02/06/2026
*कर्तव्यनिष्ठेचा 'शतप्रतिशत' पॅटर्न: आमदार ज. मो. अभ्यंकर यांचे आदर्श कार्य*
महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेने नुकतीच सभागृहातील १०० टक्के उपस्थिती असलेल्या आमदारांची यादी जाहीर केली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा शिक्षक आमदार मा. ज. मो. अभ्यंकर यांचे नाव अत्यंत अभिमानाने समोर आले आहे. मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक आणि विद्यार्थियोंसाठी ही नक्कीच सर्वोच्च गौरवाची बाब आहे.
आमदार अभ्यंकर सरांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींना मात्र त्यांच्या या कामगिरीचे विशेष आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण प्रशासकीय सेवेत कार्यरत असतानापासूनच त्यांनी नेहमीच कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. दिवाळी, दसरा किंवा इतर कोणताही सण असो, कार्यालयातील त्यांची उपस्थिती कायम जाणवत असे.
सुट्टीच्या दिवशीसुद्धा घरी न थांबता महत्त्वाच्या फाईल्सचा सखोल अभ्यास करणे, त्यावर तातडीने निर्णय घेणे आणि सर्वसामान्य लोकांची कामे मार्गी लावणे ही त्यांची मूळ कार्यपद्धती राहिली आहे. यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर नेहमीच गाढा विश्वास आणि विशेष स्नेह राहिला आहे.
आज आमदार म्हणून लोकप्रतिनिधीत्वाची जबाबदारी अंगावर आल्यानंतरही त्यांच्या या कार्यपद्धतीत किंचितही बदल झालेला नाही. विधान परिषदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अनेक महिने आधीपासूनच ते सभागृहातील प्रश्नांची पूर्वतयारी करत असतात.
आवश्यक कागदपत्रांचा अभ्यास, माहितीचे संकलन आणि विषयाचा सूक्ष्म विचार करूनच ते सभागृहात प्रश्न मांडतात. त्यांच्या भाषणात नेहमीच अभ्यासपूर्ण मांडणी, नेमकेपणा आणि विषयाची सखोल जाण दिसून येते. अनाठायी गदारोळ करणे किंवा केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अवास्तव विधाने करणे हे त्यांच्या स्वभावात कधीच बसत नाही.
त्यामुळेच संपूर्ण शासकीय प्रशासनामध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदराची भावना आहे. विधान परिषदेत शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आजपर्यंत एकही दिवस सभागृहातून अनुपस्थित राहणे पसंत केले नाही. "हा माझा विषय नाही" असे म्हणून सभागृहाबाहेर जाण्याची वृत्ती त्यांच्यात कधीच दिसली नाही. शिक्षक, शिक्षण आणि समाजहिताशी संबंधित प्रत्येक विषयात ते तितक्याच जबाबदारीने आणि ताकदीने सहभागी होताना दिसतात.
त्यांच्या याच अभ्यासू वृत्तीचा आदर करून शासनाने विविध महत्त्वाच्या समित्यांवर त्यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते अल्पसंख्याक कल्याण समिती, अनुसूचित जाती कल्याण समिती, मराठी भाषा समिती, उपविधी समिती आणि धर्मादाय रुग्णालय चौकशी समिती अशा अनेक महत्त्वाच्या समित्यांवर सक्रियपणे कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे, केवळ मुख्य सभागृहातच नव्हे, तर या सर्व समित्यांच्या बैठकींनाही त्यांची शंभर टक्के उपस्थिती असते. प्रत्येक बैठकीसाठी सखोल तयारी करूनच ते उपस्थित राहतात आणि आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा उपयोग समाजहितासाठी प्रभावीपणे करतात.
आमदार अभ्यंकर यांची कार्यनिष्ठा केवळ विधान परिषद किंवा समित्यांच्या बैठकांपुरतीच मर्यादित नाही, तर त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात शाळा भेटी, शिक्षकांच्या सातत्याने होणाऱ्या बैठका, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा आणि शिक्षकांच्या समस्यांचे जागीच निराकरण यांचा समावेश असतो.
वेळेचे काटेकोर पालन, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आणि कामाचा अंतिम टप्प्यापर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा हीच त्यांची मुख्य ओळख बनली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत त्यांची संवेदनशीलता विशेष उल्लेखनीय आहे.
एखादा शिक्षक आपली समस्या घेऊन आल्यावर संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधणे, आवश्यक ते मार्गदर्शन करणे आणि प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पिच्छा न सोडणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. दर महिन्याला शिक्षणाधिकारी कार्यालय आणि उपसंचालक कार्यालय येथे स्वतः जाऊन शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचा त्यांनी जणू दिनक्रमच बनवला आहे.
त्यांच्या याच आक्रमक व अभ्यासू नेतृत्वाखाली आजवर अनेक शिक्षकांना न्याय मिळाला आहे. हजारो शिक्षकांचे प्रलंबित शालार्थ आयडी मिळवून देणे, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन मुंबईतच व्हावे यासाठी शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडणे, तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणी शिक्षकांना वेळेत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे अशी अनेक उल्लेखनीय कामे त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.
आज विधान परिषदेमध्ये त्यांनी दाखविलेली १०० टक्के उपस्थिती ही केवळ एक आकडेवारी नाही; तर ती त्यांच्या प्रामाणिकपणाची, कर्तव्यनिष्ठेची आणि शिक्षकांप्रती असलेल्या बांधिलकीची जिवंत साक्ष आहे. अशा अभ्यासू, तत्त्वनिष्ठ, कार्यक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे आज मुंबईतील तमाम शिक्षक वर्गाला त्यांचा सार्थ अभिमान वाटत आहे.
मुंबईतील शिक्षकांनी निवडणुकीच्या वेळी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरताना दिसत आहे. शिक्षक, संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांना न्याय देणारे, शिक्षण क्षेत्राच्या प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर आणि सभागृहात लढणारे आणि कामालाच ईश्वर मानणारे असे लोकप्रतिनिधी समाजात विरळाच असतात.
आमदार मा. ज. मो. अभ्यंकर यांनी सभागृहात दाखविलेल्या या ऐतिहासिक शंभर टक्के उपस्थितीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अशा प्रामाणिक, कर्तृत्ववान नेतृत्वाला विधान परिषदेत पाठविणाऱ्या मुंबईतील सर्व शिक्षकांचेही मनःपूर्वक आभार!
जालिंदर देवराम सरोदे
(कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना)