05/12/2024
आठवणी
"विजय पटवर्धन फाऊंडेशन" आयोजित,
"निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा"
२०२२ साली या स्पर्धेचे दुसरे वर्ष संपन्न झाले. दुसऱ्या वर्षी राज्यभरातून ४५ लेखकांनी आपले लेख स्पर्धेत उतरवले होते. राजेश दामले आणि अक्षय वाटवे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. तर, प्रसिध्द लेखक आणि नाटककार श्रीनिवास भणगे यांच्या हस्ते परेश सभागृह येथे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या समारंभात बोलताना श्रीनिवास भणगे म्हणाले, "परिसंवाद, चर्चासत्रे आणि साहित्य संमेलनातही विनोदी लेखन तसेच लेखकाला सापत्न वागणूक मिळते. साहित्याच्या मंडपात विनोदी लेखक करणाऱ्यास दुसऱ्या पंगतीत बसविले जाते." या परिस्थितीवर गंभीरपणे चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. वास्तूप्रसादचे प्रसाद शिवरकर, स्पर्धेचे परिक्षक प्रसिद्ध निवेदक राजेश दामले, युवा नाट्यकर्मी अक्षय वाटवे, फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन व्यासपीठावर होते. मधुरा टापरे यांनी त्यांचे बंधू मंदार आगरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व्दितीय करंडक पुरस्कृत केले होते. तर प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते योगेश सोमण यांनी त्यांचे बंधू अभिजित सोमण यांच्या स्मृती प्रित्यर्थ तृतीय करंडक पुरस्कृत केला होता. या समारंभास अभिनेत्री माधवी सोमण, ऋग्वेद सोमण, मधुरा आगरकर-टापरे, प्रशांत तपस्वी, किशोर कुलकर्णी, अभिजित इनामदार, धनंजय आमोणकर, वृषाली पटवर्धन
आणि राजू बावडेकर यांची विशेष उपस्थिती होती.
"विनोदी लेखन म्हणजे पोरकटपणा नसून विनोदबुद्धी जागृत असणे हा लेखकाकडील मोठा गुण असून, विनोदबुद्धी या गुणामुळे व्यक्तीचे जगणे सुसह्य होते. विनोदाकडे पोरकटपणा किंवा करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते; परंतु विनोद हा विसंगतीतून निर्माण होतो. विनोदाचा आत्मा गंभीर आहे हे लक्षात घेतले जात नाही. विनोदाकडे गंभीरपणे पाहिले तर त्यातून खरा विनोद सापडेल. विनोदी लेखक, वाचक असा शिक्का असणारा दृष्टीदोष साफ केला पाहिजे. तरच, विनोदी लेखनाच्या क्षेत्रात प्रगती होईल."
परीक्षक, राजेश दामले म्हणाले, "विनोदी लेखन करणे सोपी गोष्ट नाही. अशा पद्धतीचे लेखन करणाऱ्यांनी भरपूर वाचन केले पाहिजे. सद्यस्थितीत घडणारा विनोद हा अस्सल विनोद नाही. विनोदी लेखन करताना संहितेची मांडणी, कथेतील प्रसंगी फुलविणे, व्यक्तिरेखा यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे."
दुसरे परीक्षक, अक्षय वाटवे म्हणाले, "वाचकाला रडविणे सोपे असते. पण, हसविणे ही अवघड गोष्ट आहे. विनोदी लेखन करणाऱ्या लेखकाने आपल्या लिखाणाचे परिक्षण करणे, कथा बांधिव असणे गरजेचे आहे. स्वत:ला कोणती लेखनशैली आवडते हे समजून घेऊन लिखाण करणे अपेक्षित आहे."
समारंभाच्या सुरुवातीस विजय पटवर्धन यांनी फाऊंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली. तर, परिचय आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सुपेकर यांनी केले.
*स्पर्धेचा सविस्तर निकाल*
प्रथम क्रमांक - विजय पटवर्धन पुरस्कृत निर्मला श्रीनिवास स्मृती सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच हजार रुपये रोख - अपर्णा मोडक (राजकारणाचा लाडू).
द्वितीय क्रमांक - वसुधा क्रिएशन पुरस्कृत मंदार वामन आगरकर स्मृती सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि तीन हजार रुपये रोख - योगेश शिंदे (वडा-पाव).
तृतीय क्रमांक - योगेश सोमण पुरस्कृत अभिजित सोमण स्मृती सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि दोन हजार रुपये रोख - अभयकुमार कुलकर्णी (कदर).
श्रीनिवास पटवर्धन, हे विजय पटवर्धन यांचे वडिल एक विनोदी लेखक होते आणि त्यांची काही पुस्तके आणि अनेक लेख प्रसिद्ध आहेत. निर्मला पटवर्धन या विजय पटवर्धन यांच्या आई , त्या श्रीनिवास पटवर्धन यांना लेखनकार्यात मदत करायच्या. त्या दोघांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही विनोदी लेखन स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते.
यंदाचे २०२४ हे या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. या स्पर्धेतून जो आर्थिक लाभ होईल तो अडचणीत असलेल्या कलाकारांना मैत्रीचा हात देण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे.