04/09/2026
विशेष लेख
दि.४ सप्टेंबर २०२६
गणरायाचा उत्सव... लोकजागृतीपासून पर्यावरण संवर्धनापर्यंत !
घराघरांतील श्रद्धेपासून सार्वजनिक लोकचळवळीपर्यंतचा गणेशोत्सवाचा प्रवास;‘राज्य महोत्सवामुळे आता कला, संस्कृती,सामाजिक समता आणि पर्यावरण संवर्धनाला नवा आयाम मिळणार आहे.
‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया!’चा जयघोष कानावर पडू लागला की अवघा महाराष्ट्र एका वेगळ्याच चैतन्याने भारून जातो. घरातील गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून सार्वजनिक मंडळांच्या देखण्या मंडपांपर्यंत, आरतीच्या मंगल स्वरांपासून ढोल-ताशांच्या गजरापर्यंत आणि भक्तिभावाने ओथंबलेल्या विसर्जनापर्यंत गणेशोत्सव महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी इतका एकरूप झाला आहे की तो केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही. श्रद्धा,संस्कृती,कला,सामाजिक समता, लोकजागृती आणि समाजसेवेचा तो एक व्यापक उत्सव बनला आहे.राज्यात १४ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे.
आता गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत असल्याने महाराष्ट्राच्या या समृद्ध परंपरेला नवा आयाम मिळाला आहे.बदलत्या काळानुसार उत्सवाचे स्वरूप बदलले,त्यात आधुनिकतेची भर पडली.मात्र लोकांना जोडणारा त्याचा सामाजिक धागा आजही तितकाच मजबूत आहे.किंबहुना पर्यावरण संवर्धन,सामाजिक बांधिलकी आणि विधायक लोकसहभागाच्या माध्यमातून हा धागा आणखी बळकट करण्याची संधी आता निर्माण झाली आहे.
घराघरांतील गणरायापासून सार्वजनिक उत्सवापर्यंत...
महाराष्ट्रातील गणेशभक्तीची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. पेशव्यांच्या काळात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.त्या काळात गणेशपूजनासोबत कथा,कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम होत असत.घराघरांत गणरायाची प्रतिष्ठापना करून भक्तिभावाने उत्सव साजरा करण्याची ही परंपरा पुढेही कायम राहिली.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मात्र या उत्सवाने घराचा उंबरठा ओलांडला आणि त्याला सार्वजनिक स्वरूप येऊ लागले. पुण्यामध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्याच्या ऐतिहासिक नोंदी आणि दावे आढळतात.त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवामागील लोकशक्ती ओळखली.१८९३ नंतर या उत्सवाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले. ब्रिटिश राजवटीत लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे सहज शक्य नव्हते.अशा काळात सार्वजनिक गणेशोत्सव समाजातील विविध घटकांना एका व्यासपीठावर आणू लागला.लोकमान्य टिळकांनी याच व्यासपीठाचा उपयोग लोकजागृती, राष्ट्रीय अस्मिता,सामाजिक संघटन आणि स्वराज्याच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी केला.
गणरायाच्या आराधनेसोबत देशभक्ती आणि समाजजागृतीचे विचारही घराघरांत पोहोचू लागले.
आरतीच्या स्वरांत मिसळले प्रबोधनाचे सूर
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या काळात गणेशपूजन आणि आरतीपुरता उत्सव मर्यादित राहिला नाही.कीर्तन,प्रवचने, व्याख्याने,पोवाडे,भावगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम,स्वदेशी, सामाजिक प्रश्न आणि एकात्मतेचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचू लागला.
जात,पंथ,आर्थिक स्थिती आणि सामाजिक स्तराच्या भिंती ओलांडून नागरिकांना एका सार्वजनिक व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वाचे काम गणेशोत्सवाने केले.सामान्य माणसाला विचार ऐकण्याची, सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवण्याची आणि सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी मिळाली.त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय भावना जागविणारा गणेशोत्सव स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला.काळ पुढे सरकला तसा गणेशोत्सवही बदलला. भजन,कीर्तन आणि पोवाड्यांच्या जोडीला नाटक,संगीत,लोककला, आकर्षक देखावे आणि सामाजिक संदेश देणाऱ्या आरासी आल्या. रक्तदान शिबिरे,आरोग्य तपासणी, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम, जलसंवर्धन,महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती आणि रस्ते सुरक्षेसारख्या विषयांवरील उपक्रमांमधून अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी समाजसेवेची परंपराही समृद्ध केली.
‘राज्य महोत्सव’... नव्या पर्वाची सुरुवात
यावर्षापासून गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होत असल्याने या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेला आणखी व्यापक अधिष्ठान मिळाले आहे. संस्कृतीचे जतन व संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक उत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून कलांचे जतन व संवर्धन,महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन, निसर्ग व सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण,सामाजिक कार्य आणि विधायक उपक्रमांना चालना मिळणार आहे.पर्यावरणपूरक गणेशमूर्ती,ध्वनी,वायू व जलप्रदूषणमुक्त परिसर तसेच ‘एक गाव,एक गणपती’सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या सामाजिक आशयाला आणखी व्यापकता मिळत आहे.
गणरायाच्या स्वागतासोबत निसर्गाचाही सन्मान
हवामान बदल,जलप्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि वाढते ध्वनिप्रदूषण ही आजची गंभीर आव्हाने आहेत.त्यामुळे उत्सवाचा आनंद कायम ठेवतानाच गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणस्नेही करण्याची जबाबदारीही समाजाची आहे. त्यासाठी विविध गणेश उत्सव मंडळे पुढाकार घेताना दिसत आहे.गणेशमूर्तीसाठी शाडू माती किंवा पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर,नैसर्गिक रंगांना प्राधान्य, प्लास्टिक व थर्माकोलमुक्त सजावट आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा कल्पक उपयोग हा त्याचा पहिला टप्पा ठरू शकतो.
कापड,कागद,बांबू,फुले,पाने आणि पारंपरिक वस्तूंच्या साहाय्याने आकर्षक आरास करता येते आणि त्याचवेळी पर्यावरणाची हानीही टाळता येते.विद्युत रोषणाईमध्ये ऊर्जाबचतीला प्राधान्य,मंडप आणि परिसराची स्वच्छता,ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण,एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार आणि प्रसादासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर अशा छोट्या वाटणाऱ्या कृतीदेखील मोठा बदल घडवू शकतात.
पूजेनंतरचे हार,फुले,पाने आणि अन्य निर्माल्य नदी,तलाव अथवा विहिरीत टाकण्याऐवजी त्याचे स्वतंत्र संकलन करून कंपोस्ट किंवा सेंद्रिय खत तयार करता येऊ शकते.उपलब्धतेनुसार कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर केल्यास नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.विसर्जन मिरवणुकीत अनावश्यक ध्वनिप्रदूषण टाळणे, निर्धारित नियमांचे पालन करणे, रस्त्यांवर कचरा न टाकणे आणि मिरवणुकीनंतर परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील गणरायाच्या भक्तीचीच पर्यावरणपूरक अभिव्यक्ती आहे.गणरायाची भक्ती आणि निसर्गाचे रक्षण या परस्परविरोधी गोष्टी नाहीत.उलट निसर्ग संवर्धन हाच आजच्या काळातील उत्सवाचा सर्वांत विधायक संस्कार ठरू शकतो.
‘एक गाव, एक गणपती’... उत्सव एकोप्याचा
गणेशोत्सवाचे खरे सामर्थ्य त्याच्या सामूहिकतेत आहे.‘एक गाव,एक गणपती’ ही संकल्पना त्याचेच सुंदर रूप आहे. गावातील सर्व समाजघटकांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत गणेशोत्सव साजरा केला,तर सामाजिक एकोपा अधिक दृढ होतो. अनावश्यक स्पर्धा आणि खर्च कमी होतो.त्यातून वाचणारी ऊर्जा, वेळ आणि साधने गावाच्या विकासासाठी उपयोगात आणण्याची संधीही मिळते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी समाजकार्य केवळ उत्सवाच्या दहा दिवसांपुरते मर्यादित न ठेवता वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले,तर गणेशोत्सवातून निर्माण होणारी लोकशक्ती खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तनाची शक्ती बनू शकते.
कलेला व्यासपीठ ; संस्कृतीचा वारसा नव्या पिढीकडे
गणेशोत्सवाने महाराष्ट्रातील असंख्य कलाकारांना हक्काचे व्यासपीठ दिले आहे.मूर्तिकाराच्या हातातील कलाकुसर असो, ढोल-ताशांचा जोशपूर्ण नाद असो, लोककलावंतांचे सादरीकरण असो किंवा एखाद्या ज्वलंत सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा देखावा असो गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या कलावैभवाचे दर्शन घडते.
हीच परंपरा नव्या पिढीशी जोडण्याची गरज आहे.महाराष्ट्राचा इतिहास,छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा,संत आणि समाजसुधारकांचे विचार, स्वातंत्र्यलढा, संविधानिक मूल्ये,सामाजिक समता, लोककला आणि पारंपरिक संस्कृतीची ओळख मुलांना व युवकांना करून देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव हे प्रभावी लोकशिक्षणाचे व्यासपीठ ठरू शकते.
काळ बदलला ; सामाजिक धागा मात्र कायम
पेशवाईच्या काळातील धार्मिक उत्सवापासून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सार्वजनिक स्वरूपाकडे,तेथून स्वातंत्र्यलढ्यातील लोकजागृतीच्या व्यासपीठापर्यंत आणि स्वातंत्र्यानंतर कला-संस्कृतीच्या उत्सवापासून आजच्या सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीच्या पर्वापर्यंतचा महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचा प्रवास विलक्षण आहे.
आज ‘राज्य महोत्सव’ म्हणून गणेशोत्सव साजरा होत असताना प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापुढे या ऐतिहासिक परंपरेला नवा विधायक अर्थ देण्याची संधी आहे.उत्सवाची भव्यता केवळ मूर्तीची उंची,रोषणाईचा झगमगाट किंवा सजावटीच्या खर्चात मोजली जाऊ नये.किती माणसे जोडली, किती कला जपल्या,किती सामाजिक प्रश्नांवर जागृती केली, किती पर्यावरण वाचविले आणि समाजासाठी किती चांगले काम उभे राहिले,यावरही उत्सवाचे यश मोजले जाणार आहे.त्यासाठी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.लोकमान्य टिळकांच्या काळात गणेशोत्सवाने माणसांना एकत्र आणले.स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय अस्मितेला बळ दिले. स्वातंत्र्यानंतर कला आणि संस्कृतीला व्यापक व्यासपीठ दिले.आता पर्यावरण संवर्धन, सामाजिक समता आणि समाजहिताच्या विधायक कार्यातून त्याच परंपरेला पुढे नेण्याची वेळ आहे.
गणरायाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना निसर्गही हसला पाहिजे, समाजातील माणसे आणखी जवळ आली पाहिजेत,कलाकारांच्या कलेला नवे बळ मिळाले पाहिजे आणि उत्सवानंतरही समाजहिताची एखादी चांगली गोष्ट मागे उरली पाहिजे.तेव्हाच सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा अधिक अर्थपूर्ण ठरेल.
श्रद्धेतून संस्कार,इतिहासातून प्रेरणा, उत्सवातून प्रबोधन,कलेतून संस्कृतीचे संवर्धन,कृतीतून पर्यावरणाचे रक्षण आणि लोकसहभागातून समाजहित हीच महाराष्ट्राच्या या राज्य महोत्सवाची नवी ओळख ठरणार आहे !
संकलन
जिल्हा माहिती कार्यालय,
धाराशिव