जिल्हा माहिती कार्यालय,पालघर.

  • Home
  • India
  • Palghar
  • जिल्हा माहिती कार्यालय,पालघर.

जिल्हा माहिती कार्यालय,पालघर. Official page of District Information Office, , Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

03/09/2026

पालघर विभागाची १० सप्टेंबर रोजी डाक अदालत

पालघर दि ३ सप्टेंबर २०२६: नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेल्या डाक सेवांबाबतच्या प्रलंबित तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी पालघर विभागाच्या वतीने १० सप्टेंबर २०२६ रोजी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. सहा आठवड्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या डाक सेवा विषयक तक्रारींचे या अदालतीत निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पालघर विभागाचे अधीक्षक डाकघर यांच्या अध्यक्षतेखाली ही डाक अदालत १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता, मीरा रोड विभागीय डाकघर, प्रथम मजला, मीरा रोड–४०११०७ येथे होणार आहे.
डाक विभागाकडून ग्राहकांना विविध सेवा देताना संपर्कातील त्रुटी अथवा सेवेमध्ये निर्माण झालेल्या अडचणींमुळे काही वेळा तक्रारी उद्भवतात. अशा तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी डाक अदालत हा महत्त्वाचा उपक्रम आहे.
या वेळी विभागीय अधिकारी तक्रारदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
या तक्रारींचा समावेश
पालघर विभागाशी संबंधित आणि सहा आठवड्यांच्या आत निकाली न निघालेल्या तक्रारी डाक अदालतीत विचारात घेतल्या जाणार आहेत. यामध्ये अपंजीकृत व नोंदणीकृत डाक, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँक तसेच मनीऑर्डरची रक्कम अदा न होणे आदी तक्रारींचा समावेश आहे.
तक्रार सादर करताना मूळ तक्रार ज्या अधिकारी किंवा कार्यालयाकडे करण्यात आली होती, त्या अधिकाऱ्याचे नाव व पदनाम, तसेच संबंधित डाक लेख, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र आदींचा आवश्यक तपशील नमूद करणे आवश्यक आहे.
इच्छुक ग्राहकांनी आपल्या तक्रारी दोन प्रतींमध्ये तयार करून अधीक्षक डाकघर, पालघर विभाग, मीरा रोड–४०११०७ यांच्या कार्यालयात ९ सप्टेंबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी सादर कराव्यात. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची डाक अदालतीसाठी दखल घेतली जाणार नसल्याचे डाक विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

01/09/2026

प्रारूप मतदार यादीत नाव शोधण्याची सोपी पद्धत जाणून घ्या...


01/09/2026
पालघर जिल्ह्यात सामुदायिक वनसंसाधन हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन व Vayam यांच्यात सामंजस्य करार_आदिवा...
01/09/2026

पालघर जिल्ह्यात सामुदायिक वनसंसाधन हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन व Vayam यांच्यात सामंजस्य करार

_आदिवासी व वननिवासी समुदायांच्या वनहक्कांच्या अंमलबजावणीला मिळणार अधिक बळकटी_

पालघर, दि. १ सप्टेंबर: पालघर जिल्ह्यातील सामुदायिक वनसंसाधन (Community Forest Resource - CFR) हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन आणि नैसर्गिक संसाधनांच्या सुशासनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या Vayam या स्वयंसेवी संस्थेदरम्यान आज सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या सामंजस्य करारावर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, पालघर आणि Vayam चे सचिव व विश्वस्त श्री. मिलिंद थत्ते यांनी स्वाक्षरी केली.

अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ अर्थात वनहक्क कायद्यांतर्गत पात्र गावांमध्ये सामुदायिक वनसंसाधन हक्कांची मान्यता सुनिश्चित करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय समितीची असून, या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. वनसंसाधनांचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन यामध्ये ग्रामसभा ही प्रमुख संस्था म्हणून कार्य करते.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून CFR हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित भागधारकांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, प्रलंबित व पुनर्तपासणी आवश्यक असलेल्या CFR दाव्यांच्या प्रक्रियेसाठी तांत्रिक सहाय्य, विविध शासकीय योजना व निधींसोबत अभिसरण (Convergence), अंमलबजावणीतील त्रुटी व अडचणींची ओळख व पाठपुरावा तसेच नियमित आढावा व प्रगतीचे दस्तऐवजीकरण यासाठी सहकार्य केले जाणार आहे.

या सहकार्याअंतर्गत CFR व्यवस्थापन समित्या, उपविभागीय स्तरावरील समित्या, जिल्हास्तरीय समिती तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसाठी क्षमता बांधणी करण्यात येणार असून, CFR अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशिक्षण मॉड्यूल्स, मार्गदर्शिका व माहिती-शिक्षण-संवाद (IEC) साहित्य विकसित करण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील आदिवासी व वननिवासी समुदायांच्या सामुदायिक वनसंसाधन हक्कांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळण्यासोबतच, हक्कांच्या मान्यतेनंतरच्या व्यवस्थापनासाठी सातत्यपूर्ण क्षमता बांधणी, तांत्रिक सहाय्य, विभागीय समन्वय आणि नियमित आढावा यंत्रणा अधिक बळकट होणार आहे.

जिल्हा प्रशासन आणि Vayam यांच्यातील हा सामंजस्य करार पालघर जिल्ह्यातील CFR हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्यपूर्ण, जिल्हाव्यापी आणि नियमित आढावा घेतल्या जाणाऱ्या प्रक्रियेला बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

01/09/2026

वाढीव-वैती दळणवळण : कायमस्वरूपी पुलासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनास प्रस्ताव सादर

पालघर, दि. १ सप्टेंबर २०२६ : राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि संबंधित विभागांच्या समन्वयाने पालघर जिल्हा प्रशासनाने पालघर तालुक्यातील वाढीव व वैती या गावांसाठी कायमस्वरूपी, सुरक्षित व बारमाही दळणवळण सुविधेचा प्रस्ताव पुढे नेला आहे. क्षेत्रीय पाहणी व तांत्रिक तपासणीनंतर पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव व आराखडा पुढील विचार व मान्यतेसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

वाढीव व वैती या गावांची लोकसंख्या अनुक्रमे ७७२ व ७१६ असून ही गावे चोहोबाजूंनी वैतरणा नदीने वेढलेली आहेत. भरती-ओहोटीच्या नदीवरील मोठ्या पुलाच्या माध्यमातूनच दळणवळण उपलब्ध करून देणे आवश्यक असलेले, एका विलग बेटवजा वस्तीचे हे वैशिष्ट्यपूर्ण प्रकरण आहे. गावात इयत्ता ७ वी पर्यंत शाळा असून इयत्ता ८ वी ते १२ वी चे सुमारे २५ ते ३० विद्यार्थी शिक्षणासाठी अन्य गावात जातात, तर बहुतांश रहिवासी काम व शिक्षणासाठी जवळील पालघर, सफाळे किंवा वसई-विरार परिसरात प्रवास करतात.

सद्यस्थितीत ग्रामस्थांना कांदरवणच्या बाजूने मुख्य भूमीपर्यंत पोहोचता येते. तेथे सुमारे २०० मीटर अंतरावर जेट्टीची सुविधा उपलब्ध असून सुमारे ६०० मीटरचा नदीपात्रातील प्रवास खासगी बोटींद्वारे केला जातो. जेट्टीच्या ठिकाणी प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ११५ असून तो या गावांना पालघर व सफाळे गावांना जोडतो. रेल्वे पुलावरील पादचारी मार्ग हा रेल्वेच्या देखभाल कर्मचाऱ्यांसाठी असून तो सार्वजनिक वापरासाठी निर्धारित केलेला नाही.

क्षेत्राचे विशेष स्वरूप विचारात घेऊन वाढीव-वैती दळणवळण प्रकल्प हा रस्ते काम म्हणून नव्हे, तर 'सागरी सेतू' काम म्हणून प्रस्तावित करण्यात आला. तांत्रिक व निधीविषयक बाबी लक्षात घेता राज्य स्तरावरील हे वर्गीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरले.

त्यानंतर जिल्हा प्रशासनाने प्रकल्पाच्या सविस्तर विचारार्थ तांत्रिक टिपणी, रेखाचित्र नकाशा, ग्रामपंचायत आराखडा, उपग्रह छायाचित्रे व इतर पूरक कागदपत्रांसह आवश्यक तांत्रिक माहिती व प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला.

प्रस्तावित पूल अंदाजे ७०० मीटर लांबीचा असून त्याची प्राथमिक अंदाजित किंमत सुमारे रु.२५.९५ कोटी आहे. आराखडा व प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून आवश्यक प्रशासकीय व वित्तीय मान्यतांसाठी जिल्हा प्रशासनाकडून संबंधित प्राधिकरणांशी समन्वय व पाठपुरावा सुरू आहे.

कायमस्वरूपी पुलाचा प्रस्ताव विहित प्रशासकीय व तांत्रिक टप्प्यांतून पुढे जात असतानाच, या गावांतील रहिवाशांची ये-जा अधिक सुलभ होण्यासाठी जिल्हा प्रशासन पर्यायी दळणवळण उपायांचाही सक्रियपणे शोध घेत आहे.

गावांचे स्थान आणि वैतरणा नदीचे भरती-ओहोटीचे स्वरूप लक्षात घेता या प्रकल्पासाठी सविस्तर तांत्रिक प्रक्रिया आवश्यक आहे. कांदरवण, नवघर व वैतरणा स्थानक या बाजूंसह विविध संरेखन पर्यायांची पुलाची लांबी, संरचनात्मक व्यवहार्यता, सुगमता व खर्च या दृष्टीने तपासणी करण्यात आली. रेल्वे यंत्रणेच्या सान्निध्यामुळे रेल्वे विभागाशी समन्वय साधणे आवश्यक ठरले; त्यामध्ये विद्यमान संरचनेचा वापर करता येईल का याचीही तपासणी करण्यात आली, जेणेकरून सार्वजनिक निधी सर्वाधिक टिकाऊ व किफायतशीर पर्यायावरच खर्च होईल.

या स्वरूपाच्या पुलासाठी पुढील तांत्रिक टप्प्यांमध्ये जलमापन व भूतांत्रिक सर्वेक्षण, भरती-ओहोटीच्या परिस्थितीस अनुरूप संरचनात्मक संकल्पन, योग्य कार्यान्वयन यंत्रणेची निश्चिती आणि भरती-ओहोटीच्या जलमार्गावर बांधकामासाठी आवश्यक वैधानिक परवानग्या प्राप्त करणे यांचा समावेश होतो. यांपैकी प्रत्येक टप्पा हा विहित तांत्रिक टप्पा असून प्रस्तावाची त्यातून सातत्याने प्रगती होत गेली आहे.

वाढीव व वैती गावांसाठी सुरक्षित व विश्वासार्ह दळणवळण सुधारण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली हा पुलाचा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या सुयोग्य, शाश्वत व वित्तीयदृष्ट्या उचित पद्धतीने पुढे नेण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. प्रस्तावित पुलामुळे या गावांतील रहिवाशांना शिक्षण, आरोग्य, रोजगार व इतर अत्यावश्यक सेवांची उपलब्धता लक्षणीयरीत्या सुधारेल.

*पालघरमध्ये ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा* *गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*पालघर, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : भटके व विमुक्त स...
01/09/2026

*पालघरमध्ये ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा*

*गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*

पालघर, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : भटके व विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या योजनांचा लाभ समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती आणि समन्वय करण्यात येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रकाश हसनाळकर यांनी सांगितले.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पालघर यांच्या वतीने सोमवार, दि. 31 ऑगस्ट रोजी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या सभागृहात ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शासकीय अधिकारी, अशासकीय सदस्य, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सहाय्यक संचालकांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच वनार्टी, महाज्योती, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि इतर महामंडळांच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या शैक्षणिक, आर्थिक व विकासात्मक संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रकाश हसनाळकर आणि दुर्गेश चव्हाण यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजातील युवकांनी शिक्षण, कौशल्यविकास आणि उपलब्ध शासकीय योजनांचा प्रभावी उपयोग करून प्रगतीच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रकाश हसनाळकर यांनी केले.
कार्यक्रमास सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे तसेच पालघरचे तहसीलदार तुषार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. भटके व विमुक्त समाजासमोरील विविध प्रश्नांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, योजनांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत नेणे आणि सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करणे, यावर भर देण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
‘भटके विमुक्त दिवस’ निमित्त पालघर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन शुभांगी लोणकर, सहाय्यक संचालक शुभांगी लोणकर आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी तुषार डामसे यांच्या सहकार्याने करण्यात आले. समाजाच्या विकासासाठी शासनाच्या योजना आणि समाजातील घटक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

01/09/2026

वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांसाठीच्या प्रस्तावित नुकसानभरपाई पॅकेजबाबत ८ सप्टेंबर रोजी हितधारकांची बैठक

पालघर, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमार समुदायासाठी न्याय्य, पारदर्शक आणि सर्वसमावेशक पुनर्वसन व नुकसानभरपाई प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

वाढवण बंदर प्रकल्पाचे नियोजन सुरू झाल्यापासून प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक मच्छीमारांची उपजीविका आणि त्यांचे सामाजिक व आर्थिक हित यांना योग्य प्राधान्य दिले जावे, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने सातत्याने घेतली आहे.

याबाबत यापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या असून, मत्स्यव्यवसाय विभागामार्फत मच्छीमारांशी नुकसानभरपाईच्या मसुद्याबाबत प्राथमिक चर्चाही करण्यात आली आहे.

या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, बाधित क्षेत्रातील मच्छीमार कुटुंबांची उपजीविका मासेमारीवर किती अवलंबून आहे, हे समजून घेण्यासाठी जेएनपीए (JNPA) मार्फत यापूर्वी प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, मच्छीमार समुदायातील काही घटकांचा सहभाग मर्यादित राहिल्यामुळे हे सर्वेक्षण पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे मच्छीमार आणि स्थानिक हितधारकांमध्ये अधिक जागरूकता व विश्वास निर्माण करण्यासाठी प्रशासनाने त्यांच्याशी संवाद वाढवला आहे.

सर्वेक्षणातून प्राप्त माहिती आणि हितधारकांशी झालेल्या चर्चांच्या आधारे JNPA ने बाधित मच्छीमारांसाठी नुकसानभरपाईचा मसुदा जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.

प्रस्तावित नुकसानभरपाईची गणना दोन महत्त्वाच्या आधारांवर करण्यात आली आहे. त्यापैकी पहिला म्हणजे ९ मार्च २०२३ रोजीचा शासन निर्णय, ज्यामध्ये मच्छीमारांच्या चार श्रेणींसाठी (C1 ते C4) नुकसानभरपाईचे दर निश्चित करण्यात आले आहेत. महागाईचा विचार करून या रकमांमध्ये २०२५ पर्यंतच्या ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (CPI) सुधारणा करण्यात आली आहे.

प्रस्तावित नुकसानभरपाईची गणना ९ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयावर आधारित करण्यात आली आहे; या निर्णयामध्ये C1 ते C4 अशा चार श्रेणींमधील मच्छिमारांसाठी नुकसानभरपाईचे दर निश्चित करण्यात आले आहेत. महागाईचा विचार करून, २०२५ पर्यंतच्या 'ग्राहक किंमत निर्देशांकाचा' (CPI) वापर करून या रकमेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

प्रस्तावित आराखड्यानुसार मासेमारीचा प्रकार आणि मच्छीमारांच्या उपजीविकेवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे.

बंदर हद्दीत मासेमारी करणाऱ्यांसाठी, एका दिवसाच्या Dol Net मासेमारीसाठी ₹१४.१५ लाख रुपये, तर अनेक दिवसांच्या Gill Net मासेमारीसाठी ₹१५.७२ लाख रुपये नुकसानभरपाई प्रस्तावित आहे.

बंदर हद्दीबाहेर मासेमारी करणाऱ्यांसाठी, ही प्रस्तावित रक्कम अनुक्रमे ₹७.०८ लाख रुपये आणि ₹७.८६ लाख रुपये इतकी आहे.

तसेच, हाताने मासे, शिंपले किंवा इतर समुद्री जीव गोळा करणाऱ्यांसाठी ₹४.९० लाख रुपये, तर उदरनिर्वाहासाठी मासेमारी करणाऱ्यांसाठी ₹२.४५ लाख रुपये नुकसानभरपाई प्रस्तावित आहे.

मच्छीमार समुदायातील अधिक गरजू आणि असुरक्षित घटकांचा विशेष विचार करण्यात आला आहे. C3 आणि C4 श्रेणीतील मच्छीमारांसाठी नुकसानभरपाई वाढविण्याच्या उद्देशाने २ पट गुणक (2x multiplying factor) प्रस्तावित करण्यात आला आहे.

थेट नुकसानभरपाईव्यतिरिक्त, या मसुदा पॅकेजमध्ये मच्छीमार समुदायाच्या दीर्घकालीन कल्याणासाठी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजनांचाही प्रस्ताव आहे.

विशेषतः, २०२३ च्या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या ₹५० कोटी रुपयांच्या मच्छीमार कल्याण निधीऐवजी ₹१०० कोटी रुपयांचा मच्छीमार कल्याण निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या निधीचा उपयोग मच्छीमारांचे कल्याण, उपजीविका वाढविणे, कौशल्य विकास, मत्स्यव्यवसायाशी संबंधित पायाभूत सुविधा आणि समुदाय विकासासाठी करण्याचा प्रस्ताव आहे.

याशिवाय, राज्य शासनाच्या सहकार्याने ₹२५० कोटी रुपये खर्चाचे मच्छीमार बंदर (Fishing Harbour) उभारण्याचा प्रस्ताव आहे. या बंदरामुळे नौका सुरक्षितपणे नांगरण्याची व मासे उतरविण्याची सुविधा, मासे हाताळणी व विपणनासाठी चांगल्या सुविधा, अधिक सुरक्षितता तसेच मच्छीमारांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

या प्रस्तावात पालघर जिल्ह्यातील पाच विद्यमान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) उत्कृष्टता केंद्रे (Centres of Excellence) म्हणून विकसित करण्यासाठी ₹१०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये आधुनिक मत्स्यव्यवसाय पद्धती, मत्स्य तंत्रज्ञान, मासे हाताळणी, मूल्यवर्धन आणि सागरी सुरक्षितता याबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रक्रियेचा पुढील टप्पा म्हणून जिल्हा प्रशासनाने ८ सप्टेंबर रोजी JNPA च्या उपस्थितीत हितधारकांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत स्थानिक नागरिक, मच्छीमार प्रतिनिधी आणि इतर संबंधित हितधारकांसमोर प्रस्तावित नुकसानभरपाई व कल्याणकारी पॅकेज सादर करण्यात येणार आहे.

प्रस्तावित नुकसानभरपाई आणि कल्याणकारी पॅकेजची सविस्तर माहिती देणे, मच्छीमार समुदायाच्या सूचना व तक्रारी जाणून घेणे तसेच पॅकेज अंतिम मंजुरीसाठी पुढे नेण्यापूर्वी व्यापक चर्चा करणे, हा या बैठकीचा उद्देश आहे.

स्थानिक मच्छीमार समुदायाचे कल्याण आणि त्यांच्या उपजीविकेची दीर्घकालीन सुरक्षितता जपतच वाढवण बंदराचा विकास केला जावा, अशी जिल्हा प्रशासनाची भूमिका आहे. न्याय्य, पारदर्शक, उपलब्ध माहिती व अभ्यासावर आधारित आणि मच्छीमार समुदायाच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणारी पुनर्वसन व नुकसानभरपाई व्यवस्था तयार करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू राहतील.

31/08/2026

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती सादर करावे
..जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड

पालघर, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision–SIR) प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्राची प्रारूप मतदार यादी सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदाराने स्वतःचेच नव्हे, तर कुटुंबातील प्रत्येक मतदाराचे नाव मतदार यादीत आहे की नाही, याची काळजीपूर्वक पडताळणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी केले आहे.
प्रारूप मतदार यादीत नाव आढळले नाही म्हणून पात्र मतदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार असून, प्राप्त दावे-हरकतींची सुनावणी व निराकरणाची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

नावासोबत ‘या’ बाबीही तपासा

प्रारूप मतदार यादी तपासताना केवळ नाव आहे की नाही, एवढेच पाहणे पुरेसे नसून मतदारांनी पुढील तपशीलांचीही खात्री करावी
मतदाराचे नाव अचूक आहे का?
वडिलांचे किंवा पतीचे नाव योग्य आहे का?
वय अथवा जन्मतारीख आणि लिंगाची नोंद बरोबर आहे का?
छायाचित्र व पत्ता योग्य आहे का?
मतदार ओळखपत्र क्रमांक EPIC अचूक आहे का?
नेमून दिलेले मतदान केंद्र योग्य आहे का?
विशेषतः वृद्ध नागरिक, शिक्षण किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले सदस्य, स्थलांतरित नागरिक तसेच SIR प्रक्रियेदरम्यान ज्यांचे गणना प्रपत्र (Enumeration Form) भरले गेले नाही किंवा ज्यांची पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही, अशा मतदारांची नावे कुटुंबीयांनी आवर्जून तपासावीत.

नाव नाही? ‘Form 6’ने संधी अजूनही खुली

प्रारूप मतदार यादी ही अंतिम यादी नसल्याने पात्र मतदाराचे नाव त्यात नसल्यास ‘आता काही करता येणार नाही’, असा गैरसमज करून घेऊ नये. नवीन मतदार नोंदणी किंवा पात्र असूनही प्रारूप यादीत नाव नसल्यास आवश्यक कागदपत्रे व घोषणापत्रासह नमुना क्रमांक ६ (Form 6) द्वारे दावा सादर करता येणार आहे.
मतदाराच्या नावात, पत्त्यात, वय किंवा जन्मतारखेत, छायाचित्रात अथवा अन्य तपशिलात त्रुटी असल्यास नमुना क्रमांक ८ (Form 8) द्वारे दुरुस्तीचा अर्ज करता येईल.

ASDD मतदारांनी विशेष काळजी घ्यावी

पूर्वीच्या मतदार यादीत नाव असले, मात्र SIR प्रक्रियेदरम्यान Absent/Shifted/Dead/Duplicate (ASDD) या प्रवर्गात नोंद झालेले मतदार किंवा ज्यांची पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही, अशा मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आवर्जून तपासावे.
पात्र मतदार असल्यास संबंधितांनी उपलब्ध अधिकृत सुविधेद्वारे आपली स्थिती तपासून, विहित मुदतीत आवश्यक अर्ज व कागदपत्रे सादर करावीत.

मतदार यादी कुठे तपासाल?

प्रारूप मतदार यादी आणि मतदार नोंदणीसंबंधी माहिती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत निवडणूक आयोगाचे Voters’ Service Portal, तसेच मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडूनही मतदार यादीची माहिती घेता येईल.
दावा किंवा दुरुस्ती अर्ज करण्याची आवश्यकता भासल्यास मतदारांनी ओळख, वय/जन्मतारीख, रहिवास यासंबंधी लागू असलेले आवश्यक पुरावे तसेच २००२ च्या मतदार यादीतील उपलब्ध तपशील तयार ठेवावेत. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची खात्री अधिकृत निवडणूक पोर्टल किंवा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून करून घ्यावी.

‘प्रारूप यादी म्हणजे दुरुस्तीची संधी’

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले, “प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास मतदारांनी घाबरून जाऊ नये. ही अंतिम मतदार यादी नसून पात्र मतदारांना दावे व हरकती दाखल करण्याची संधी उपलब्ध आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःचे तसेच कुटुंबातील सर्व पात्र मतदारांचे नाव, पत्ता, वय, छायाचित्र, EPIC क्रमांक आणि मतदान केंद्राची माहिती काळजीपूर्वक तपासावी. काही त्रुटी किंवा नाव वगळलेले आढळल्यास शेवटच्या तारखेची वाट न पाहता विहित नमुन्यात तातडीने अर्ज सादर करावा.”
*महत्त्वाच्या तारखा*
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
३१ ऑगस्ट २०२६
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी
३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६
दावे-हरकतींची सुनावणी व निराकरण
३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
४ नोव्हेंबर २०२६
“३१ ऑगस्ट हा आपल्या मताधिकाराची नोंद तपासून आवश्यक दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा दिवस आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने प्रारूप मतदार यादीत आपले नाव आवर्जून तपासावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी केले आहे.

नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत​नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे वि...
27/08/2026

नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत

​नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत.
​या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे:

​🔗 माहिती नोंदवण्यासाठी लिंक:
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

पालघर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन

जर पालघर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील , तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी वरील लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी असे आवाहन डा. इंदु राणी जाखड, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांनी केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर
02525-297474
मोबाईल - 8237978873

Address

Palghar
401404

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+912525255333

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय,पालघर. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जिल्हा माहिती कार्यालय,पालघर.:

Shortcuts

Share