27/06/2017
*खाकी मधले देवदूत*
"साहेब *देवकुंड* धबधब्यावर *५०* लोक अडकलेत नदीला पाणी खूप वाढलंय आमचा जिव धोक्यात आहे" समोरील व्यक्ती भीतीने कापऱ्या आवाजात बोलत होती. *सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप साहेबांनी* अवश्यक ती जुजबी माहिती विचारून घेतली. दुसऱ्याच क्षणी सोबतीला पोलीस स्टाफ घेऊन ते भिरा गावच्या दिशेने निघाले. पोलीस जीप वाऱ्याच्या वेगाने पळत होती. प्रवासादरम्यान स.पो.नि.जगताप फोनद्वारे सतत प्रयत्न करून बचाव कार्याकरीता अवश्यक साधने, लाईफ गार्ड, जिव रक्षक यांची जमवा जमव करीत होते.........
*(काही तासांपूर्वीचा प्रसंग)*
*मुंबईतील* पोतदार कॉलेज आणि केळकर कॉलेज मधील *सुमारे ५५ तरुण तरुणींचा ग्रुप* पावसाळी सहल एन्जॉय करण्यासाठी *माणगांव जवळच्या भिरा येथील कुंडलिका नदीवरच्या देवकुंड धबधब्यावर* आला होता. गेले काही दिवस लाजऱ्या बवऱ्या नव्या नवरी सारखा रिमझिमत येणाऱ्या वरुणराजाने आज अचानक उग्र रूप धारण केल होत. मनमोहक असा देवकुंड धबधबा फेसाळत कोसळत होता. पाण्याचा दुग्धाभिषेक, तारुण्याचा कैफ, मस्ती, अंग गारठवणार रम्य वातावरण अन हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात अंगात भिनत चाललेल्या उत्साहाने तुडुंब भरलेली तरुणाई १२:०० वा च्या सुमारास नदी पत्रात उतरून धबधब्याखाली शिरली. उंचावरून फेसाळत कोसळणार दुधाळ पाणी अंगावर झेलण्यात अन एकमेकांना पाण्यात भिजवण्यात गुंग झालेल्या त्या तरुणाईला पावसाचा वाढणारा जोर अन नदी पात्रातील पाण्याची वाढणारी पातळी याचा अंदाजच मुळी लागला नाही. सुमारे एक-दीड तास मनसोक्त भिजून गारठल्यावर सगळे पाण्याबाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु वाढत्या पाण्याच्या वेगामुळे नदी पात्रात पाय ठेवण्याची हिम्मत मात्र कुणाचीच होत नव्हती त्यामुळे जिवाच्या भीतीने सर्वांचा थरकाप उडाला.
कुंडलिका नदीच्या मूळ प्रवाहाला फाटा देत वेगळा झालेला दुसरा प्रवाह ओलांडून पुन्हा मूळ प्रवाह ओलांडून पलीकडल्या बाजूला जाण म्हणजे जीवाशी खेळ असल्याचा अंदाज एव्हाना त्या तरुणाईला आला होता. शेवाळीने निसरड्या झालेल्या दगडगोट्यातुन वाट काढत नदी प्रवाह ओलांडताना एखाद्याचा पाय घसरला तरी जिवाला मुकाव लागणार याची त्यांना पक्की खात्री झाली होती. सरसर निघून जात चाललेली वेळ , वातावरणात पसरत चाललेला ढगाळ अंधार, पाण्याचा वाढता प्रवाह हे सार पाहता जास्त वेळ नदीच्या पलीकडील बाजूला अडकून राहणे देखील सोयीस्कर नव्हतं. अखेर त्यांतील एकाने पोलिसांची मदत मिळण्याच्या अपेक्षेने माणगांव पोलीस ठाणेत फोन केला.
*(बचाव पथक)*
इकडे शक्य तितक्या घाईघाईने स.पो.नि.जगताप साहेब भिरा कुंडलिका नदी पात्राजवळ पोहचले. त्यांनी आधीच जमवा जमव केल्या प्रमाणे *दिव्या आडव्हेंचर्स रिव्हर राफ्टिंगचे विरेंद्र सावंत आणि त्यांचे सहकारी लाईफ गार्ड* साहित्यनिशी हजर होते. घटनास्थळावर *पो.हवा.टेकाळे, पो.ना.वडते आणि पोलीस शिपाई बोडके* तत्परतेने कार्यरत होते. योग्य ती तयारी करून स.पो.नि.जगताप आणि बचाव पथकातले सहकारी मुसळधार पावसाने रबरबलेल्या चिखळट पायवाटेच्या रस्त्याने धावत सुटले. पावसाने शेवाळलेल्या खडकाळ पायवाटेने पळत, दगड धोंड्यात ठेसळत, बचाव पथक पर्यटक-तरुण अडकून पडलेल्या ठिकाणी पोहचले. एव्हाना पाण्याचा प्रवाह तुफान वाढला होता. पाण्याचा वेग पाहता चालत नदीचा प्रवाह ओलांडून पलीकडे पोहचणे सहज शक्य नव्हते. एक लहानशी चूक देखील नदी ओलांडणाऱ्याला जलसमाधी घडवू शकत होती. अश्या या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या भयंकर परिस्थितीत बचाव पथकाने त्या तरुणांना वाचवण्यासाठी नदीचा प्रवाह ओलांडून पलीकडे पर्यटक तरुण अडकलेल्या ठिकाणी पोहचण्याचा बेत आखला. पण हे अग्नीदिव्य एकदा नव्हे तर चारवेळा पार करायचं होतं. कुंडलिका नदीच्या मूळ प्रवाहालाच फाटा देत वेगळ्या झालेल्या दुसऱ्या प्रवाहाच्या पलीकडे जाऊन पर्यटक तरुणांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःचा जिव धोक्यात टाकणे. *अक्षरशः मृत्यूच्या जबड्यात हात घालणे.*
तरीही या भयाण जिवघेण्या परिस्थिती ला भिक न घालता स.पो.नि.जगताप साहेबांच्या बचाव पथकाने आपले प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला लाईफ गार्ड जॅकेटने सुसज्ज असलेले दोन जिव रक्षक रस्सीच्या सहाय्याने कुंडलिका नदीच्या मूळ प्रवाहात शिरले. उथळ पाण्याच्या ठिकाणाचा शोध घेत सावधपणे पुढे सरकत असतानाच ते स्वतःच पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले. आता मात्र स.पो.नि.जगताप साहेबांसह सर्वांची भीतीने गाळण उडाली. मदत कार्य वाटतंय तितकं सोप्प नसल्याची त्यांना जाणीव झाली. पावसाच्या वर्षावाबरोबर वाढणाऱ्या पाण्याची पातळी आणि प्रवाहवेग यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होऊ लागली. तरीही हिम्मत न हरता बचाव पथकाचे ते जिव रक्षक नदीचा मूळ प्रवाह पार करीत पलीकडल्या बाजूला पोहचले. आता मूळ प्रवाहातून निघालेला दुसरा प्रवाह पार करून पर्यटक तरुणांच्या जवळ जाणं अजूनही बाकी होत.! पण तो अडथळा देखील पार करीत बचाव पथक पर्यटक तरुणांपाशी पोहचल.
पाऊस आणि नदी प्रवाहाच्या पाण्याने ओलेचिंब झालेले स.पो.नि जगताप साहेब पर्यटकांना सतत धीर देऊन रस्सीच्या सहाय्याने नदी प्रवाह ओलांडण्या बाबत मार्गदर्शन सूचना करीत होते. पर्यटकांच्यात तरुण मुलांच्या बरोबरीने मुलींची देखील संख्या मोठी होती. भेदरलेल्या त्या मुलींना या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर बनवणे म्हणजे पुन्हा एक *यक्षप्रश्न.!* पण बचाव पथकाचा पवित्रा पाहता संपूर्ण पर्यटक ग्रुप आता निर्धास्त झाला होता. विरेंद्र सावंत यांच्या रिव्हर राफटर्सच्या अन स.पो.नि.जगताप साहेबांच्या बचाव पथकाच्या जाबाज जिव रक्षकांनी त्यांच्या कडील रस्सीचं एक टोक नदीच्या अलीकडील बाजूला अन दुसरं पलीकडील बाजूला बांधून नदी प्रवाह पार करण्यासाठीचा हलकासा आधार तयार केला. सर्वात पुढे, नदी प्रवाहात मध्यभागी आणि सर्वात शेवटी असे जागोजागी स्वतः थांबून बचाव पथकाने मानवी साखळी तयार केली. अन सुमारे अडीच ते तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी एक एक करून तब्बल ५५ स्त्री-पुरुष पर्यटकांना नदीच्या दोन्ही प्रवाहातून *सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळवलं.!*
बचाव पथकाने मोठ्या हिमतीने तब्बल चार वेळा त्या फेसळत्या नदी प्रवाहात स्वतःला झोकून देत, प्रसंगी स्वतःचा जिव धोक्यात घालून त्या तरुणांचे प्राण वाचवले. एखादा बुडत असताना त्याची मोबाईलवर व्हिडीओ करून सोशल मिडियावर लाईक कमेंटचा पाऊस पाडणाऱ्या या आभासी दुनियेत अशी प्रेरणादायी माणस देखील प्रत्यक्षात असतात यावर त्या पर्यटकांचा विश्वास बसत नव्हता. साक्षात यमदूत समोर उभा ठाकला असताना कोणीतरी देवदूताने येऊन प्राण रक्षण करावं तसेच काहीसे या पर्यटकांसाठी स.पो.नि.जगताप आणि त्यांचं बचाव पथक धावून आले होते. *जगाला आज माणसातल्या विठ्ठलाचं दर्शन घडलं होत.* नेहमीच समाजाची तिरस्कृत नजर झेलत त्याच समाजासाठी प्राणपणाने झटणारे खाकीतले देवदूत साक्षात अवतरले होते.
*(मा.स.पो.नि.जगताप सर आपलं हे कार्य आमच्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल. ययापूर्वी महाड येथील सावित्री नदी वरील पूल दुर्घटना प्रसंगी मृतांचे शोध पथकातील आपले कार्य अफाट अन कौतुकास्पद आहे. समाज कार्यातील तुमचा आदर्श नेहमीचं अभिमानास्पद राहील)*
*मन्या ठाकूर*
🙏🙏🙏🙏