09/06/2025
🌳🌳🌳 *वृक्षारोपण अभियान 2025 चा उत्साहात शुभारंभ*
रविवार दिनांक 8 जून 2025 रोजी सकाळी भुगाव, भूकुम येथील छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाच्या नयनरम्य किनाऱ्यावर सर्व भुगाव व भुकूम ग्रामस्थ व नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
या सोहळ्यास आमदार श्री शंकर भाऊ मांडेकर, अभिनेते नाना पाटेकर यांचे सुपुत्र श्री मल्हार पाटेकर, नगरसेवक श्री दिलीप वेडे पाटील, नगरसेविका सौ अल्पनाताई गणेश वरपे, री. कर्नल श्री लक्ष्मण साठे, नाम फाउंडेशनचे श्री निलेश जावळकर, भुगाव व भूकुम चे आजी / माजी सरपंच / उपसरपंच, पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, व्यवसायिक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, सोसायट्यांमध्ये राहणारे रहिवासी, नागरिक, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ॲड. कृणाल घारे यांनी राम नदी स्वच्छता अभियानाची सुरुवात व त्याविषयीची कायदेशीर माहिती देत सर्व नागरिकांना त्यांचे हक्क व जबाबदारी याबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला दिला.
रिटायर्ड कर्नल श्री लक्ष्मण साठे यांनी त्यांच्या काळातील युद्ध आठवणींना उजाळा देत ऑपरेशन सिंदूर व नव्या भारताच्या युद्धक्षमतेविषयी भाष्य केले. तसेच वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धना साठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले. तसेच त्यांनी ग्रीन थंब या प्रोजेक्ट विषयी उपस्थितांना माहिती दिली.
श्री साई एज्युकेशन ट्रस्ट चे संस्थापक व साई क्लासेस चे संचालक प्रा. सागर शेडगे सर यांनी सामाजिक कार्य करीत असताना येणाऱ्या अडचणींवर भाष्य करीत सर्व कार्यकर्त्यांचे, विशेषतः श्री अनिल करंजावणे यांचे, कौतुक करीत आभार मानले.
सेवा सागर फाउंडेशनचे संस्थापक श्री केदार क्षीरसागर यांनी लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या या चळवळीचे महत्त्व सांगून नागरी समस्या निवारण समितीच्या आत्तापर्यंतच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. यामध्ये भुगाव स्वच्छता अभियान, राम नदी स्वच्छता अभियान, ट्राफिक मॅनेजमेंट, छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील गाळ काढण्याचे काम, अनेक प्रबोधनात्मक उपक्रम, यांचा समावेश होता.
नागरी समस्या निवारण समितीचे धडाडीचे कार्यकर्ते श्री अनिल करंजावणे सर यांनी त्यांच्या खडतर प्रवासाविषयी माहिती देत सर्व ग्रामस्थ व नागरिक यांना जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे भावनिक आवाहन केले.
नागरी समस्या निवारण समितीचे भक्कम आधारस्तंभ श्री माऊली शेठ सातपुते यांनी राम नदीचे पुनरुज्जीवन करून कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे महत्त्व पटवून दिले व या कामी शासकीय सहकार्य मिळावे अशी मागणी केली.
नागरी समस्या निवारण समितीचे युवा कार्यकर्ते श्री दीपक चोंदे यांनी वृक्षारोपण अभियान राबवण्याची संकल्पना व भविष्यातील नियोजन याविषयी माहिती दिली.
ह भ प दशरथ महाराज वहाळे यांनी भारतीय संस्कृतीचा दाखला देत सर्व नागरिकांना कचऱ्याचे सुनियोजन करण्याचा सल्ला दिला व उपक्रमास शुभाशीर्वाद दिले.
भूकूमच्या सरपंच सौ गौरीताई भरतवंश यांनी गावातील रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन देत NSNS च्या कार्यास सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटीबद्ध असल्याचे सांगितले.
श्री मल्हार पाटेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करीत नाम फाउंडेशन चा भक्कम पाठिंबा या कार्यास भविष्यातही असाच मिळत राहील असे सांगितले. तसेच NSNS च्या कार्यास खूप खूप शुभेच्छा दिल्या.
आमदार श्री शंकर भाऊ मांडेकर यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व गावांचा सर्वतोपरी विकास करण्याचे आश्वासन देत आत्तापर्यंत घेतलेल्या सरकारी निर्णयान विषयी माहिती दिली. भुगाव व भूकुम मधील प्रलंबित प्रश्नांमध्ये लक्ष घालून ते सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यामध्ये विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.
सेवा सागर फाउंडेशनचे श्री केदार क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.
यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
हे वृक्षारोपण अभियान असेच सुरू राहील व ज्यांना वृक्षारोपण करायचे असेल त्यांनी NSNS किंवा सेवा सागर फाउंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
वृक्षारोपणानंतर श्री जयंत फडके काका यांनी अल्पोपहाराची सोय केली होती.
या कार्यक्रमास भुगाव ग्रामपंचायत, भुकूम ग्रामपंचायत, भुगाव व भुकूम येथे राहणारे सर्व ग्रामस्थ, रहिवासी तसेच श्री साई एज्युकेशन ट्रस्ट, सेवा सागर फाउंडेशन, जीवन ज्योत फाउंडेशन, सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, रामकृष्ण प्रतिष्ठान, सेवा फाउंडेशन, देवराई, या व अशा अनेक संस्थांचे सहकार्य लाभले.