11/04/2023
संविधानाची प्रभावी अंमलबजावणी करा
ऍड. प्रतीक कर्डक: जयभीम ब्रिगेडच्या संविधान राबवा अभियानाचा प्रारंभ
नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आणि हक्क बहाल करून सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, संविधानाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही येथील दलित, आदिवासी, ओबीसी समाजातील मोठा वर्ग मूलभूत अधिकारापासून वंचित आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार, प्रशासनाने व्यापक प्रयत्न करावेत. यासाठी जयभीम ब्रिगेड, समाज आणि प्रशासनातील दुवा म्हणून काम करेल. असे प्रतिपादन ऍड. प्रतिक बाळासाहेब कर्डक यांनी केले. जयभीम ब्रिगेड संघटनेची स्थापना आणि संविधान राबवा अभियानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर ज्ञानेश्वर काळे, बाळासाहेब कर्डक, रवींद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
ऍड. कर्डक म्हणाले की, देशात हरघर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला. परंतु देशातील करोडो कुटूंबांकडे तिरंगा फडकवण्यासाठी हक्काचे घरच नाही ही शोकांतिका आहे. हीच परिस्थिती आरोग्यची आहे. गोर गरिबांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यामुळे शिक्षणाचा अधिकारच हिरावाला जात आहे. तर अन्न सुरक्षा कायदा कागदावरच आहे. शिवाय रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आज समाजासमोर उभे आहेत. या प्रश्नांना घेऊन येत्या काळात संविधानिक मार्गाने लढा उभारणार असल्याचे ऍड कर्डक म्हणाले. यासाठी आंदोलन, मोर्चे, निवेदने या सर्व मार्गांचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना त्यांचे अधिकार माहिती करून देण्यासाठी कायदेविषयक शिबिरे, विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी विकास विभागाचे अधिकारी चंदनशिरवाळ यांनी आदिवासी समाजाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कॉप्टन कुणाल गायकवाड, रवींद्र गायकवाड, ज्ञानेश्वर काळे, संगीत विचारे, लक्ष्मीबाई कोंबडे, संदीप धात्रक आदींनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मोहन तांबे, गोविंद कुटे, संजय जाधव, प्रकाश जाधव, राजू धायजे, रविंद्र वाघ, सुदीप निकम, मोहन तांबे संजय जाधव, विशाल तांबे, सागर, शाम गोंड, अशोक शिंदे, धरम शिंदे, संतोष शिंदे, यांच्यासह सामाजिक, राजकीय तसेच शिक्षण आदी क्षेत्रातील विविध मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले.