29/06/2025
सध्या मी तेलंगणामध्ये आणि कर्नाटक सीमेला लागून असलेल्या काही जिल्ह्यांमध्ये, आमच्या संस्थेमार्फत चालू असलेल्या एका शैक्षणिक उपक्रमाचं नेतृत्व करत आहे. या मोहिमेअंतर्गत १३ शाळांमधील सुमारे ८०० विद्यार्थ्यांबरोबर, १३ मुख्याध्यापक आणि ४० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर मी काम करत आहे. या तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आम्ही Gender, शरीरात होणारे बदल, मानसिक आरोग्य, हक्क आणि जबाबदाऱ्या, लैंगिकता आणि प्रजनन आरोग्य यांसारख्या संवेदनशील पण अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण देतो. प्रशिक्षणानंतर त्यांना या लहान मुलांना शिकवण्यासाठी विविध शाळांमध्ये पाठवले जाते, आणि त्यांचं निरीक्षण, मार्गदर्शन करण्याचं काम माझ्याकडे आहे.
या संपूर्ण उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे अशी विद्यार्थी घडवणे, जे समाजात लिंगसमतेसाठी आवाज उठवतील, प्रश्न विचारतील, आणि परिवर्तनाची मशाल उंचावून धरेल. ही फक्त माहिती देण्याची प्रक्रिया नाही, तर विचार, समज आणि कृती यांचं पक्कं बळ देण्याची एक सखोल प्रक्रिया आहे. हेच तर आहेत आमचे ‘Gender Ambassadors’ जे समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात. या कामाच्या माध्यमातून मला तेलंगणा सोशल वेल्फेअर रेसिडेन्शियल स्कूल्स (TGSWREIS) सोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली. या शाळा अनुसूचित जाती, जमाती, व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलांसाठी शिक्षणाचं केंद्रबिंदू आहेत. इथे केवळ पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही, तर मुलांच्या राहण्याची, पोषणाची, स्पर्धा परीक्षांची तयारी, डिजिटल साक्षरता आणि जीवनकौशल्यांची जबाबदारीही शाळा उचलते. जरी सर्व सुविधांमध्ये एकसंधता नसेल, तरीही आज या मुलांच्या डोळ्यांमध्ये जे स्वप्नं मी पाहतो, त्यांच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास दिसतो, तो या शाळांच्या अथक प्रयत्नांचा परिणाम आहे. ही केवळ शिक्षणसंस्था नाही, तर सामाजिक परिवर्तनाची कार्यशाळा आहे.
TGSWREIS ही संस्था राज्यातील अनुसूचित जाती विकास विभागांतर्गत कार्यरत आहे. ५वी ते पदवीपर्यंतच्या २५० पेक्षा अधिक निवासी शाळा ती चालवते. तिचा उद्देश म्हणजे वंचित आणि गरजू मुलांना इतर सुसंस्कृत पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसारखंच दर्जेदार शिक्षण देणं. गेल्या तीन दशकांपासून ही संस्था शिक्षण, क्रीडा, संवादकौशल्यं, आणि नेतृत्व यामध्ये विद्यार्थ्यांना घडवत आहे. इथे आत्मभान आणि २१व्या शतकातील आव्हानांना सामोरं जाण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली जाते. या शाळांमध्ये शिक्षण ही फक्त पदवी मिळवण्याची गोष्ट नाही, तर एक सशक्त सामाजिक अस्त्र आहे हे मी दररोज अनुभवतो.
गेल्या ८ दिवसांपासून मी सलग प्रवासात आहे तेलंगणाच्या जंगल भागात, नल्लामल्ला काठावरच्या शाळांमध्ये, आणि कर्नाटक सीमेलगतच्या दुर्गम भागांमध्ये. एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी लक्ष वेधून घेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, त्यांच्या भिंतीवरील चित्रं, आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांचं अढळ स्थान. बाबासाहेबांची प्रेरणा माझ्या प्रत्येक कामामध्ये खोलवर रुजलेली आहे. शिक्षण क्षेत्रात काम करण्यामागची माझी सर्वात मोठी प्रेरणा बाबासाहेबच आहेत. त्यांनी सुरू केलेलं समाजासाठीचं आंदोलन, मी माझ्या कामातून पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आज शिक्षण हेच माझं माध्यम आहे.
या प्रवासात मी खूप गोष्टी शिकतो आहे मुलांच्या डोळ्यांतून जग बघणं, त्यांच्या प्रश्नांतून समाजाची जखम ओळखणं, आणि त्यांच्या स्वप्नांतून एका नव्या समाजाची झलक पाहणं. अनेकदा वाटतं, आपण त्यांच्यासाठी काही देतोय, पण खरंतर हेच लहानगे मला दररोज नव्याने घडवत आहेत. मुलं शिकत आहेत, पण त्यांच्याबरोबर मीही शिकतोय. सहानुभूती, समज, आणि जबाबदारी. शिक्षण ही एक सोंग नाही, ती एक क्रांती आहे. आणि ही क्रांती वर्गखोल्यांमध्ये सुरू होते, पण तिचा आवाज समाजाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचतो.
शाळा म्हणजे केवळ भिंतींचं नाव नाही, तर शक्यतांचं दार आहे. आणि जेव्हा त्या दारातून एक गरीब, वंचित मूल आत्मविश्वासाने बाहेर पडतं, तेव्हा खरं समाजपरिवर्तन घडतं. मी त्या बदलाचा साक्षीदार आहे. आणि हा प्रवास एक सामाजिक बांधिलकी, एक स्वप्न, आणि एक जबाबदारी पुढे नेणार आहे, जोपर्यंत शेवटच्या लेकरालाही शिकण्याची संधी मिळत नाही.
या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट मनात ठसते जर ही मुलं शिकली, तर त्यांचं भविष्य उज्वल असेल. अन्यथा, तेच चक्र मोलमजुरीचं, दुर्लक्षित आयुष्याचं परत सुरू होईल.
मी जे करतो आहे, ते फक्त नोकरी नाही. पोटापाण्यासाठी पगार मिळतो, पण या लहान मुलांना शिकवून त्यांचं आयुष्य एका सकारात्मक वळणावर नेण्याचं समाधान फार वेगळं आहे आणि तेच मला रोज पुन्हा पुन्हा ह्या प्रवासात उतरायला भाग पाडतं.