कथाविश्व

कथाविश्व मराठमोळ्या कथांचे प्रेमळ विश्व..!!😊🎉
(3)

आणि घटस्फोट रद्द झाला...... #कथाविश्व सकाळी लवकर उठून मॉर्निंग वाॅक ची तयारी करत होतो. शूज घातले तेवढ्यात दारावरची बेल व...
06/09/2026

आणि घटस्फोट रद्द झाला......
#कथाविश्व

सकाळी लवकर उठून मॉर्निंग वाॅक ची तयारी करत होतो. शूज घातले तेवढ्यात दारावरची बेल वाजली मनात विचार आला एवढ्या सकाळी कोण आले असेल.पेपरवाला व दुधवाला यायला बराच वेळ आहे अजुन.दार उघडलं समोर एक सुंदर २५/२६ वर्षाची स्त्री बाळाला घेऊन उभी होती.तिच्या बरोबर एक पन्नाशीतली एक स्त्री ही होती तिच्या हातात बॅग होती. तिने मला विचारले,"वकीलसाहेब इथेच राहातात ना? तुम्हीच का ?" मी म्हणालो," हो, मीच." मी त्यांना घरात घेतले बाळ जागे झाले होते त्याने इकडे तिकडे पाहिले व मोठ्याने रडायला लागला.
माझी पत्नी बेडरूम मध्येच होती मी तिला आवाज दिला व म्हणालो,"या बाळासाठी दूध बिस्किट आण."
तिने माझे म्हणणे ऐकले. बाळासाठी दूध बिस्किट आणले व ती पुन: किचनमध्ये गेली. मी त्या दोघींना हॉलमध्ये बसण्यास सांगितले. एव्हाना माझा मॉर्निंग वॉकचा कार्यक्रम जवळपास रद्द झाला होता. तिने मला सांगितले की,"वकिल साहेब तुम्ही मला माझे पती तर्फे नोटीस पाठवलेली आहे." मी म्हणालो,"आपण या विषयावर नंतर बोलू आधी बाळाला शांत करा त्याला दुध बिस्किट खाऊ घाला."
बाळाने दुध बिस्किट खाल्ले तो पर्यंत पत्नीने मी काही न सांगताच त्या दोघींना व मला चहा करुन आणला .आम्ही सगळ्यांनी चहा घेतला त्यांचे म्हणणे ऐकुन घेतले. त्यांच्या चेहऱ्यावरून माझ्या लक्षात आले कि हे लोक खुप लांबून प्रवास करून आलेले दिसत आहेत.
मी तिच्या पतीला फोन केला व सांगितले की,"तुझी पत्नी व लहान बाळ माझ्या घरी आलेले आहेत त्यांना तू घरी घेऊन जा त्यांना अंघोळ नाश्ता करू दे त्याच्यानंतर तुम्ही सर्वजण मला दहा वाजता ऑफिसला येऊन भेटा."
तिचा पती त्यांना घरात घेण्यास तयार नव्हता. मी त्याला समजावले,"अरे भांडण पत्नीचे व तुझे आहे त्यात बाळाचा काय दोष आहे ते लांबून प्रवास करून आलेले आहेत त्यांना व बाळाला थोडासा आराम मिळेल मग आपण ठरवू कोर्ट कारवाई करायची किंवा तुला तुझ्या पत्नीला नांदवायची का सोडचिट्टी द्यायची याबाबत आपण दहा वाजता बोलू."
खूप विनंती केल्यानंतर तो त्यांना घरात घ्यायला तयार झाला मी त्या दोघींना समजावून सांगितले, "वाद करू नका आपण हा विषय समंजसपणाने सोडवू . तुम्ही आता घरी जा,आंघोळ करा, नाश्ता करा त्यानंतर मला येऊन भेटा."
माझ्या घरातून निघतांना तिच्या आईने मला सांगितले की, "वकील साहेब हिचे वडील लहानपणीच वारले . मी हिला, तिच्या बहिणीला खूप कष्टाने मोठे केले आहे . तिचे वडील खाजगी कंपनीत नोकरीला होते त्यामुळे आमची कशीतरी गुजराण होत होती. ते अटॅकने गेल्यानंतर मी खाजगी दवाखान्यात नर्स म्हणून काम करून दोन्ही मुलींचे संगोपन केले.हिला चांगले स्थळ आले व रेल्वेची नोकरी असलेला मुलगा असल्याने मी खूप कष्टाने लग्न करून दिले आहे. मी तुमच्या पाया पडते माझ्या मुलीचा संसार वाचवा." मी म्हणालो,"मावशी काळजी करू नका मी तुमच्या मुलीचा संसार उध्वस्त होऊ देणार नाही. मी तुमच्या जावयाची समजूत काढतो तुम्ही काळजी करू नका. असे बोलून त्यांना निरोप दिला."
मी माझा मॉर्निंग वाँकचा बेत रद्द केला. लवकर फ्रेश होऊन नाश्ता करून ऑफिसला जाऊन बसलो. साधारण पावणेदहा वाजता माझा पक्षकार आला. त्याने मला सांगितले की,"मला माझ्या पत्नीला नांदावायचे नाही." मी म्हणालो,"मी त्यांच्याशी बोलतो आपण ठरवू काय करायचे ते."
दोघाना मी वेगवेगळी वेळ दिली. त्यानंतर साधारणतः पंधरा मिनिटांनी त्याची पत्नी व सासू लहान बाळाला घेऊन माझ्या ऑफिसला आले. मी त्यांना बोलते केले व सर्व हकीकत विचारली. ती ढसाढसा रडू लागली मी म्हणालो,"रडू नको तुला काय त्रास आहे ते मला सांग." ती मला म्हणाली,"मला माझ्या पतीचा काहीच त्रास नाही." मग मी विचारले," नेमकं तुमच्या दोघांमध्ये कशावरून भांडण आहे." ती म्हणाली," माझे पती रेल्वे खात्यात ड्रायव्हर म्हणून नोकरीस आहे ते ड्युटीवर गेल्यानंतर दोन-दोन दिवस बाहेर असतात मला एकच मुलगी आहे. माझे शिक्षण बीए पर्यंत झालेले आहे मला पुढे एम.ए करण्याची इच्छा आहे.मी माझ्या शिक्षणाचा विषय माझ्या सासू जवळ बोलून दाखवला. तिने हा विषय आमच्या बिल्डींग मधील सर्व स्त्रियांना सांगितला. त्यांनी माझ्या सासूचे मत कलुषित केले म्हणाले की, तुझी सून या वयात बाहेर शिकायला गेली तर घरचे काम कोण करणार? तिने बाहेर जाणे योग्य नाही.माझ्या सासूने लोकांचे ऐकून माझ्या पतीच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण केला व त्यातूनच वाद होऊन माझ्या पतीने मला माहेरी सोडले आहे." मी तिच्या आईला विचारले," या व्यतिरिक्त तुमच्या जावयाची वागणूक कशी आहे." तिने सांगितले, "साहेब,माझा जावई अतिशय चांगला माणूस आहे."
दोघांकडचे म्हणणे ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आले दोघांचा काहीच प्राॅब्लेम नाही .घरातले शब्द बाहेर गेल्यामुळे आस- पासच्या लोंकाच्या हस्तक्षेपामुळे घटस्फोटाची परिस्थिती निर्माण झाली होती. मी त्यांना घर बदलायला सांगितले व या तुमच्या बाळासाठी एक महिना तुम्ही दोघे एकत्र रहा जर काही प्राॅब्लेम झाला तर आपण घटस्फोटासाठी प्रोसेस सुरु करु .माझा तर हा व्यवसाय आहे .समजावल्या नंतर एक महिना दोघांनी एकत्र राहण्याचे मान्य केले व आज दहा वर्ष झाली त्यांचा सुखाने संसार चालु आहे .त्यांना आता दोन अपत्य आहेत. रस्त्याने जर दिसले कधी तर मी स्मित हास्य करुन पुढे निघुन जातो.
फोटो सौजन्य - pinterest
✒अनिस ए.एस.
कथाविश्व - आपले कौटुंबिक कथांचे अद्भुत विश्व 🎉

06/09/2026

“द नंबर यू हॅव डायल्ड डझ नॉट एक्सिस्ट.”------------
#कथाविश्व

मी स्वतःला हातगाडी सारखं ढकलत ढकलत घरी चाललो होतो. ऑफिसला जाताना ढकलगाडी परत येताना पण ढकलगाडी. ऑफिसात कुठे ठेवणार नाही का?
ढकल ढकल एकदा फिरून रे....
शेजारून एक लांब लचक गाडी अगदी खेटून गेली. थोडा धक्का लागला असता म्हणजे? जो पाहावा तो माझ्या जीवावर उठलेला.सुखाने जगू देखील देत नाहीत, हे गाडीवाले.
कर्र कच्च त्याच गाडीवाल्याने अर्जंट ब्रेक लावले होते. गाडीतून झ्याक प्याक सूटवाला उतरला माझ्याकडे पळत येत होता. आता हा काय मला फायर करणार काय? माझी काहीही चूक नव्हती. मी थोडाच ऐकून घेणार होतो?
सूटवाल्याने येऊन मला मिठीच मारली की हो. कुठल्या तरी उग्र डीओचा घमघमाट दरवळला,
“अरे ओ इंग्लिश मास्टर, ओळखल नाय मला तू?”
“तुला ओळखलं नाही असं कसं होईल.” मी स्मरणशक्तीला ताण देऊन ओळखण्याचा प्रयत्न करत म्हणालो.
“ह्या शांतारामला नओळखणारा शक्स ह्या शहरात कोणी नाही.” शांताराम काय. हो आत्ता ओळख पटली. शांताराम मानकापे.
“मिस्टर मानकापे, किती दिवसांनी आपण भेटलात.”
“केकू, अस पाहुण्यासारखे केव्हापासून बोलायला लागलास?” शांताराम मानकापेने माझा हात धरून त्याच्या गाडीकडे खेचत नेले.
“नानू, आपल्या नेहमीच्या जागी घे.” म्हणजे त्याच्या ड्रायव्हरचे नाव नानू होते एकूण.
नानूने लवून येससर केलं.
गाडी भरधाव कुठल्यातरी हॉटेलकडे निघाली.
ते फाईव स्टार हॉटेल होते एवढी समज मला होती. पण तेथल्या चकचकाट्याचे वर्णन करणे माझ्याचाने होणे नाही. मुळात कुठल्या गोष्टीला काय म्हणतात हेच मला माहित नाही.
“बोल केकू, काय घेणार? व्हीस्की मागवू?”
“नको नको, मी चहा घेईन फक्त, घरी जायला उशीर होईल.” मी आक्रस्तून बोललो. खरं म्हणजे घरी वाट बघणारं कुत्रं पण नव्हते.
“केशव, घरी फोन कर. सांग सकाळी परत येईन.”
“अस कस. बिचारी काळजी करत रात्रभर जागरण करत बसेल.”
“आयला काय लकी आहेस तू. माझी बायको..... जाऊ दे. म्हणजे माझी सेकंड वाईफ. बरका. मास्टर तो कोण बोलला रे, “स्त्री जात तेव्हढी नमक हराम!” खरं बोल्ला बघ तो. माझी पैली बायको शिंपली ग्रेट! पण तिनं काय म्हणतात ते सुसाईड केली बघ. का? मला थांग लावू दिला नाही. मास्टर आपल्याला बाई कधी समजली नाही अन समजणार पण नाही. जो खायेगा उसका भी भला, नही खायेगा उसका भी भला. ऐसा झमेला है.”
मला त्याच्या बायका आणि त्याची बायकांबद्दलची मते ऐकायची नव्हती.
“शांत्या, मी घरी फोन लावतो.”
थोडा बाजूला जाऊन मी माझ्या नसलेल्या बायकोला फोन केला.
परत येऊन शांत्याच्या समोर बसलो.
“तर बोल, काय आपले दिवस होते. शाळेतले. आठवतात ते दिवस? तू, मी, दगडोजी झांगोजी पवार वडारवाडीवाला, बेंजामिन फ्रेडरिक पंडित, हणम्या आणि मंग्या किरणानंद! काय करतात रे हे सगळे. तू म्हणजे इंग्लीशचा मास्टर! दगडोजी म्युनसिपालटीचा मोठा ठेकेदार झाला आहे. भेटतो अधून मधून. बेन्जामिन कुठे गायब झाला काय माहित. हणम्या दोनदा तिनदा सासुरवाडीला जाऊन आला. खुनाच्या केस मधून मीच त्याला सोडवला. नाहीतर गेला होता बाराच्या भावात. शाळेतच तो रामपुरी घेऊन यायचा. आता माझ्याकडेच ‘काम’ करतो. ते सोड आमच्या रडकथा कशाला तुला ऐकवतो आहे. तुझे कसे चालले आहे? इंग्लीश मध्ये काही लिहिलस कि नाही. कोण रे तो? तू सारख नाव घ्यायसास? चार्ल्स कोण?”
शाळेत मला चार्ल्स डिकन्सची खूप मोहिनी पडली होती. वाटायचे कधीतरी आपणही अस लिहू. मी चार्ल्स डिकन्सला केव्हाच विसरलो होतो. पण शांत्याच्या लक्षात सगळे होते. जखम पुन्हा उघडी पडली. पण आता त्यातून रक्त वहात नव्हते. दुखतही नव्हते. न भरून येणारी जखम होती ती.
“इकडे “अबोली” म्हणून इंटरनेटवर जागा आहे. तिकडे मी स्टोऱ्या टाकतो.(लिहितो अस म्हणायचे होते. पण टाकतो हाच करेक्ट शब्द. पाट्या टाकतो शी फिट जुळतो.)”
“काय बोलतोस काय? मी देखील तिकडे असतो.”
मला ४४० चा झटका बसावा तसे वाटले.
“केकू कुणाला सांगू नकोस हा. मी नाही रे. मी एक माणूस ठेवला आहे. तो नेट वरून, व्हाट्सप वरून माल गोळा करतो आणि इकडे ओततो. चार पाच जण कोरस धरायला ठेवले आहेत. ते बरे वाईट प्रतिसाद देतात. मग इतरेजण त्यात जंप घेतात. मग दे धमाल! अस माझ्या मॅनेजरने मला सांगितले हा. मी तिकडे फिरकत सुद्धा नाही. केकू कराव लागत. त्याच्या जोरावर तर मी टाऊन प्लॅनिंग कमिटीचा माननीय सभासद झालो आहे.” एव्हढे बोलून तो गडगडाटी हसला.
केकू करावं लागत. होय शांत्या, आय बिलिव यू. प्रॉब्लेम काय आहे न की कळतं पण वळत नाही.

एकूण शांताराम मानकामे म्हणजे बड प्रस्थ दिसतय.
“मंग्या काय करतो ते सांग. काही शोध वगेरे लावला आहे कि नाही? नोबल का काय ते प्राईझ केव्हा मिळणार आहे? कुठे जॅक लावायचं असेल तर सांग. तुम्ही शोध लावा. किताब लिवा. जॅक लावायचं, पैसा ओतायचे हे काम आपले. होऊ दे खर्चा. दोस्तोके लिये कुछ भी.”
मंगेश रामचंद्र नाईक म्हणजे जिनियस मुलगा. मास्तर गणिताचे कूटप्रश्न विचारायचे त्यांचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्याचे उत्तर तयार! त्याला केम्ब्रिजला जायचं होत. रॅंगलर व्हायचं होत. पण झाल काय? तो नक्षलवादी झाला. जंगलात आदिवासींबरोबर लढ्यात उतरला. मुठभेडमध्ये मारला गेला. ह्यालाच आयुष्य म्हणायचे का!
मी मंग्याची कहाणी सांगत होतो आणि शांत्या ऐकत होता. मंग्याचे गणित अन त्याचे उत्तर. बरोबर का चूक?
आपल्याला हे गणित पडले असते तर आपण कसे सोडवले असते? काय उत्तर काढले असते? ज्याचे त्याचे गणित आणि ज्याचे त्याचे उत्तर!
एक लांब उसासा सोडून तो एव्हढेच म्हणाला, “नशिबाचे खेळ. दुसर काय म्हणायचे?”
थोडा वेळ वातावरण गढूळ झाले. तोंडाची चव गेली. आम्ही दोघेही थोडा वेळ गप्प. जणू मंग्याला श्रद्धांजली,
पाच मिनिटानंतर पुन्हा बातचीत सुरु.
“केकू, तुला आठवतं, तू आणि मंग्या हस्तलिखित चालवत होता. आपले मराठीचे मास्तर नखाते सर जुन्या काळच्या स्वस्ताईच्या फोका मारत होते. काय तर लोणी आळीत तुपाचे नुसते नमुने गोळा करत गेलो तर पाव किलो तूप व्हायचं, मग तुम्ही लोकांनी काय लिहिलं होतं की ते तूप चापून नखात्या इतका फुगला.”
“ते कसंं काय कुणास ठाऊक सरांपर्यंत पोहोचलंंं. अस झापलं आम्हा दोघांना. माझी तर टलीफा होती. नखात्या
आमाला काय म्हणतो की तुमी ह्या चौघांची संगत सोडा.”
“शांत्या, तू काय करतोस? तुझ्यासारखा माणूस राजकारणातच जायला पाहिजे.”
“मी काय धंदे करतो ते तुला सांगण्यासारखे नाही आणि सांगितले तरी तुझ्यासारख्याने ऐकण्यासारखे नाही, आणि पोलिटिक्स बद्दल बोलायचे तर निवडणूक आली की आमदार खासदार येऊन पाय धरतात. पैशाशिवाय निवडणूक? नो चान्स.”
शांत्या, अगेन आय बिलिव यू.
“गाडी बिडी ठेवली आहेस कि नाही?”
इकडे ‘गाडी’ हे समूहवाचक नाम आहे. गाडी म्हणजे कार, मोटार सायकल, स्कूटर, सायकल काहीही.
“आहे स्कूटर आहे.”
“मग आज काढली नाहीस?”
“परवडायला पाहिजे ना.”
“ही माझी कार्डे आहेत. कधी पोलिसांच्या भानगडीत, अरे म्हणजे सिग्नल तोडलास तर आणि मामानं पकडलं तर हे कार्ड दाखवायचं. सगळं पोलीस डिपार्टमेंट आपल्या बंगल्यावर लेफ्ट राईट करत येतं, ही माझी इन्शुरन्स स्कीम आहे.थोडासा हप्ता भरायचा. मग खुशाल सिग्नल तोड किंवा WT प्रवास कर. पकडला गेलास तर हे माझे कार्ड दाखवायचे. नो फाईन. ”
मी कार्ड भक्तिभावाने आदराने कपाळाला लावले आणि खिशात टाकले.
“चला, शांत्या बराच उशीर झाला आहे. हलायला पाहिजे मला.”
“अरे थांब रे. जाशील की. एव्हढी काय घाई आहे. किती दिवसांनी भेटतो आहेस. मला तरी तझ्या शिवाय कोण आहे रे. तुझी आणि मंग्याची कॉपी करून परिक्षा दिल्या आणि इथवर पोचलो. माझे वैभव हे तुमच्यामुळे.”
मला मनातून बरं वाटलं. आता चार चौघात मन ताठ करून सांगता येईल. शांताराम मानकापे साहेब माझे दोस्त आहेत!
त्याचा निरोप घेताना वाईट वाटलं. पण जाणं जरुरी होतं.
वार्डात परत आलो तर नर्सबाई नेहमीप्रमाणं सगळयांच्यावर डाफरत होती.
“चला चला. आपले सामान जागच्या जागी ठेवा. कपड्यांच्या चादरीच्या घड्या करा. मोठ्या साहेबचा फेरा आहे. शर्टाची बटणं लावा. सखू मावशी त्याच्या पायजम्याची नाडी नीट बांध. धम्या, लाळ गळती आहे बघ. तोंड पूस आधी. मावशी त्या परशाला पॉट दे. डॉक्टर यायच्या अदुगर सगळे विधी उरकून घ्या.”
अशी धमाल लगबग चालली होती. खुळ्यांचाच वार्ड तो.
सगळ्यांची विचारपूस करत करत डॉक्टर माझ्या कॉटपाशी आले.
“हा केकू, आज कोणाशी गप्पा मारत होता. काल कोण बर? सचिन तेंडूलकर आला होता भेटायला. आपल्या संघात रहाणेला घ्यावे का हनुमा विहारीला घ्यावे असा तुमचा वाद झाला. आता आज कोण भेटला?”
डॉक्टर अशी माझी रोज टिंगल करतात. मी सांगतो त्यावर विश्वास ठेवत नाहीत. पण आज माझ्याकडे सज्जड पुरावा आहे.
“आज माझ्या शाळेतला मित्र भेटला. शहरातला मोठा माणूस झाला आहे तो. आम्ही शाळेतल्या आठवणींना उजाळा दिला. ही पहा त्याची बिझिनेस कार्ड. पाहिजे तर तुम्ही एक ठेवा. कामाला येईल.” मी विजयी मुद्रेने डॉक्टरांकडं बघितलं. “आता बोला.”
डॉक्टरांनी कार्ड निरखून बघितले. खिशातून मोबाईल काढला. कार्डावरचा नंबर डायल केला. अर्ध्या मिनिटांनी मोबाईल माझ्या कानाशी धरला.
“द नंबर यू हॅव डायल्ड डझ नॉट एक्सिस्ट.”
बा स कुलकर्णी
कथाविश्व - गोड कथांचे अद्भुत विश्व 🎉

06/09/2026

#कथाविश्व

©®Chandtashekhar Gokhale
तीन भावांच एकत्र घर होतं , मग निव्वळ घर लहान पडतं म्हणून तिघे वेगळे झाले पण आपण सणवार एकत्र करायचे हे आधीच ठरलं कारण त्यांच्यात काही वाटण्यांवरून भांडणं नव्हती
दिवाळी आणि गणपती हे दोन मोठे सण त्यांच्यातला एकोपा दाखवाणारे... घरी आलेल्या पाहुण्याना त्याच्या या कौतूकाचे तीन चार आल्बम बघावेच लागायचे..
मग मोठ्या भवाच्या घरी सगळे कौतूकाने जमायचे पण नेमका(?) त्याच्या बायकोला संधीवाताचा त्रास जाणवायला लागला मग गणपती आळीपाळीने प्रत्येकाकडे घ्यायचं ठरलं
मग तस सुरू झालं गणपती तीन घरी फिरायला लागला
मग या जावा जावानी ठरवलं दर वर्षी गणपतीला एक एक वस्तू करायची ज्याची गणपती ठेवायची टर्न असेल त्याला त्यातून सुटका मग चांदीची समयी, तबक, निरांजनाची जोडी, असं काय काय दरवर्षी जमायला लागलं वर्षभर ते मोठ्या भावच्या लाँकरला असायचं गणपती पुरतं ते बाहेर काढलं जायचं खूप साधी सरळ गोष्ट..
पण नकळत त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली मग हिने काय दिलं त्याच्या वरचढ आपण आणि आपल्या वरचढ ती काय देते या कडे लक्ष मग वर्षभर त्याची बेगमी करत राहयचं
त्यात धाकट्या भावाची परिस्तिथी जरा नाजूक झाली घराचे हप्ते त्यात बाकीचे खर्च तरी एक वर्ष त्यानी बसायच्या सतरंज्या घेऊन निभावलं जरा कुजबुज झाली पण सतरंज्या हव्याच होत्या असही म्हणणं पडलं
पण मग धाकट्याने कामाचा व्याप वाढवला तशी पैशांची तंंगी जाणवायला लागली.. झेपत नाही तर सांगितला होता कोणी व्याप वाढवायला ? असा सामान्य सूर लागला (त्यात त्याची नंतर होऊ शकणारी भरभराट सुद्धा गृहीत धरली जात असावी)धाकटा जरा एकटा पडल्या सारखा झला आधी सगळं घडा घडा बोलायचा मग मोजकंच बोलायला लागला त्यामुळे मोठे दोघे एक झाल्या सारखे झाले
एका गणपतीला धाकट्याची गणपतीसाठी काही घेण्याची टर्न होती त्याने बायको जवळ आपली परिस्तिथी कबूल करून टाकली तिने समजुतीने घेतलं आणि पायातले पैंजण विकून करंडा घेतला धाकट्याने करंडा घेतल्याचं मधलीला कळलं तिने मुद्दाम करंडाच घेऊन धाकटीला तत्परतेने कळवलं करंडा सोडून काहीही घे... धाकटीचा नाईलाज झाला.. तिने सांगितलं करंडा आँलरेडी घेतलाय
गणपतीसमोर तिची बरीच टेर खेचली गेली ती ही गमतीत हं(?)
मग आवर्जून तिला सांगितलं पुढच्या वर्षी तुमच्या कडे गणपती असला तरी ही टर्न उधार राहिली तुझ्यावर...
आणि योग असा की धाकटा ऐन गणपतीच्या आधी आजारी पडला त्याला कावीळ झाली मग हिने गणपतीची टर्न नाकारली... मग तर वर्षभर त्यावरून गहजबच झाला
आणि त्याच्या पुढच्या वर्षी धाकट्याची परिस्तिथी वारेमाप सुधारली त्याचा व्यवसाय वाढला तशी विचार करायची पद्धतही बदलली, आता सणा वाराचा वेगळा विचार सुरू झाला स्नेहं संबंध वाढवण्यासाठी त्याला अशी आँकेजंस बरी वाटायला लागली
गणपतीच्या बहाण्याने त्याला त्याच्या उद्योगातल्या मंडळीना घरी बोलावता आलं असतं गणपती त्याला खर्‍या अर्थाने साजरा करायचा होता ्म्हणून त्याने दिमाखात या वर्षी गणपतीची टर्न मागून घेतली पण त्या दोघाना याच्या दिमाखात सहभागी होणं जरा जडच गेलं
त्याचं धाडस फसलं असतं तर एकवेळ त्यानी मोठेपणा दाखवला असता..
पण त्याचा स्वत: बद्दलचा अंदाज खरा ठरला होता भरभराट आली होती.त्यात त्या दोघाना मनापासून सहभागी होणं जमेना.. हल्ली हातचं राखूनच वागत असतो असे ताशेरे झाडून ते समर्थन करत होते..गेल्यावेळी गणपती आणयला जमलं नाही म्हणून या वर्षी. त्याने आपणहून टर्न मागितली.. त्याने मागूनही ती त्याला दिली गेली नाही दोघानी ते साफ नाकारलं
आणि नाईलाजाने(?) धाकट्याने स्वत:चा वेगळा गणपती आणला त्याला जो नाईलाज म्हणत होता तो त्याचा इगो होता हे त्याच्या लक्षातही आलं नाही...
मग कालांतराने तिघांकडे गणपती यायला लागले आणि अशाप्रकारे... गणपती आणणार्‍यांची संख्या दरवर्षी वाढायला लागली....
कथाविश्व - आपले एकीच्या कथांचे अद्भुत प्रेमळ विश्व 🎉✨💫

शैतान बच्चा  #कथाविश्व 🎉🤩शेवटचा पीरियड घेऊन शुभदा स्टाफरूम मध्ये आली.आपले नोट्स,पुस्तक कपाटात ठेवून लाॅक केलं. घड्याळाकड...
06/09/2026

शैतान बच्चा

#कथाविश्व 🎉🤩

शेवटचा पीरियड घेऊन शुभदा स्टाफरूम मध्ये आली.आपले नोट्स,पुस्तक कपाटात ठेवून लाॅक केलं. घड्याळाकडे नजर टाकली सव्वापाच वाजत होते. आज रंजू आणि दिपा आल्या नव्हत्या त्यामुळे आज आपल्याला एकटेच जावे लागेल म्हणून थोडं कसतरीच झालं.
"चला शुभदा मॅडम निघायला हवं..." मनातल्या मनात बोलत शुभदा काॅलेजच्या बाहेर पडली. साडेपाच ची बस मिळायला हवी म्हणून थोडी वेगातच चालत होती. तिच्याकडे स्वतःची स्कूटर होती पण मध्यंतरी एक ऍक्सिडेंट काय झाला तीने स्कूटर चालवणेच बंद केले. आता रोज दिपा आणि रंजू सोबत बसनेच जाणंयेणं करायची.
"मॅडम... मॅडम.." कुणीतरी मागून हाक मारली तसा तिचा चालायचा वेग कमी झाला. एक तरूण मुलगा तिच्या जवळ आला.
"शुभदा मॅम का तुम्ही?"
आता आपली बस सुटणार की काय या लगबगीने ती बोलली.
"हो मी शुभदा मॅडमच आहे. काय हवे तुला?"
"मॅम तुम्ही मला ओळखले का?"
एक तर बसची वेळ झालेली आणि हा तरूण वाट अडवून विचारतोय मला ओळखलं का?
राग तर आला पण त्या मुलाच्या चेह-यावरचे नटखट भाव पाहून राग कुठच्या कुठे गेला.
"नाही रे बाळा नाही ओळखले. कोण तु?"
"मॅम नुतन विद्यानिकेतन शाळा.... बारावी ब चे सुमित, अनंत,अनिल, केटी राजू."
माझ्या डोळ्यासमोर नुतन विद्यानिकेतन शाळा आली. बारावी ब म्हटले आणि मला तो उनाड वर्ग आठवला. शिक्षक म्हणून काम करतांना एक तर खुप हुशार मुले नाहीतर खुप मस्तीखोर मुले लक्षात राहतात. बारावी ब हा त्यातलाच एक..
"आठवले का मॅम?" त्याचा प्रश्न ऐकून ती हसत बोलली
"आठवलं बाळा.अरे त्या सारखा मस्तीखोर वर्ग परत कधी बघायला मिळाला नाही.तुझं नाव काय?"
"मी सुमित मॅम. तुमचा शैतान बच्चा."
"सुमित! अरे तु तर खुप बदललास. काय करतोस तु?
"मॅम, तुम्हाला जर थोडा वेळ असेल तर काॅफी घेऊयात का?"
शुभदाने घड्याळाकडे बघीतले बस निघून गेली होती. आज ऑटोनेच जाऊया असं ठरवून ती बोलली.
"ठीक आहे चल."
जवळ असलेल्या एका हाॅटेल मध्ये दोघं आली.
"मॅम, तुम्ही बसा मी आलोच पाच मिनीटात." तिला बसवून तो काउंटर वर कुपन घ्यायला गेला.
तिला नुतन विद्यानिकेतन शाळा आठवली...बारावी ब वर्ग आठवला आणि आठवला सुमित.. सगळ्यात मस्तीखोर मुलगा.मी त्याला शैतान बच्चा म्हणत असे.आणि अचानक आठवला तो एक दिवस...
बारावी ब वर्गाला मी शिकवत होते आणि एकाएकी वर्गात गोंधळ झाला.
" मॅम...मॅम... सुमितला बघा काय झालय."मी हातातले पुस्तक टाकून धावले.. बघते तर सुमित डेस्कवर डोकं टेकवून होता आणि तोंडातून फेस येत होता. मी सर्व शक्ती निशी ओरडली.
"याला उचला लवकर आणि बाहेर चला,"
दोघा चौघांनी त्याला उचलले.
मी धावत बाहेर आली शाळेच्या बाहेर एक ऑटो ऊभा होता त्यात मी आणि एक टीचर बसलो आणि तडक दवाखान्यात नेलं.सुरवातीला डाॅक्टर हात लावायला तयार नव्हते कारण पोलीस केस होती. पण एक ओळखीचे डाॅक्टर निघाले आणि त्यांनी त्याला लगेच ऍडमिट केलं. इथे सुमित त्याच्या दुरच्या नातेवाईंकाकडे रहात होता तर आई गावी राहत होती. त्यावेळेस फोन वगैरे फारसे कोणाकडे नसल्यामुळे त्याच्या घरी कसे कळवावे हाही पेच होता.
तासाभरात डाॅक्टर बाहेर आले आणि म्हणाले
"या पोराने कुठले तरी विष खाल्ले होते. लवकर आणल्यामुळे बरे झाले नाहीतर भलतच काही झाले असते. पोलिसांना कळवायचे का?
तसा तो आता आऊट ऑफ डेंजर आहे. एवढ्या कमी वयात त्याला पोलीसांचा जाच व्हायचा... बघा तुम्ही."
मी आणि सोबतचे टीचर दोघेही घाबरलो. शाळेत मुख्याध्यापिका मॅडमला सांगितले. त्या पण म्हणाल्या पोलिस केस करू नका.
आम्ही सर्व आश्चर्यचकित होतो की एवढ्या मस्तमौला मुलाने एवढा टोकाचा निर्णय का घेतला असावा.
सोबतचे टीचर बोलले," मॅडम तूम्ही मानसशास्त्र शिकवता तुम्ही थोडं विचारून बघा,"
मी म्हटले,"तो एकदा बरा तर होऊ द्या मग बोलते."
दुस-या दिवशी त्याला सुटी झाली. मी त्याला माझ्या घरी नेलं. त्याच्याकडून जे कळले ते फारच दुखःद होते.
लहान असतांनाच वडिल वारले होते. आई शेतमजुरी करायची. सुमित इथे दूरच्या एका काकांकडे रहात होता. काकांच्या किराण्याच्या दुकानात तो शाळा सुटल्यानंतर रात्री 10 पर्यंत बसायचा. घरचे पण बरेच कामं करून द्यायचा. तरी काकूच्या नजरेत त्याचं तिथे राहणं खुपायचं. काल तिने त्याच्यावर पैसे चोरल्याचा आरोप लावून त्याला खुप वाईट बोलली, मारलं सुध्दा. सांगतांना तो खुप रडत होता मी त्याला बोलली," बेटा तुझ्या आईने तुला इथे पाठवले होते ते असं स्वतःला संपवण्यासाठी नाही तर तु काही तरी आयुष्यात करून दाखवावं म्हणून ना... यानंतर असं काहीही करायचा विचार आला ना तर आपल्या आईचा चेहरा आठवायचा,तीचे कष्ट आठवायचे."
त्यानंतर आम्ही त्याची एका होस्टेल मध्ये राहण्याची सोय केली. तो इतका स्वाभिमानी की आपला खर्च तो इतरत्र काम करून भागवत असे. बारावीत 75% मार्क पडले. त्यानंतर तो एकदा मला तेवीसशे रूपये मागायला आला होता. कुठल्या चांगल्या काॅलेजमध्ये ऍडमिशन करण्यासाठी. त्याच वर्षी मला इथे काॅलेजला नोकरी लागली आणि मग मी इकडे शिफ्ट झाली.
"मॅम घ्या," सुमितने सँडवीचेस समोर ठेवले.तशी शुभदाची तंद्री भंग पावली.
"अरे कशाला आता घरीच जायचंय."
"मॅम मला जोरात भुक लागली आहे आणि तुमच्या समोर मी एकटाच खात बसलो तर तुम्हीच म्हणाल शैतान बच्चा एकटाच खातोस का?" तो इतक्या बालिशपणे बोलला की मला जुना सुमित आठवला.
"शैतान बच्चा तु सांगितले नाहीस तु काय करतोस ते."
"मॅम, बारावी नंतर मी पत्रकारीता कोर्स केला होता. त्यासाठीच तुमच्याकडून तेवीसशे रूपये घेतले होते. तीन वर्षानंतर मी पैसे परत करायला आलो होतो पण तुम्ही विद्यानिकेतन सोडून गेल्या होत्या. मी तुम्हाला शोधायचा खुप प्रयत्न केला. पण तुमचा पत्ता मिळाला नाही. आज मी इकडे जवळच्या परिसरात आलो होतो तर तुम्ही दिसल्या."
"म्हणजे आता तु पत्रकार आहेस."
"पत्रकार नाही मॅम मी संपादक आहे."
"अरेव्वा, खुप छान शैतान बच्चा अभिनंदन."
"मॅम, हे सर्व मी तुमच्यामुळेच करू शकलो. तुम्ही मला मृत्यूच्या दाढेतून काढले. मला नवी दिशा दिली.काहीही आढेवेढे न घेता तेवीसशे रूपये दिले. मॅम मी आज जे ही करू शकलो सर्व तुमच्यामुळेच." म्हणता म्हणता त्याचा कंठ दाटून आला डोळ्यात अश्रु आले.
"अरे मी काही विशेष केलं नाही."
सुमित उठला आणि माझ्या पायाशी वाकला.मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, "शैतान बच्चा काॅफी पाजतो म्हणाला होतास कुठे आहे काॅफी."
"ओह.. साॅरी मॅम,"तो डोळे पुसत उभा राहीला,
"आता घेऊन येतो," म्हणत काउंटर कडे निघाला. नकळत शुभदाचेही डोळे पाणावले. आपले स्वतःचे मुल नसले तरी काय झाले.सुमित सारख्या कित्येकांचे प्रेम जे आपल्याला मिळते ते काय कमी आहे. ती काॅफी घेऊन येणा-या सुमित कडे बघून विचार करू लागली.
वैशाली गोस्वामी.

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
कथा आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करतांना नावासकट शेयर करा ही विनंती.
कथाविश्व - आपले कथांचे अद्भुत विश्व 🎉

 #वरणभात! #कथाविश्व Ⓒपूजा खाडे पाठकझोपेत जोरात अमित चा हात भिंतीवर आपटला आणि तो खाडकन जागा झाला .. श्वासोच्छवास जोरात सु...
05/09/2026

#वरणभात!
#कथाविश्व
Ⓒपूजा खाडे पाठक

झोपेत जोरात अमित चा हात भिंतीवर आपटला आणि तो खाडकन जागा झाला .. श्वासोच्छवास जोरात सुरु होता .. कसलीतरी बेचैनी भरून राहिली होती मनात .. हल्ली हे रोजचंच होतं .. रोज विचित्र स्वप्न .. कधी गाडी सुटलीये .. कधी परीक्षा चुकलीये .. कधी चुकीच्या बोर्डिंग गेट ला गेलो आणि फ्लाईट चुकली .. थोड्या वेळाने त्याला स्वप्न आठवलं .. अगदी लक्ख .. काहीतरी हरवलं होतं .. काय ते आठवत नव्हतं पण तो अगदी ते जिवाच्या आकांताने शोधत होता .. सापडेना तेव्हा वैतागून त्याने झोपेत जोरात हात फिरवला आणि हात भिंतीला आपटून त्याची झोपमोड झाली .. विचार करता करता अगदी पहाटे त्याला झोप लागली ..

सकाळी नेहमीप्रमाणे आवरून तो ऑफिस ला गेला .. जेवायची वेळ झाली तसे त्याने घड्याळ बघितले .. "तिकडे आत्ता १० वाजून गेले असतील .. " तो मनात म्हणाला .. "करावा का फोन .. ?" त्याला क्षणभर वाटलं पण त्याने तो विचार झटकून टाकला ..

सलग ४ वर्षे तो घरी गेला नव्हता. अगदी लहान असल्यापासून तो हॉस्टेल ला होता. वडील फार कडक तर आई फार नरम म्हणून त्याला हॉस्टेल ला ठेवायचा निर्णय त्याच्या आर्मीत असणाऱ्या आजोबांनी घेतला होता .. नंतर तोच त्याच्या व्यापात इतका गुंतून गेला कि त्याला घराची आठवण च येईनाशी झाली.

इतक्यात त्याचा फोन वाजला. "काय रे, महिना झाला फोन केला नाहीस आणि केला तर उचलत नाहीस.. " आई तक्रारीच्या सुरात म्हणाली. "काम खूप आहे ग आई. घरी सगळं ठीक आहे ना?" त्याने विचारले. "तसं ठीकच आहे .. बाबांची अँजियोप्लास्टी झाली १० दिवसांपूर्वी." आई म्हणाली. "काय ?? अग कळवायचं ना मग?? मेसेज करून ठेवायचा?? काय ग तू आई??" तो म्हणाला. "अरे त्याने काय होणार? तेवढ्यासाठी तुला कशाला बोलवायचं? झालं सगळं व्यवस्थित.. पण.. तू येऊन जा जरा .. किती वर्ष झाली आला नाहीस .. इतकं कसलं रे काम असतं ?" आई म्हणाली ..

"ठीक आहे, बघतो यंदा .. " तो म्हणाला. त्याच्या मनानं उचल खाल्ली. विचार बदलायच्या आतच त्याने तिकीट हि बुक केलं. का कोण जाणे पण त्याला बऱ्याच वर्षांनी घरी जायची ओढ लागली होती ..

अगदी एअरपोर्ट पासून त्याच्या घरापर्यंत सगळंच खूप बदललं होतं, माणसंही! बाबा खूप थकले होते, आणि आई अगदी वयस्कर दिसायला लागली होती. त्याला अगदी अपराध्यासारखे वाटू लागले. १-२ दिवस आराम करून झाल्यावर तो सहज म्हणून सोसायटी च्या आवारात चक्कर मारायला म्हणून बाहेर पडला .. काही गोष्टी मात्र जश्याच्या तश्या होत्या! काही दुकानं , नाका, बस स्टॉप, जिन्याजवळची लपायची जागा, जांभळाच झाड!

त्याच तंद्रीत तो घराजवळ आला आणि तोच ओळखीचा गंध! तो भारावल्यासारखा घरात शिरला .. सकाळचे अकरा - साडेअकरा वाजत आले होते.. हॉल मध्ये तीच विशिष्ट उदबत्ती आणि अष्टगंधाचा सुवास, आणि त्यात स्वयंपाकघरातल्या कुकरच्या शिट्टीतून वरण-भाताचा गंध मिसळलेला .. सुबक आवरलेला हॉल , तिथेच कोपऱ्यात शिवमहिमन स्तोत्र म्हणणारी आई. अगदी हवंहवंसं वाटत होतं त्याला ते सगळं .. खूप जवळचं ! आश्वासक! नकळत तोही स्तोत्र म्हणायला लागला. लहानपणी अगदी तोंडपाठ होतं त्याचं ते स्तोत्र! म्हणून झालं तोपर्यंत बाबा बाहेर येऊन बसले होते. "चला, पोळ्या करते मग पानं घेऊ .. " आई उठत म्हणाली .. "नको आई - आज फक्त वरण - भात दे मला .. आणि सोबत तूप लिंबू .. आणि हो, लहानपणी द्यायचीस तसा कालवून दे!" तो म्हणाला. "आणते!" म्हणत आई खुश होऊन स्वयंपाक घरात गेली .. "लिंबाचं लोणचं केलय ते वाढ ग त्याला .. आवडतं त्याला .. " त्याच्याकडे न बघताच बाबा म्हणाले .. त्याच्यासाठी हा सुखद धक्का होता! आई अगदी कौतुकाने त्याच्यासाठी वरण भात घेऊन आली. "भरवू का रे? चालेल का?" तिने चाचरत विचारले.. "हो भरव कि .. " तो म्हणाला ..

कित्येक वर्षात इतक्या प्रेमाने तो घरातल्यांशी बोललाच नव्हता!

आईच्या हातून त्याने एक घास खाल्ला आणि .. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले!

त्या संध्याकाळी सगळे बागेत फिरायला गेले .. लहानपणी तो मध्ये असायचा आणि आई बाबा त्याचा हात धरायचे .. यावेळीही तोच मध्ये होता, पण त्याने आई बाबांचा हात धरला होता! छानपैकी भेळ खाऊन सगळे घरी आले. आईने खिचडी आणि भजीचा बेत केला .. रात्री पत्त्यांचा डाव रंगला! आईने छान डोक्याला मालिश करून दिली, आणि अमित झोपायला त्याच्या खोलीत गेला ..

रात्री परत तेच स्वप्न .. पण यावेळी स्वप्नात त्याने गाडी पकडली होती .. आणि ती त्याला थेट त्याच्या घरी घेऊन आली होती ..

हातातून निसटून जाणारं "घर" त्याला परत मिळालं होतं!

Ⓒपूजा खाडे पाठक
कथाविश्व - आपले भावपूर्ण कथांचे अद्भुत विश्व 🎉✨💫

 #कथाविश्व आता कोणी मला स्वीकारेल असं नाही वाटत ... मला कोणी जीव लावेल  प्रेम करेल असं वाटत नाही ग गायत्री .. पहिल्या लग...
05/09/2026

#कथाविश्व

आता कोणी मला स्वीकारेल असं नाही वाटत ... मला कोणी जीव लावेल प्रेम करेल असं वाटत नाही ग गायत्री .. पहिल्या लग्नात इतका विचित्र अनुभव आला न.. या सगळ्यात जर काही छान घडलंय तर ते म्हणजे मी भगवंत वेडी झाले..आपण भेटलो.. आपली इतकी मस्त मैत्री झाली .. पण मला नाही वाटत की आता कोणी जोडीदार माझ्या आयुष्यात येईल..

अगदी काल काल पर्यंत माझ्याशी या सगळ्या गप्पा मारणारी माझी वेडी मैत्रीण .. पहिल्या लग्नात शारिरीक मानसिक खूप खूप त्रास सहन केलेली ... आणि मग वैतागून वेगळं होण्याचा निर्णय घेतलेली.. करणार तरी काय समोरचा बदलेल अशी चिन्हच दिसत नव्हती अजिबात.. त्यात जातीत च सगळं घडलं पाहिजे असा घरच्यांचा आग्रह .. ती सुद्धा त्यांच्या मताच्या विरुद्ध न जाणारी ..

आता कायद्याने वेगळं होऊन तिला १ वर्ष झालं असेल.. पण ती प्रोसेस गेले ५ वर्ष चालू होती..घरचे तिच्या नवीन आयुष्यासाठी धडपड करत होते.. पण हीच आधीच लग्न तो सगळा भूतकाळ म्हणून सगळीकडून नकार यायचा.. घरचे त्यांचं काम करत होते आणि ही आपल्या कृष्णभक्तीत हळू हळू स्वतःला समर्पित करत होती .. खूपदा घरचे तिच्या बहिणी भावंड तिला हसायचे की काय करतोय तुझा कृष्ण... बघावं तेव्हा तुझ्या हातात माळ असते.. आता काय त्याला माहित नसेल का की तुझ्यासाठी आम्ही जोडीदार बघतोय पण कुठून पण होकार येत नाहीये .. ही फक्त हसून शांत बसायची..

भक्त न कधी वादविवादात शक्यतो पडत नाही..तिला खूपच असह्य झालं की मला येऊन सांगायची आणि मन मोकळं करायची.. तिची सगळी परिस्थिती मी अगदी जवळून पाहिली आहे.. ती जेव्हा मला बिलगून रडायची न तेव्हा नेहमी मनात यायचं की अरे तोच आहे सांभाळणारा.. एकदा तिला शांत करताना पटकन मी बोलून गेले...की इतका छान तुला जीवाला जीव देणारा जोडीदार भेटेल न की घरचे पण अगदी आश्यर्यचकित होतील .. त्यानेच माझ्याकडून हे बोलून घेतलं असणार .. वाटायचं नेहमी की तो करेल सगळं छान ..

काल अचानक घरी आली आणि दारातच मिठी मारली.. मला कळेना ..गायत्री, काल एक काका घरी आले होते ज्यांना माझ्याबद्दल सगळं माहीत आहे..त्यांच्या घरात माझ्याबद्दल खूप बोलणी चालू होती.. त्यांच्या मुलासाठी त्यांनी पप्पाना माझ्याबद्दल विचारपूस केली ..त्याच अग हे पहिलंच लग्न आहे .. त्याच्याशी बोलून मगच काका घरी आले होते.. जेव्हा हे सगळं घडत होत तेव्हा पपांना कळतच नव्हतं की इतके दिवस झाले आम्ही भटकतोय पण नकार येतोय आणि आज स्वतःहून चालून हे स्थळ आलं.. पप्पा मुलाला चांगलं ओळखतात कारण त्यांच्या मित्राचाच मुलगा न .. त्यामुळे कसलीच काळजी नाही.. ओळखीतील आहे सगळं.. ४ दिवसांनी ते आपल्या घरी येणार आहेत.. माझं लग्न होतंय म्हणून आनंद आहेच ग पण आज हे सगळं अचानक समोर आणणारा कोण..त्या काकांना बुद्धी देणारा कोण.. या विचाराने या त्याच्या मला सावरण्याच्या अंदाजाने मला भरून यायला होतंय ग..

माझ्या कृष्णाने मला सांभाळलं..त्याचीच कृपा ही... जेव्हा बहिणींना हे सगळं कळलं न त्या म्हणाल्या बघीतली ग भक्तीची जादू आज स्वतःच्या डोळ्यांनी ...

तो बघत असतो...तो सांभाळत असतो ..कधी कधी काही प्रसंग येतात समोर की वाटत अरे तू सोडलं का मला ...इतका त्रास होतोय मग कुठे आहेस तू.. पण हे तितकंच खरं की एकदा तुम्ही त्याच्या चरणांचा आश्रय घेतला तर तुम्ही भटकू शकता पण तो तुमचा हात तुमची साथ कधीच सोडत नाही ... जेव्हा दुःखात तुमच्या डोळ्यातून काही अश्रू येत असतात न तेव्हा तुम्हाला होणार त्रास बघून तो अश्रूंनी चिंब भिजलेला असतो...त्याला त्याच्या भक्ताला झालेला त्रास नाही हो बघवत ..

गरज असते ती समर्पणाची.. स्वतःला त्याच्या चरणी पूर्णपणे बहाल करण्याची 🌹

@गायत्री पोफळे
राधा राधा!!! 💕
कथाविश्व - गोड कथांचे अद्भुत विश्व 🎉

05/09/2026

--------------चॅलेंज ---------------
#कथाविश्व
लेखक -प्रदीप केळूस्कर 9307521152/9422381299
हेमाचा मेकअप सुरु होता.. पंढरी दादा तिला अस्वली बनवत होते.. अस्वली.. एका जंगली बेटाची राणी..
एक आदिवासी राहिलेले बेट... उर्वरित जगाचा फारसा संपर्क नसलेले बेट.. राणी धरून सारेच जंगली.. दाट जंगल आणि त्यात वहाणारे झरे.. मोठमोठे वृक्ष, वृक्षाच्या ढोली.. असंख्य रानटी प्राणी, सरपंटणारे असंख्य जीव.. प्राणी मारून खाणारी माणसे.. त्त्यांची राणी अस्वली..
या नाटकात हेमा या राणीची म्हणजेच अस्वलीची भूमिका करणार होती..हेमाचा मेकअप सर्वात कठीण, म्हणूंन मुख्य मेकअपमन पंढरीदादा स्वतः तिचा मेकअप करत होते, त्त्यांचे दोन सहकारी इतरांचा मेकअप करत होते..
हेमाचा मेकअप संपताच जयाने तिच्या अंगावर अस्वलीचे कपडे चढवळे.. पायात, हातात कडी घातली.. कमरेला चामड्याचा जाड पट्टा बांधला.. डोक्यावर मोरपिसे खोवलेला मुकुट चढवीला.. राणी अस्वलीची तयारी झाली आणि स्पर्धेच्या नाटकाची पहिली बेल खणखणली.
स्टेजवर गडबड होती.. हा या नाटकाचा पहिलाच प्रयोग,राज्य नाट्य स्पर्धेत सादर होणार होता..संस्था मान्यवर, आज पर्यत चार वेळा अंतिम स्पर्धेत पहिला नंबर मिळविलेली,मुंबईतील एक बलाढ्य कंपनी.. त्याचा कला विभाग दरवर्षी स्पर्धेत भाग घेत होता.. या करिता बऱ्याच होतकरू कलाकारांना या कंपनीत नोकरी दिलेली. आर्थिक पाठबळ होतच.. उत्तम दिग्दर्शक कंपनीत नोकरीला होते, सर्वात महत्वाचे म्हणजे नाट्यलेखक विनायकराव याच कंपनीत. विनायकराव हे नाव गाजत होते.. स्पर्धेच्या नाटकात आणि व्यवसायिक रंगभूमीवर सुद्धा.. अस्सल नवीन नवीन प्रयोग त्यान्च्या नाटकात दिसत.. कलाकारांना चॅलेंज असे.. पण कंपनीत अनेक उत्तम कलाकार होते.
त्यामुळे नाटक पहिले.. दुसरे येतच असे.
हेमा स्टेजवर आली.. दिग्दर्शक विकास लाईट व्यवस्थित येतात काय, याचा अंदाज घेत होता.. लाईट करणाऱ्या विराजला सूचना करत होता.. या नाटकात लाईव्ह म्युझिक होत.. त्यामुळे ढोल, ड्रम, ताशे, तुतारी,लेझीम घेऊन वादक विंगेत तयार होते... नाटकात दोन प्रवासी बोट भरकटल्यामुळे या बेटावर आलेले असतात.. ते दोन प्रवासी आणि बेटावरील आठ जंगली माणसे आणि त्त्यांची राणी अस्वली... हेमा अस्वलिची भूमिका करत होती.
दुसरी बेल झाली आणि प्रेक्षक आणि स्पर्धेचे तीन परीक्षक जागेवर येऊन बसले.
स्टेजची पूजा झाली होती.सर्व कलाकार स्टेजवर आले.. एकमेकांना शुभेच्छा देऊ लागले.. हेमाने सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या आणि ती मधून थोडा पडदा उघडून प्रेक्षगृहात पाहू लागली.. प्रेक्षागृह प्रेक्षकांनी भरलेले होते.. अनेक नाटकाचे दर्दी पहिल्या काही रांगेत होते.. आणि मधोमध बसले होते.. नाटकाचे लेखक विनायकराव..
विनायक सरांना पहाताच हेमाच्या काळजात धडधडले.. तसे नाटक सुरु होताना प्रत्येक कलाकारांचे काळीज धडधडते.. पण हेमाचे जरा जास्तच..
त्याला कारण पण तसेच होते...
दोन महिण्यापुर्वी विनायकसरांनी नवीन नाटक विकासच्या हातात दिले.
विकास हा या ग्रुपचा अनुभवी आणि यशस्वी दिग्दर्शक... विकासने नाटक वाचले.. विनायक सरांनी या वर्षी पण अत्यन्त उत्तम आणि करायला कठीण असे नाटक लिहिले होते.. एका बेटावर घडणारे.. जल प्रवास करताना वाट चुकलेले दोन प्रवासी आणि बेटावरील जंगली माणसे.. आदिवासी सारखी.. आणि त्त्यांची राणी.
विकास आणि त्याच्या सहदिग्दशकाने कलाकार ठरवले होते.. तसे बहुतेकजण ग्रुपचे अनुभवी कलाकार होतेच पण अत्यन्त महत्वाची राणीची भूमिका दिली हेमाला.
आणि याचमुळे विनायकसर आणि विकास यांचे वाजले.. चिडलेले विनायकराव विकासला सांगत होते.
'विकास.. तू दिग्दर्शक म्हणून ग्रेट आहेस पण हे काय चालवले आहेस?
', काय झाल सर?
'अरे राणीची भूमिका त्या हेमाला दिलीस? या नाटकातील राणी कशी हवी.. जंगलात राहणारी... तसे वेष घातलेली.. क्रूर.. कुणाचाही जीव घेणारी.. कुस्ती करणारी.. शिव्या देणारी.. कच्चे मांस खाणारी.. आणि ही हेमा माहीममध्ये राहणारी पांढरपेशी बाई.. पुणेरी शुद्ध. मराठी बोलणारी.. नाजूक आवाजात बोलणारी. ही आदिवासी नृत्य करू शकेल? कुस्ती करेल? दारू पिण्याची ऍक्टिंग करेल?
'सर्व काही करेल विनायक सर.. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा.. दोन वर्षांपूर्वी तिने झुंज नाटकातील रखमा केली होती.. आठवत?
'आठवत.. अरे झुंज मधील रखमा केवळ अर्धा तास स्टेजवर असते.. या नाटकात ही राणी अस्वली अडीच तास... इथे नाच आहेत..कर्कश ओरडणे आहे..
'हेमा करेल.. माझा तिच्यावर विश्वास आहे..
रागाने विनायकसर बाहेर पडले. खरं तर या आधीच्या त्यान्च्या प्रत्येक नाटकाच्या तालमीना ते हजर असत.. पण या नाटकाच्या एकही तालमीला ते आले नाहीत.. मागील आठवड्यात दोन रंगीत तालमी केल्या.. त्याला विकासने फोन करून बोलावले, पण. विनायक सर आले नाहीत..
पण आज नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला विनायक सर पहिल्या रांगेत बसले होते.
विकासचे आणि विनायकसरांचे तुतूमिमी झाल्याचे दुसऱ्या दिवशी हेमाच्या कानी आले... ती विकासला भेटायला गेली..
'विकाससर.. मला अस्वलीची भूमिका देण्यावरून लेखक नाराज आहेत असे समजले.. त्त्यांचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही दुसरी कलाकार निवडा..
'नाही.. हेमा, ही भूमिका तूच करायची.. या आधी दोन नाटकात तू काम केलंस.. चांगल केलंस.. तू आहेस पांढरपेशी.. याचा अर्थ असा नाही की अस्वलीची भूमिका करू शकणार नाहीस.. कलाकाराला चॅलेंज स्वीकारावं लागत.. तो जसा दिसतो.. तशीच त्याने भूमिका केली तर त्याचे कौतुक कसले? दिलीप प्रभावाळकरांनी अंडीवाला स्टेजवर उभा केला.. खरोखरच्या आयुष्यात ते किती साधे दिसतात.. पण स्टेजवर?
अस्वली हे तुझ्यासाठी चॅलेंज आहे हेमा.. अशी भूमिका नटाला आयुष्यात कवचितच मिळते. तुला ती मिळाली आहे.. हे चॅलेंज आहे तुझ्यासाठी.. या भूमिकेसाठी लोकांनी तुला आठवायला हवं...
'होय विकाससर.. तुम्ही माझ्याकडून मेहनत करून घ्या.. मी चॅलेंज स्वीकारते आहे.
हेमाने दीर्घश्वस घेतले आणि ती अस्वलीच्या भूमिकेसाठी सज्ज झाली.. तिच्या कानात विकाससरांचे शब्द ऐकू येत होते...'हेमा.. स्टेजवरील कलाकाराला चॅलेंज वाटावे अशी भूमिका एकदाच मिळते.. ती तुला अस्वलीच्या भूमिकेमुळे मिळणार आहे.. स्वीकार हे चॅलेंज...
नाटक सुरु झाले.. दुसऱ्या प्रवेशात अस्वलीची एन्ट्री..पहिला प्रवेश मनासारखा होत नव्हता म्हणून विंगेत विकास चरफडत होता.. केस उपटत होता.. पण दुसऱ्या प्रवेशात रानटी.. जंगली अस्वली आणि तिच्या बेटावरील लोकांनी स्टेजवर प्रवेश केला आणि नाटकाचा टेम्पो वर चढला.. वर चढला आणि तो चढतच राहिला...यात अस्वलीचे मॉबसह नृत्य होते.. मारामारी होती.. तलवारबाजी होती.. खटकेबाज सवांद होते.. यात कुठेही हेमा कमी पडली नाही.. उलट नेहेमी हेमाला पहाणारे आश्रयचकित होत होते.
दुसऱ्या अंकात अस्वलीचे वेगळे रूप होते.. ती बेटावर आलेल्या एका तरुणाच्या प्रेमात पडली होती.. त्या तरुणाकडून तिला रिस्पॉन्स नव्हता.. त्यावेळी तिच्या मनाची झालेली अवस्था हेमाने उत्तम दाखवली... नाटक कमालीचे रंगत होते. सर्वच कलाकार उत्तम अभिनय करत होते.. मनाला खिलवून ठेवणारे नाटक संपते.. तेंव्हा काहीतरी विलक्षण पहिल्याने प्रेक्षक समाधानाने बाहेर पडत होते.
नाटक संपले आणि प्रेक्षकांचा लोंढा आत घुसला.. प्रत्येकजण दिग्दर्शक विकास आणि अस्वली झालेल्या हेमाचे कौतुक करत होता.
प्रेक्षकात सुप्रसिद्ध दिग्दर्शक दामू केंकरे, कवी प्रवीण दवणे, हेमू अधिकारी, प्रशान्त दळवी अशी मान्यवर मंडळी होती.. ती सर्व भेटून आणि कौतुक करुंन गेली.. हेमाचा नवरा हेमंत, कन्या आश्विनी यांच्या डोळ्यातून कौतुक आणि अभिमान ओसंडून वहात होता.
हेमाला एवढे कौतुक अपेक्षित नव्हते.. नाटकाचा दिग्दर्शक विकास तर तिचे कौतुक करून करून थकला होता, पण....
पण ती वाट पहात होती.. नाटकाच्या लेखकाची.. विनायक सरांची.. ज्यांनी तिच्या भूमिकेला विरोध केला होता.पुन्हा पुन्हा तिचे लक्ष मेकअपरूमच्या दाराकडे जात होते.. तिला वाटतं होते.. सर चटकन आत येतील आणि हात हातात घेतील.. मग आपण सरांच्या पायाला हात लाऊन वंदन करू..
रात्रीचे साडेबारा वाजले.. तशी मंडळी पांगली.. हेमा तिच्या नवऱ्याच्या गाडीतून घरी निघाली.
कन्या आणि नवरा नाटकाला कोण कोण आले होते.. आणि त्यान्च्या प्रतिक्रिया सांगत होते.. तिच्या मोबाईलवर मेसेज आणि कॉल्स येतच होते.. पण त्यात विनायक सरांचा मेसेज किंवा कॉल नव्हता.
हेमा घरी पोचली.. कपडे बदलून दोन घास खाऊन बेडवर पडली.. आज दिवसभर दगदग झाली होती.. नाटकाचा पहिला प्रयोग म्हणजे वार्षिक परीक्षाचं असते... केवढे ताण.. टेन्शन.. पण नाटक उत्तम झाले आणि प्रेक्षकांचा कौतुकाचा पूर आला म्हणजे एवढ्या दोन महिन्यात केलेल्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटते.. हे नेहमीचेच असते.. पण आज हेमाला हे नेहेमीचे कौतुक होण्यापेक्षा नाटकाच्या लेखकाचे कौतुकाचे दोन शब्द हवे होते.. पण नाटक संपताच सर निघून गेलेले..
हेमाला झोप येईना.. विनायकसरांना मी केलेली अस्वली आवडली नाही का? तसा त्त्यांचा पहिल्यापासून मला अस्वलीची भूमिका द्यायला विरोध होताच? पण विकासने मलाच भूमिका दिली... विनायकसरांनी आपले मत दयायला हवे होते.. ही चुटपुट लागून राहिली मनाला...
दुसऱ्या दिवशी हेमाला मेसेज.. फोन येतच होते.. ती सर्वांचे कौतुक स्वीकारत होती..पण तिला हवा होता तो फोन किंवा मेसेज आला नाहीच.. संध्याकाळी विकासचा फोन आला तेंव्हा तिने विचारले..
'विकास सर.. विनायकसर भेटलेले काय.. किंवा फोन?
'त्यानी रात्री मेसेज पाठविला.. नाटक छान झाले.. सर्वांनी कामे चांगली झाली.. असा..
'एव्हडेच? अस्वलीच्या कामाबंद्दल?
'कांहीच नाही ग.. जाऊदे ना... तुला अस्वलीची भूमिका द्यायला त्यानी विरोध केलेला.. त्यामुळे.. जाऊदे.. बाकी सर्वांनी अगदी दामू केंकरे, हेमू अधिकारी अशा दिग्गजानी तुझे तोंडभरून कौतुक केले.. आणि काय हवंय? बघू. रिझल्ट काय येतो?
आणि स्पर्धेचा निकाल आला... नाटक प्रथम.. दिग्दर्शक विकास प्रथम.. अभिनय.. अस्वलीच्या भूमिकेत हेमाला रौप्य पदक.. आनंदी आनंद.. पण विनायक सरांचा मेसेज, फोन नाही..
अंतिमफेरीसाठी पुन्हा नाटकाच्या तालमी सुरु झाल्या..
अंतिम फेरी.. धोबीतलावच्या उघड्या नाट्यमंदिरात हेमाने अस्वली गाजवली.. मुंबईतील सर्व वर्तमाणपत्रात कौतुकावर कौतुक.. अंतिम फेरीत महाराष्ट्रातून आलेल्या अकवीस नाटकातून नाटक पहिले.. नाट्यलेखनाचा पुरस्कार विनायक यांना... दिग्दर्शन विकास पहिला.. आणि स्त्री भूमिका हेमा अस्वलीच्या अविस्मरणीय भूमिकेसाठी प्रथम..
नाटकाचा जयजयकार सुरु होता. हेमाचा पण कौतुक सुरूच होते.. शासनाच्या पारितोषिक कार्यक्रमात तिला विनायकसर दिसलें... तिच्या पुढील रांगेत बसले होते.. मंत्र्यान्च्याहस्ते त्यानी पारितोषिक स्वीकारले.. पाठोपाठ हेमाने पण रौप्य पदक स्वीकारले.. पण विनायकसर काहीच बोलले नाहीत. जे हवे होते ते हेमाला मिळतं नव्हते..
या नाटकाचे अजून पंचवीस प्रयोग महाराष्ट्रभर झाले.. आणि नाटक थांबले.. मग इतर अनेक ग्रुप्स हेच नाटक करत राहिले.
हेमाने पुढील काही वर्षात आणखी तीन नाटकें स्पर्धेसाठी केली पण अस्वली सारखी भूमिका तिला परत मिळाली नाही.. मोहन वाघ,मोहन तोंडावळकर या निर्मात्यानी तिला नाटकंबद्दल विचारले.. पण हेमाने आपल्या संसाराला आणि नोकरीला प्राधान्य दिले. उत्तम संसार केला.. मुलीला डॉक्टर केले.. नवऱ्याबरोबर जग फिरली. नवरा निवृत्त झाला, एका वर्षात ती निवृत्त झाली.. मुलीचे लग्न झाले.
निवृत्तीनंतर ती बऱ्याच वेळा ग्यालरीत हवा खात बसायची तेंव्हा तिच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ यायचा.. उत्तम कंपनीत नोकरी.. सुस्वभावी नवरा.. हुशार मुलगी.. उत्तम आर्थिक स्थिती.. पुण्यात घर.. आणि तिला अचानक अस्वली आठवायची.. आपण अस्वली गाजवली.. मग ती पेपरतील कात्रणे काढायची... अगदी विजय तेंडुलकर यांनी काढलेले कौतुक उदगार.. माधव मनोहर यांचा लेख..आणि तिला चुटपुट पण लागायची.. नाटकाचे लेखक विनायकसर यांनी मात्र अस्वलीबंद्दल काहीच...
आणि नेहेमी यायचा तसा विकासचा फोन आला..
'हेमा.. काल विनायकसरांच्या मुलाचा फोन आलेला.. सर हल्ली सांगलीला राहतात मुलाकडे.. सर जास्त आजारी आहेत म्हणे.. त्याना सर्व नाटकाच्या ग्रुपला भेटायची इच्छा आहे.. आपला सर्व ग्रुप जातोय त्याना भेटायला.. तू येणार काय?कारण सरांचा मुलगा म्हणत होता, त्याना हेमाला भेटायचंय म्हणून..
'अरे.. मी हल्ली सरांची आठवण काढत असतेच.. आणि सरांचा फोन.. हो मी आणि माझा नवरा येतोय..
'मग येत्या रविवारी सांगलीला जायचंय.. मी गाडी सांगितली आहे.. सकाळी लवकर निघायचं आणि परत रात्री पर्यत मुंबई..
'होय.. आमची दोघांची जागा ठेव..
रविवारी सकाळी टेम्पो ट्रॅव्हल्सने बारा लोकांचा नाटकाचा ग्रुप निघाला.
आता सर्वजण कंपनीतून निवृत्त झाले होते आणि आजी आजोबा पण झाले होते..
आज पुन्हा नाटकाचा विषय.. त्या कडक तालमी.. पहिला नंबर..हेमा नव्हे अस्वली.. अभिनयाचे प्रथम पारितोषिक.. दामू केंकरे, विजय तेंडुलकर यांनी केलेले कौतुक. हेमा मात्र अलिप्त होती.. सर्वांनी कौतुक केल हे खरे, पण.. एक माणूस.. आणि तोच आजारी आहे म्हणून त्याला भेटायला जातोय..
दुपारपर्यत गाडी सांगलीत पोचली. नाटकाचा ग्रुप विनायक सरांना भेटायला वरच्या मजल्यावर गेला..
सर वाट पहात होते. बेडवर लोडाला टेकून बसवले होते.. जुन्या कंपनीतला आणि नाटकाचा ग्रुप पहाताच त्यान्च्या डोळ्यात चमक आली.सर्वजण त्यान्च्या अवतीभवती बसले.. हेमा थोडी लांब उभी होती.. तिच्याकडे पहात कापऱ्या आवाजात विनायक सर बोलू लागले..
'विकास.. तुम्हाला मी मुद्दाम बोलावलं.. माझं आयुष्य थोडं राहिलंय याची मला कल्पना आली आहे.. त्या आधी जे त्या वेळीच बोलायला हवे होते.. ज्याची रुखरुख माझ्या मनाला आयुष्यभर राहिली..ती गोष्ट कबूल करायला हवी.. विकास.. माझे नाटक तू करायला घेतलंस आणि अस्वलीची भूमिका हेमाला दिलीस, त्याला मी विरोध केला.. मी तालमीना पण आलो नाही.. कारण अस्वलीची अवघड भूमिका हेमा करूच शकणार नाही.. असे मला वाटले होते.... पण.. पण.. मी मान्य करतो.. त्या नाटकात हेमाने जी अस्वली केली, त्याला तोड नाही..
'काय? ... हेमा किंचाळली..
'होय हेमा.. तुझी भूमिका मी दोन्ही स्पर्धेत पाहिली... अंतिम स्पर्धेत मी आलो होतो.. पण पण.. कुणाला कल्पना न देता शेवटच्या रांगेतून मी नाटक पाहिलं.. हे नाटक मग अनेकांनी केल.. अनेक स्पर्धेत त्याचा नंबर आला... पण हेमासारखी अस्वली ... कुणालाच जमली नाही..
रडत रडत हेमा म्हणाली..' हे त्याचवेळी का सांगितलं नाही सर? मी वेड्यासारखी तुमच्या प्रतिक्रियेची वाट पहात होते.. किती दिवस.. किती वर्षे वाट पहिली मी..
'क्षमा कर मला हेमा.. यालाच अहंकार म्हणतात.... आपले मत चुकीचे होते हे प्रांजलपने मान्य करायला मोठे मन लागते.. ते. माझे नव्हते.
'पण सर त्यामुळे त्या नाटकाचा आणि त्याच्या यशाचा आनंदच घेऊ शकले नाही मी.... आजही मी एकटीच असते आणि माझा भूतकाळ आठवते.. तेंव्हा काय मिळाले आणि काय नाही याचा हिशेब चालू असतो मनात.. तेंव्हा जे मिळाले त्यात मी समाधानी आहे.. पण अस्वली सारखी कवचितच मिळालेली भूमिका ती भूमिका जिवन्त करणारा लेखक जेंव्हा अबोल रहातो.. तेंव्हा यातना होतात सर.. लेखकांच्या दृष्टीने आपण कमी पडलो का.. हा प्रश्न आयुष्यभर सतावत होता सर..
"चूक झालीच माझी हेमा.. कदाचित नाट्यलेखक म्हणून जो माझा जयजयकार होत होता त्याकाळी त्याचा कैफ असेल कदाचित... पण.. पण.. आयुष्याच्या संध्याकाळी आपली चूक कबूल केलीच पाहिजे...
बोलता बोलता जयवंतसरांना ग्लानी आली. त्यान्च्या मुलाने त्याना व्यवस्थित झोपवले.. त्याना भेटून मंडळी बाहेर आली.
मुंबईचा परत प्रवास करताना सर्व मंडळी गप्प गप्प होती. विनायक सरांनी एकापेक्षा एक नाटकें या ग्रुपला दिली होती.. अशी नाटकें लिहिणारा दुसरा नाट्यलेखक नाही. विकास हेमाला म्हणाला'
"शेवटी लेखकाने मान्य केलेच.. त्या यशात तीच एक त्रुटी होती.. अस्वलीची भूमिका तुला देताना मी एक चॅलेंज स्वीकारले होते आणि तूपण भूमिकेचे चॅलेंज घेतले होतेस... आपण ते चॅलेंज पूर्ण केले..
प्रदीप केळूस्कर 9307521152/9422381299
कथाविश्व - गोड कथांचे अद्भुत विश्व 🎉

Address

Pavan Nagar, CIDCO
Nashik
422008

Alerts

Be the first to know and let us send you an email when कथाविश्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to कथाविश्व:

Shortcuts

Share