02/06/2026
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा लढा न्याय्य मागण्या मान्य झाल्याशिवाय थांबणार नाही!
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा आज कवडीमोल दराने विकावा लागत आहे. कांद्याला प्रति किलो दोन रुपयेही दर मिळत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट क्रांती महामोर्चा पुणे-नाशिक महामार्गावरील भोरवाडी, आंबेगाव येथे पार पडला.
सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून अडथळे निर्माण करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्यायाने पेटलेला बळीराजा अडथळ्यांना घाबरत नाही. हजारो शेतकरी सर्व अडथळे पार करून आंदोलनस्थळी पोहोचले आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार पुन्हा एकदा दाखवून दिला. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम, कांद्याला न्याय्य भाव आणि शेतीला सन्मान मिळालाच पाहीजे, या मागण्यांशी तडजोड कधीही केली जाणार नाही.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, खा. निलेश लंके, आ. बापूसाहेब पठारे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार बाबाजी काळे, माजी आ. अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. देवदत्त निकम, पुणे ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. लहुआन्ना निवंगूने, श्री. कमलाकर सातव तसेच महाविकास आघाडीतील स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.