07/06/2026
महाराष्ट्रात लोकशाही हरली, झुंडशाही जिंकली? मुस्लिम कुटुंबांवर गाव सोडण्याची वेळ !
सांगली जिल्ह्यातील आरळा (ता. शिराळा) येथील मुस्लिम कुटुंबे हिंदुत्ववादी झुंडशाहीची बळी ठरत आहेत. वारंवार होणारे जातीय-धार्मिक तणाव, सततचा दबाव, भीतीचे वातावरण आणि निर्घृण अन्याय यामुळे अखेर त्यांनी गाव सोडण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात पोलिस प्रशासन अयशस्वी ठरल्याचे जाणवते. झुंडशाहीसमोर प्रशासनाची हतबलता स्पष्टपणे दिसून येते.
जन्मभूमीतही सुरक्षितता उरली नसल्याने त्यांनी आपले जीवनावश्यक सामान डोक्यावर घेतले आणि न्याय मागण्यासाठी कोल्हापूर खंडपीठाकडे पायी निघाले होते. मात्र काही अंतर गेल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी आश्वासने दिली, परंतु त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून आली नाही.
राज्यात दररोज अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत असताना, राजकीय आणि पदाच्या लालसेपोटी पक्षश्रेष्ठींसमोर लोटांगण घालणाऱ्या अल्पसंख्याक आयोगाच्या Pyare Khan अध्यक्षांकडून कोणतीही अपेक्षा नाही. राज्य अल्पसंख्याक आयोग सत्ताधाऱ्यांनी गळ्यात पट्टा घातलेल्या श्वानाप्रमाणे भूमिका बजावत असल्याचे दिसते.
हा केवळ काही कुटुंबांचा प्रवास नाही, तर झुंडशाहीसमोर हतबल आणि लाचार होत चाललेल्या लोकशाहीचा प्रवास आहे. देश स्वतंत्र झाला, तरी काही नागरिकांना स्वतःच्या गावात, स्वतःच्या घरातही माणसासारखे जगण्याचा अधिकार का नाकारला जात आहे? हेच का आपल्या महाराष्ट्राचे पुरोगामित्व? कुठे गेले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या समतेच्या विचारधारेचा महाराष्ट्र?
जेव्हा एखाद्या समुदायाला सतत भीतीच्या छायेत जगावे लागते,
जेव्हा त्यांच्या रक्तबंबाळ आक्रोशाकडे कोणी लक्ष देत नाही,
जेव्हा अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांना घरदार सोडावे लागते,तेव्हा लोकशाही मरण पावते आणि न्यायव्यवस्था लज्जित होते.
राज्यात मुस्लिम समाजाविरुद्ध चाललेला सुनियोजित द्वेष, सामाजिक बहिष्कार आणि धार्मिक ध्रुवीकरण याकडे आणखी किती काळ दुर्लक्ष केले जाणार?
विरोधकदेखील बहुसंख्याक समाजाच्या मतांच्या गणितापुढे नैतिकतेला मूठमाती देत मौन धारण करताना दिसतात.
भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला तो कोणत्याही धर्माचा असो सन्मानाने, सुरक्षिततेने आणि समान न्यायाच्या आधारे जगण्याचा हक्क प्रदान करते. मात्र प्रत्यक्षात जात आणि धर्म पाहून कायद्याची अंमलबजावणी होत असल्याचे जाणवत आहे.
अजून किती काळ आपण महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य खालावताना पाहत राहणार आहोत?
महाराष्ट्रात सामाजिक संवेदनाच उरली नाही का?
SDPI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
Adv. अजहर तांबोळी
#संविधान #लोकशाही #सामाजिकन्याय
#मानवीहक्क #बंधुता #महाराष्ट्र
#झुंडशाही #न्याय #समता