उष्णलहरींच्या काळात पशुधनाची कशी काळजी घ्यावी व याबाबत क्षेत्रिय स्तरावर काय जनजागृती करण्यात यावी, याबाबत पशुसंवर्धन विभागाने मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून अधिनस्त संस्थाप्रमुखांना अवगत केले आहे. तसेच पशुपालकांना मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून पशुधनाची काळजी घेण्याबाबत आवाहन केले आहे. यामध्ये पशुधनाला पुरेसे स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्वांचा समावेश करावा. दुभत्या जनावरांना संतुलित आहार द्यावा.शेतीच्या किंवा वहनाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते सायंकाळी ४ या तीव्र उन्हाच्या काळात विश्रांती द्यावी. त्यांना सावलीत किंवा खेळती हवा असलेल्या थंड जागी बांधावे.गोठ्याचे छत उष्णता रोधक असावे किंवा छतावर गवत/पालापाचोळा टाकून त्यावर पाणी मारावे. शक्य असल्यास स्प्रिंकलरचा वापर करावा. खिडक्यांना सावलीची व्यवस्था असावी.उष्णलहरी सुरू होण्यापूर्वी घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार यांसारख्या रोगांचे प्रतिबंधक लसीकरण व जंतनाशक औषधे पाजणे आवश्यक आहे.

तातडीच्या उपाययोजना व उपचार: पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे (उदा. धापा टाकणे, तोंडावाटे लाळ गळणे, अस्वस्थता) दिसून आल्यास त्वरित तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे. पशुधनावर थंड पाण्याचा मारा करावा. (अश्ववर्गीय प्राण्यांच्या बाबतीत पायाकडून शरीराच्या वरील भागाकडे पाणी मारावे). जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
पशुसंवर्धन विभागाने सर्व क्षेत्रीय संस्थांना हवामान विभागाच्या संपर्कात राहून दैनंदिन तापमानाचा अंदाज घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व दवाखान्यांमध्ये आवश्यक जीवरक्षक औषधे, व औषधी साठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आला आहे. फिरती पशुवैद्यकीय पथके तातडीच्या सेवेसाठी तैनात ठेवण्यात आली आहेत.
पशुसंवर्धन विभागाने जिल्हा प्रशासन, अशासकीय संस्था, तसेच सामाजिक-सेवाभावी संस्थांना आवाहन केले आहे की, रस्त्यावरील पशू-पक्ष्यांसाठी घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची भांडी/हौद ठेवावेत. मृत पशुधनाची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य जागा आरक्षित ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
उष्णलहरींच्या काळात काय करावे? पशुधनासाठी नेहमी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय करावी. पिण्याची भांडी नियमित स्वच्छ ठेवावीत.पिण्याचे पाण्याचे हौद शक्यतो गोठ्याजवळ व सावलीत असावेत. नसल्यास त्यावर शेड उभारून थेट उन्हापासून संरक्षण करावे.चारा, वैरण व पशुखाद्याचा पुरेसा साठा करून ठेवावा.खाद्यात मिनरल मिक्श्चरचा समावेश करावा. उत्पादक व दुभत्या पशुधनास संतुलित आहार द्यावा.गाभण पशुधनाच्या खाद्य व चाऱ्याची काळजी घ्यावी.आधुनिक गोठ्यांमध्ये 'स्प्रिंकलर' वापरावेत. इतर पशुपालकांनी पशुधनाच्या अंगावर पाणी फवारावे. म्हशींना शक्य असल्यास स्वच्छ पाण्याच्या हौदात बसण्याची सोय करावी.सायंकाळच्या दूध दोहनाची वेळ टप्प्याटप्प्याने किमान १ तास उशिरा ठेवावी, जेणेकरून उष्णतेचा ताण कमी होऊन उत्पादन टिकून राहील.पशुधनाला सावलीत व भरपूर खेळती हवा असलेल्या जागी बांधावे. निवाऱ्याच्या छतासाठी उष्णता रोधक साहित्याचा वापर करावा.पक्षीगृहाच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. जाळ्यांना पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.शेती किंवा ओझे वाहणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते दुपारी ४ या तीव्र उन्हाच्या काळात पूर्ण विश्रांती द्यावी.उष्णतेपासून वाचवण्यासाठी अश्वाला त्याच्या पायाकडून शरीराच्या वरील भागाकडे थंड पाण्याचा हळुवार शिडकावा करावा.वराहांना पुरेसा निवारा, स्वच्छ पाणी व शक्य असल्यास पाण्यात बसण्याची सोय करावी.पाळीव प्राणी/पशूंना उन्हाच्या वेळी शक्यतो घरात किंवा सुरक्षित निवाऱ्यात ठेवावे.मृत पशुधनाची विल्हेवाट लावण्याची जागा सार्वजनिक ठिकाणे व पाणवठ्यांपासून दूर व सुरक्षित असावी. तिथे तसा सूचना फलक लावावा.स्थानिक हवामानाचा अंदाज व दैनंदिन तापमानावर नियमित लक्ष ठेवावे.उष्णलहरींच्या काळात काय करू नये पशुधन उन्हाळ्यात उघड्यावर बांधू नये.पाळीव पशुधनास पार्क केलेल्या गाडीत सोडून जावू नये.शेती विषयक व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नये.पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फार दूर व फार वेळ चालावे लागू नये याची दक्षता घ्यावी.पशुधनाची गर्दी करू नये. दाटीवाटीने बांधु नये.भर उन्हात पशुधनाची हलचाल / वाहतुक करू नये.उन्हे असल्यास दुभत्या पशुधनाचे दोहन करून नये.मृत पशुधन उघड्यावर टाकू नये.
एल निनोच्या संकटकाळात पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. चारा व्यवस्थापन व पशुधनाच्या आरोग्याबाबत कोणत्याही मदतीसाठी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. तसेच '१९६२ कॉल सेंटर'च्या माध्यमातून पशुसंवर्धनविषयक सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

22/04/2026

*रायगड जिल्ह्यात 385 रुग्णांना सुमारे 3.35 कोटींची मदत*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती*

रायगड - अलिबाग,जिमाका, दि.22 : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधार' ठरत आहे. रायगड जिल्ह्यात आर्थिक वर्षात 385 रुग्णांना सुमारे 3 कोटी 35 लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.

२० गंभीर आजारासाठी मदत

कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.

आर्थिक वर्षातील मदत

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत रायगड जिल्ह्यातील 385 रुग्णांना सुमारे 3 कोटी 35 लाख 33 हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यातील शेकडो गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी भक्कम आधार मिळत आहे. सुधारित कार्यपद्धती, तातडीने निर्णय आणि समाजाच्या सहभागामुळे मदतीचा लाभ अधिक वेगाने गरजूंपर्यंत पोहोचत आहे. अधिक माहितीसाठी व सहाय्यासाठी रूग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

0000

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा                                                     --जिल्हा...
22/04/2026

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा
--जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड अलिबाग,(जिमाका)दि,22:- रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. आपत्ती काळात सर्व यंत्रणानी सतर्क व दक्ष रहावे, तसेच मान्सून पूर्व तयारी करताना सर्व बाबींची काटेकोरपणे तपासणी आणि उपाययोजना करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक 2026 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, भारतीय तटरक्षक दलाचे अभिषेक कुमार, आपत्ती व्यवस्थापन अधिकार सागर पाठक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, पावसाळा सुरु होण्याकरिता एक महिन्याचा कालावधी बाकी असून सर्व शासकीय यंत्रणानी अतिधोकादायक व धोक्याची संभावना असलेल्या ठिकाणांची पाहणी करावी. या ठिकाणच्या नागरिकांना मान्सून कालावधीमध्ये सुरक्षित जागी स्थलांतरीत करता यावे यासाठी निवाऱ्याची सज्जता करावी. आपत्ती काळात आपदामित्रांचे सहकार्य खूप महत्वाचे असून ते तात्काळ मदतीला धावून येवून महत्वाची भूमिका बजावत असतात. याकरिता आपदा मित्र हे रायगड जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे. प्रत्येक विभागांनी आपला नियंत्रण कक्ष 24x7 कार्यान्वित ठेवावा. याकरिता एक समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. जलसंपदा विभागाने आपल्या अखत्यारित असलेली धरणे, मध्यम प्रकल्पांची तपासणी करावी. आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा औषधसाठा, व्हॅक्शीन उपलब्ध ठेवाव्यात. आपत्तीकाळात रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. विविध विभागांचे परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे जिल्हा प्रशासनास पाठविण्यात यावेत.
तसेच रायगड पाटबंधारे विभागाने धरणांची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अतिवृष्टी विचारात घेवून टप्प्या-टप्याने धरणांतून विसर्ग करावा अशा सूचनाही श्री.जावळे यांनी केल्या. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, तसेच या काळात पूर्व परवानगी शिवाय कुणीही मुख्यालय सोडू नये असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.
दरड प्रवण गावांकरिता नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी गावातील लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजे. आम्ही तुम्ही एक आहोत या भावनेने सर्वांनी काम करावे. आपणास काही मदत हवी असल्यास याकरिता आम्ही सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पूलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी व पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत. तसेच रस्त्यावरील खडे, साईडपट्टी भरुन घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, बोर्ड, डायव्हर्शनचे बोर्ड, ब्लॅक स्पॉटवर रिफ्लेक्टर्स बसवावेत. सर्व विभागांकडील शोध व बचाव साहित्यांची दुरुस्ती करून सर्व साहित्य सुस्थितीत राहील, याची दक्षता घ्यावी. आवश्यक शोध व बचाव पथक, रुग्णवाहिका, स्थलांतराचे ठिकाण, अन्न पाण्याची व्यवस्था, जेसीबी मशिन्स, वूड कटर्स, बोट, लाईफ जॅकेट, स्पीड बोट, जनरेटर इ. साहित्य व मनुष्यबळ सर्व विभागांनी सज्ज ठेवावेत, असे जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी सांगितले.
तसेच या काळात उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी व तहसीलदार यांनी उत्तम समन्वय राखत काम करावे. नगरपालिका, महानगरपालिकांनी नालेसफाईची कामे 31 मे पूर्वी पूर्ण करावीत. तसेच महाड शहरात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. अशा पूरपरिस्थितीत मदत कार्य व बचावासाठी आवश्यक पूर्वतयारी व उपाययोजना केली जावी. आपत्तीच्या प्रसंगी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आदी विभागांनी देखील नागरिकांच्या मदत व सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले म्हणाल्या की, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक व सरपंच यांनी समन्वयाने आढावा बैठका घेवून त्याप्रमाणे नियोजन करावे.
बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी केले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यासह एन डी आर एफ, होमगार्डा,महावितरण, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक परिवहन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे अधिकारी यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0000

Address

District Collector’s Office, At/PO – Alibag, District – Raigad
Alibag
402201

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+912141222001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Collector Raigad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Collector Raigad:

Share