Dio Dharashiv

Dio Dharashiv जिल्हा माहिती कार्यालय, धाराशिव जिल्हा माहिती कार्यालय,धाराशिव

निर्भय,नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्यानिवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांचे निर्देशधाराशिव,दि.३...
03/06/2026

निर्भय,नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या

निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांचे निर्देश

धाराशिव,दि.३ जून (जिमाका) उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणूक २०२६ साठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे.निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करून ही निवडणूक निर्भय,नि:पक्षपणे आणि मुक्त वातावरणात पार पडेल याची दक्षता घ्यावी,असे निर्देश निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बुधवारी (दि.३) विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, संतोष राऊत,श्रीमती.स्वाती शेंडे,श्रीमती. अरुणा गायकवाड,धाराशिव उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,पोलीस निरीक्षक अमोघ भुजबळ उपस्थित होते.तसेच ऑनलाइन पद्धतीने बीडच्या प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके,लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके,बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे सहभागी होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना श्री.बोरकर म्हणाले की,राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी या निवडणुकीत सूक्ष्म निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.त्यामुळे तीनही जिल्ह्यांतील सूक्ष्म निरीक्षकांच्या याद्या मागवून घ्याव्यात.मतदान साहित्य वितरण व स्वीकृती केंद्राचे काम योग्य प्रकारे पार पाडावे.मतपेट्या सुरक्षितपणे मतदान केंद्रावर पोहोचविणे तसेच मतदानानंतर सीलबंद मतपेट्यांची वाहतूक कडक सुरक्षा व्यवस्थेत करावी.या प्रक्रियेत कोणतीही उणीव राहणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.असे ते म्हणाले.

मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रियेची वेळोवेळी माहिती संकलित करण्यात यावी असे सांगून श्री.बोरकर म्हणाले की, मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्यात यावे.मतदान केंद्र तहसील कार्यालयात असल्याने दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था उपलब्ध असावी,असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी.आचारसंहितेच्या अंमलबजावणीत दक्ष राहून काम करावे.प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे नि:पक्षपाती राहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे,असेही श्री.बोरकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले की,सर्व मतदान पथकांना तीनही टप्प्यांतील प्रशिक्षण व्यवस्थित व परिपूर्ण पद्धतीने देण्यात यावे.तसेच आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांनी निवडणुकीची माहिती देताना सांगितले की,या निवडणुकीत उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे ६३ व लातूर जिल्हा परिषदेचे ६९ असे एकूण १३२ मतदार आहेत.लातूर महानगरपालिकेचे ७७ मतदार,बीड जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचे ३०४,लातूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचे २२१ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचे २५४ असे एकूण ७७९ मतदार आहेत. जिल्हा परिषद,महानगरपालिका आणि नगरपालिका/नगरपंचायतींचे मिळून एकूण ९८८ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.बीड जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली नसल्यामुळे त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य मतदार म्हणून नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

या बैठकीला लातूर आणि बीड जिल्ह्यांतील निवडणुकीशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.
******

03/06/2026

उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित

धाराशिव दि.३ जून (जिमाका) उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी विविध विभागांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत.

निवडणूक प्रक्रियेतील विविध कामकाजांचे समन्वय,आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी,कायदा व सुव्यवस्था, मतदान,मतमोजणी,निवडणूक साहित्य वितरण,माध्यमांचे संनियंत्रण तसेच विविध परवानग्यांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

यामध्ये अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे आदर्श आचारसंहिता (एमसीसी) नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे हे निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतील.यांच्याकडे नामनिर्देशन स्वीकृती कक्ष,कायदा व सुव्यवस्था,वाहन व्यवस्था जबाबदारी सोपविण्यात आली आहे.उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख हे मतमोजणी कक्ष तयार करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून कार्यरत राहतील.

उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे यांच्याकडे मतदान अधिकारी व कर्मचारी व्यवस्थापन कक्षाची जबाबदारी आहे.उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अरुणा गायकवाड या अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कक्षाच्या नोडल अधिकारी म्हणून कार्य पाहतील.

उपजिल्हाधिकारी (मध्यम प्रकल्प) संतोष राऊत यांच्याकडे निवडणूक साहित्य वितरण व स्ट्राँगरूम व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीणकुमार धरमकर हे मतपत्रिका छपाई व वितरणाचे कामकाज पाहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्याकडे अवैध दारू वाटप प्रतिबंध कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे हे माध्यम व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) तसेच मीडिया व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत राहतील.तसेच तहसीलदार (संगायो) दत्तात्रय गायकवाड यांच्याकडे विविध परवानग्या व चौकशी कक्ष (एक खिडकी योजना) यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा वेळेत व नियमांनुसार पार पडावा,तसेच संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय राहावा यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व नोडल अधिकारी आपापल्या जबाबदाऱ्यांची प्रभावी अंमलबजावणी करणार असून निवडणूक प्रक्रिया निर्भय,निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
*****

जलस्रोत बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना करा ; पाण्याचा अपव्यय टाळासंभाव्य अल निनो व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधि...
02/06/2026

जलस्रोत बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना करा ; पाण्याचा अपव्यय टाळा
संभाव्य अल निनो व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

धाराशिव,दि.२ जून (जिमाका) संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सार्वजनिक व खासगी विहिरी, हातपंप तसेच रिचार्ज शाफ्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर भूगर्भात पाणीसंचयन होईल अशा पद्धतीने ‘जलतारा खड्डे’ तयार करावेत.तसेच सार्वजनिक इमारतींवरून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी भूजल पुनर्भरणासारखे उपक्रम राबवून जलस्रोत बळकट करावेत.पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करून त्याचा अपव्यय टाळावा,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी आज मंगळवारी (दि.२ जून) त्यांच्या दालनातून संभाव्य अल निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई व चारा उपलब्धतेबाबत आयोजित आढावा बैठकीत हे निर्देश दिले.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात,नगरपालिका प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त त्र्यंबक ढेंगळे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.डी.एम.मुळे,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ वैज्ञानिक आर.व्ही.मांजरमकर, धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एन.मदने,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम.कटकधोंड,मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी,धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक दोन (उमरगा) चे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे,धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे,जिल्हा परिषद यांत्रिकी विभागाचे उपअभियंता एस.पी.शिंदे उपस्थित होते.तसेच सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,पुढील वर्षीही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.त्यामुळे आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.सिंचन प्रकल्प परिसरातील गावांमध्ये पाण्याची पातळी समाधानकारक असल्यास विनाकारण विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करू नयेत.तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून ज्या विहिरी पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत,त्यांची प्रत्यक्ष गरज तपासावी.

ग्रामपंचायतींनी स्वतःचे जलस्रोत सक्षम करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. तसेच सिंचन प्रकल्पांतील पाणी परिसरातील गावांच्या पिण्याच्या गरजांसाठी अधिग्रहित करण्याची कार्यवाही करावी,असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी ‘जलतारा खड्डे’ हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्याचे निर्देश देत श्री.पुजार म्हणाले की,सुधारित टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात यावा. विहिरींमधील गाळ काढणे,त्यांची दुरुस्ती तसेच हातपंप दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत.शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील विहिरींजवळ व शेतात जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

सार्वजनिक आणि खासगी इमारतींवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संचयन करण्यासाठी भूजल पुनर्भरणाची कामे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन करावीत.पाणीपुरवठा योजनांमधील गळती तातडीने थांबवावी. तसेच सिमेंटच्या पोत्यांत रेती भरून नदी-नाल्यांतील वाहते पाणी अडवून त्याची भूगर्भात साठवण करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून पुढाकार घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.

निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनीही पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींची तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी तसेच शेतकऱ्यांना जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे सांगितले.

बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम.कटकधोंड यांनी माहिती दिली की,सध्या धाराशिव तालुक्यातील सात गावांना ११ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ५२ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.तुळजापूर तालुक्यात नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.भूम तालुक्यातील दहा गावांसाठी २२ विहिरी तसेच चार गावांसाठी पाच खासगी टँकर कार्यरत आहेत.याशिवाय १५ गावांसाठी १६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात एकूण ११ गावांना १६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ६५ गावांसाठी ९९ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी सांगितले की,धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक एक व दोन अंतर्गत एकूण २२६ प्रकल्प आहेत.त्यामध्ये एक मोठा,१७ मध्यम आणि २०८ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.या सर्व प्रकल्पांमध्ये ७२८.८० दलघमी उपयुक्त पाणीसाठा क्षमता असून २९ मे २०२६ अखेर १२०.७४२ दलघमी म्हणजेच १६.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.डी.एम.मुळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात ७ लाख ९० हजार ३९९ इतके पशुधन असून त्यासाठी दररोज ३ हजार ८९ मे.टन वैरण आवश्यक आहे. उपलब्ध व संभाव्य वैरण साठा ४ लाख ६३ हजार ३५० मे.टन असून तो ऑक्टोबर २०२६ पर्यंत पुरेल इतका आहे.

वैरण विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून ५० हजार किलो संकरित मका बियाण्यांचे वितरण करण्यात आले असून त्यातून सुमारे २ लाख ५० हजार मे.टन चारा उत्पादन अपेक्षित आहे.तसेच विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत ५,२२० किलो संकरित मका बियाणे ५२२ पशुपालक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले असून त्यातून २६ हजार १०० मे. टन चारा उत्पादन अपेक्षित आहे.

एकूण ५५ हजार २२० किलो संकरित मका बियाणे १३ हजार २२ पशुपालकांना वितरित करण्यात आले असून त्याची लागवड १३ हजार ८०५ एकर क्षेत्रावर करण्यात येत आहे.यामधून सुमारे २ लाख ७६ हजार १०० मे.टन चारा उत्पादन होण्याची अपेक्षा असल्याची माहिती डॉ.मुळे यांनी दिली.

बैठकीत ऑनलाइन सहभागी झालेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व कामांचा आढावाही सादर केला
******

29/05/2026

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुक ६० कोरे अर्ज वितरित : आतापर्यंत दोन उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र दाखल

धाराशिव,दि.२९ मे (जिमाका) महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी उस्मानाबाद - लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत ३२ व्यक्तींनी ६० कोरे नामनिर्देशनपत्रे प्राप्त केली आहेत. तर दोन उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

भारत निवडणूक आयोगाने १८ मे २०२६ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक सूचना २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

२५ मे २०२६ पासून आजअखेर ३२ व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयातून एकूण ६० कोरे नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत.तसेच आजपर्यंत दोन उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
दरम्यान,या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. शनिवार,३० मे २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तसेच सोमवार,१ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या कार्यालयात ही प्रक्रिया पार पडणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विदयाचरण कडवकर यांनी कळविले आहे.
*****

ॲट्रॉसिटी प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करा          जिल्हाधिकारी श्री.पूजार यांचे संबंधित यंत्रणांना निर्देश धाराशिव,दि....
29/05/2026

ॲट्रॉसिटी प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करा
जिल्हाधिकारी श्री.पूजार यांचे संबंधित यंत्रणांना निर्देश

धाराशिव,दि.२९ मे (जिमाका) अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यात यावा,अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आज २९ मे रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. प्रियंवदा म्हाडदळकर,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले तसेच समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

बैठकीत मार्च २०२६ अखेर घेण्यात आलेल्या मागील बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली. यावेळी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मार्च २०२६ अखेर पोलीस तपासावर प्रलंबित असलेल्या २१ प्रकरणांपैकी आठ प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून एका प्रकरणाचा निपटारा करण्यात आला आहे.अद्याप १२ प्रकरणे प्रलंबित असून २७ मे अखेर आणखी चार प्रकरणांत दोषारोप अहवाल दाखल झाल्याची माहिती जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्य सचिवांनी दिली.

सद्यस्थितीत एप्रिल २०२६ अखेर एकूण २६ प्रकरणे तपासावर प्रलंबित आहेत.त्यापैकी २४ प्रकरणे ही ६० दिवसांच्या आतील असून दोन प्रकरणे ६० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी संबंधित विभागांनी प्रकरणांच्या तपासात गती आणून पीडितांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश दिले.
*****

अनुसूचित जाती जमातीवर अन्याय, अत्याचार होणारच नाहीत यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज                         प्रा.ॲड.मंजुषा...
29/05/2026

अनुसूचित जाती जमातीवर अन्याय, अत्याचार होणारच नाहीत यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज
प्रा.ॲड.मंजुषा साखरे

कायद्याची संक्षिप्त माहितीसाठी आयोजित कार्यशाळेस प्रतिसाद


धाराशिव,दि २९ मे (जिमाका) जिल्ह्यात सामाजिक जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.मात्र, वेगवेगळ्या कारणावरुन अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या समुहातील काही व्यक्तींवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे त्यांच्यावर अन्याय,अत्याचारच होणारच नाहीत यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरीसर केंद्राच्या प्रा.ॲड.मंजुषा साखरे यांनी केले.

आज २९ मे रोजी धाराशिव येथील प्रशासकीय इमारतीमधील सामाजिक न्याय भवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम,१९८९ सुधारित अधिनियम २०१५ व सुधारित नियम २०१५ आणि इतर कायद्याची संक्षिप्त माहिती देण्यासाठी आयोजित नागरी मार्गदर्शन कार्यशाळेत प्रा.ॲड.श्रीमती. साखरे बोलत होत्या.धाराशिव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय कांबळे,छत्रपती संभाजीनगर विभागाच्या नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार,प्रभारी पोलीस उपअधीक्षक पी.बी.सोनवणे,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले,महिला व बालविकास कार्यालयाच्या केंद्र प्रशासक प्रियंका जाधव आणि महिला व बालकल्याण विभागाच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा बनसोडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्रा‌.ॲड.श्रीमती.साखरे म्हणाल्या की,स्वातंत्र्यापूर्वी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या समूहावर अन्याय अत्याचार होत होते,असाच प्रकार स्वातंत्र्यानंतर ही सुरू होता.त्याला आळा बसविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये नागरिक संरक्षण कायद्याची तरतूद केली.मात्र,अन्याय अत्याचार होत असल्यामुळे १९८९ ला अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा आणला. त्यानंतर २०१५ भारतीय न्याय संहिता हा कायदा आणला गेला.त्याची अंमलबजावणी होऊ लागल्यामुळे अनुसूचित जाती व जमातीवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुळात यांच्यावर अन्याय केले जाऊ नयेत यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. विशेष म्हणजे एस.सी.,एस.टी.महिलांवर आर्थिक व मानसिक छळ या प्रकारचा अन्याय अत्याचार झाला तर तो ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासह आरोपीस तात्काळ अटक करणे हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य असल्याचे ॲड.श्रीमती.साखरे यांनी सांगितले.त्या पुढे म्हणाल्या की,या केसेस विशेष न्यायालयाअंतर्गत चालवून त्याचा न्याय-निवडा लवकरात लवकर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच पोलिसांनी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली तर अत्याचार करणाऱ्यांना आपोआप जरब बसून भीती निर्माण होते.जर कायद्याची भीती निर्माण झाली तर कोणावरही अन्याय होणार नाही.त्यामुळे अत्याचाराला आळा घालायचा असेल तर माणूस म्हणून जगणे आवश्यक असल्याचे प्रा.ॲड.साखरे यांनी सांगितले.

महिला व बाल विकास विभागांतर्गत वन स्टॉप केंद्राच्या प्रियंका जाधव म्हणाल्या की,पुरोगामी महाराष्ट्रात महिला होणारी दिवसाच्या आर्थिक गंभीर बाब असून महिला व मुली सुरक्षित नसल्याचे त्यांनी सांगितले.महिलांना आजही दुय्यम स्थान असून त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.तर पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे मालमत्ता देखील त्यांच्या नावावर नसल्याची खंत व्यक्ती केली.मात्र प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत असून गर्भाशयापासून स्त्रियांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले.स्त्रीचे अपहरण आणि छेडछाड आधी प्रकार रोखण्यासाठी स्त्रियांनीच स्वतःच्या सुरक्षेसाठी सजग बनायला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.सोशल मीडियावर बऱ्याच महिलांना अवमानास सामोरे जावे लागत असून ते प्रमाण मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिलांनी शिक्षण घेऊन शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनावे.त्यासाठी पुरुषांनी स्त्रियांच्या पाठीमागे खंबीर उभारावे,असे आवाहन करत त्या म्हणाल्या की,स्त्रियांच्या संरक्षणासाठी वेगवेगळे कायदे आहेत,त्याचा आधार घ्यावा. तसेच कायद्याची माहिती जाणून घेऊन होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध करावा,असे श्रीमती.जाधव यांनी सांगितले.

प्रज्ञा बनसोडे यांनी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढले असून ही गंभीर बाब आहे. अक्षय तृतीयापासून आजपर्यंत ३२ विवाह प्रशासनाच्या माध्यमातून रोखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.बालविवाह कोणत्याही जातीत होऊ नयेत यासाठी सामूहिक प्रयत्न करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.बाल वयातच मातृत्व लादले जात असल्यामुळे विवाहानंतरचे दुष्परिणाम कोणी रोखू शकत नाही. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावस्तरीय बालविवाह ग्राम दक्षता समितीने होणारे बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्याबरोबरच इतर नागरिकांनी देखील जर अशा पद्धतीचा विवाह होत असेल तर १०९८ या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करावा,असे आवाहन श्रीमती. बनसोडे यांनी केले.

यावेळी राजाभाऊ ओहाळ,सामाजिक कार्यकर्ते बजरंग ताटे,रामभाऊ लगडे, मारुती बनसोडे,सुनील काळे व अजिनाथ राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी तर सूत्रसंचालन पीसीआर विभागाचे हेडकॉन्स्टेबल मधुकर शेवाळे यांनी केले.उपस्थितांचे आभार बार्टीचे प्रकल्प संचालक तुषार कदम यांनी मानले.या कार्यशाळेस जिल्ह्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******

27/05/2026

खरीप हंगामासाठी डिजिटल शेतीशाळा सुरू ; शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

धाराशिव, दि.२७ मे (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पानी फाऊंडेशन,नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प,उमेद आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने खरीप हंगामातील विविध पिकांच्या डिजिटल शेतीशाळा २५ मेपासून सुरू करण्यात येणार आहेत.

या डिजिटल शेतीशाळांमधून विविध पिकांबाबत दररोज ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार असून कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ थेट मोबाईलद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती आणि तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत.पानी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांतून तसेच शेतकऱ्यांच्या अनुभवातून या डिजिटल शेतीशाळांचा मोठा फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.
शेतकऱ्यांनी संबंधित पिकांच्या शेतीशाळेत सहभागी होण्यासाठी दिलेल्या झूम आयडी आणि पासकोडचा वापर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

दर सोमवारी बाजरी पिकासाठी सायंकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत झूम आयडी ८९८४५७०११३६ आणि पासकोड ६२४७८६ राहणार आहे.त्यानंतर सोयाबीन पिकासाठी सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत झूम आयडी ८१५४९२३००८ आणि पासकोड ०१२१७५ वापरावा लागेल.दर मंगळवारी खरीप ज्वारी पिकासाठी सायंकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत झूम आयडी ८९०२४७९४३७८ आणि पासकोड २३७२६६ तर कापूस पिकासाठी सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत झूम आयडी ८९१८६९७२७७९ आणि पासकोड 502403 राहणार आहे.दर बुधवारी भूईमूग पिकासाठी सायंकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत झूम आयडी ८२६४६१९६८१८ आणि पासकोड ९३५१२५ देण्यात आला आहे. तसेच भात पिकासाठी सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत झूम आयडी ८३९४२४४९६७५ आणि पासकोड ४४५६२४ राहील.
दर गुरुवारी घेवडा (राजमा) पिकासाठी सायंकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत झूम आयडी ८७३६६०७९७१३ आणि पासकोड ६२६१४० तर मका पिकासाठी सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत झूम आयडी ८७५३१४९६०३१ आणि पासकोड ४३७८०५ ठेवण्यात आला आहे.

दर शुक्रवारी नाचणी पिकासाठी सायंकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत झूम आयडी ८९११९९६०५९३ आणि पासकोड ७८२५८० राहणार आहे. तर तूर-मूग-उडीद पिकांसाठी सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत झूम आयडी ८१९२५६४०००२ आणि पासकोड ७५७४७१ वापरावा लागेल.दर शनिवारी भाजीपाला पिकांसाठी सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत झूम आयडी ८३९८९९२४७५८ आणि पासकोड ६८९१५१ राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील संबंधित सहायक कृषी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.तसेच संबंधित पिकांची लागवड करणाऱ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी डिजिटल शेतीशाळेत सहभागी होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.टी.मोरे यांनी केले आहे.
*****

27/05/2026

महाडीबीटीवरील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत

धाराशिव,दि.२७ मे (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीद्वारे दिला जातो.राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महाडीबीटी प्रणालीचे व्हर्जन २.० कार्यान्वित करण्यात येणार असल्याने शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीतील प्रलंबित अर्ज ३१ मेपूर्वी पूर्णतः निकाली काढण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण ४०२ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय व विद्यार्थी स्तरावर प्रलंबित असल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे.

महाडीबीटी प्रणालीद्वारे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजनांचा लाभ दिला जातो.समाज कल्याण विभागाकडून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना वेळोवेळी पत्र,वृत्तपत्र जाहिराती तसेच व्हॉट्सॲप समूहांच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या होत्या.मात्र,अद्यापही अनेक अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.

प्रलंबित अर्ज वेळेत निकाली न काढल्यास नवीन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.त्यामुळे या कामाला “सर्वोच्च प्राथमिकता” देऊन विहित मुदतीत सर्व अर्ज निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान,विहित मुदतीत अर्ज निकाली न काढल्याने अनुसूचित जाती प्रवर्गातील एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संबंधित विद्यार्थ्यावर राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.३१ मेपर्यंत सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.
******

27/05/2026

एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी प्रशासन सज्ज ; परीक्षा केंद्रांभोवती कडक निर्बंध लागू

धाराशिव,दि.२७ मे (जिमाका) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील १८७२ उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.

अपर जिल्हादंडाधिकारी,धाराशिव यांनी जारी केलेल्या आदेशानुसार परीक्षा काळात केंद्र परिसरातील शांतता,सुव्यवस्था आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी तसेच परीक्षार्थींना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

ही परीक्षा ३१ मे २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.जिल्ह्यातील श्रीपतराव भोसले हायस्कूल,पहिला मजला, मेन रोड धाराशिव पार्ट-ए,श्रीपतराव भोसले हायस्कूल,पहिला मजला, मेन रोड धाराशिव पार्ट-ब,श्रीपतराव भोसले हायस्कूल (अण्णा ई टेक्नो), मेन रोड धाराशिव पार्ट-ए,श्रीपतराव भोसले हायस्कूल (अण्णा ई टेक्नो), मेन रोड धाराशिव पार्ट-ब,रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,नवीन इमारत,मेन रोड,धाराशिव,जिल्हा परिषद कन्या प्रशाला,शहर पोलीस स्टेशनसमोर,धाराशिव तसेच रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, जुनी इमारत,मेन रोड,धाराशिव येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या आदेशानुसार परीक्षा केंद्र परिसरात घोषणाबाजी,गोंधळ अथवा शांततेस बाधा पोहोचवणारी कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,पानटपऱ्या,टायपिंग सेंटर,एसटीडी बूथ,संगणक केंद्रे आणि इंटरनेट कॅफे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन,फॅक्स,ई-मेल सुविधा, रेडिओ,इंटरनेट साधने,संगणक, कॅलक्युलेटर अथवा तत्सम उपकरणे घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.याशिवाय कोणत्याही वाहनांना परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.परीक्षेशी संबंध नसलेल्या व्यक्तींना केंद्रात प्रवेशबंदी करण्यात आली असून केवळ परीक्षा केंद्रावरील अधिकारी-कर्मचारी, शासकीय कामावरील कर्मचारी, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,कर्मचारी आणि परीक्षार्थी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षार्थींच्या नातेवाईकांनाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान,परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली असून हे आदेश ३१ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
*****

26/05/2026

तलमोड,कसगी व कोथळी परिसरासाठी विविध विभागांचे नोडल अधिकारी नियुक्त
नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज ; संपर्कासाठी मोबाईल क्रमांक जाहीर

धाराशिव दि.२६ मे (जिमाका) प्रशासनाच्या विविध कामकाजांचा समन्वय प्रभावीपणे राखण्यासाठी तसेच नागरिकांना तातडीने सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तलमोड, कसगी आणि कोथळी या सीमा क्षेत्रांसाठी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संबंधित विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रानुसार जबाबदाऱ्या निश्चित करत अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही जाहीर केले आहेत.

पोलीस यंत्रणेकडून पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, तलमोड परिसरासाठी पोलीस उपनिरीक्षक वाजिद शेख (मो. ९८२३४४१६४८), पीसी १२७ योगेश सूर्यवंशी (मो. ८४२१०११५०५) आणि पीसी १७५९ विनोद मोरे (मो. ९६६५२८५००७) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कसगी परिसरासाठी पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड (मो. ९८२२५४१८७७), एचसी ९९६ गोवर्धन शिंदे (मो. ९०११०११९९६) तसेच पीसी १७८५ सुखदेव जाधव (मो. ८०८७६४२५३६) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कोथळी परिसरासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन मुसम येथील बालाजी निवृत्ती कांबळे (मो. ९५४५९५००२९), पीसी ११२१ श्रीहरी नरसिंग फुगटे (मो. ८४२४०४२०१५), पीसी १४८१ देविदास कारिनाथ वाघे (मो. ७७४४०६२४२६) आणि पीसी ८५९ नितीन विश्वनाथ हुंडे (मो. ८८३०५४९०७१) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परिवहन कार्यालयाकडून तलमोडसाठी श्री. दत्तू रावते (मो. ९७३३३१७७११), कसगीसाठी विनोद लोणकर (मो. ९८८११६८८८७) आणि कोथळीसाठी हनुमंत कोळेकर (मो. ९५०३६४९७१७) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, परिवहन कार्यालय धाराशिव या पदावर कार्यरत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेकडून गटविकास अधिकारी उमरगा प्रशांतसिंह मरोड (मो. ९८८१७७८००१) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून तलमोड परिसरासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. येरोळे सुयोग बालाजीराव (मो. ८२७५००६०४३),कसगीसाठी डॉ. युवराज धोंडीराम बिराजदार (मो. ९४२२६५४४६०) तसेच कोथळीसाठी डॉ.प्रणव प्रल्हादराव देशमुख (मो. ८८०५९५५३३०) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान,आवश्यकतेनुसार इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.हा आदेश दि. २५ मे २०२६ पासून ते दि. ३१ मे २०२६ या कालावधीसाठी लागू राहणार आहे.
***

Address

Central Building
Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dio Dharashiv posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dio Dharashiv:

Share