20/11/2025
*बालसुरक्षेबाबत आपण इतके उदासीन का?*
३.५ वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि निर्घृण खून ही घटना फक्त एका गावाची किंवा एका कुटुंबाची शोकांतिका नाही; ती आपल्या संपूर्ण समाजाच्या सुरक्षा यंत्रणेचे अपयश उघड करणारी आहे. आपण रोज तांत्रिक प्रगती, आर्थिक विकास आणि स्मार्ट शहरांची स्वप्ने पाहतो, *पण आपल्या निरागस मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आपण इतके मौन का धरतो आहोत?*
बालसुरक्षेविषयी बोलताना आपण केवळ “गुन्हेगाराला कडक शिक्षा द्या” इथपर्यंतच मर्यादित राहतो. पण कठोर शिक्षा हा उपाय नंतरचा आहे, *प्रश्न हा आहे की अशा घटना घडूच नयेत यासाठी आपण काय करत आहोत?* समाज म्हणून आपण मुलांना सुरक्षित वातावरण, जागरूकता आणि संरक्षण देण्यात वारंवार अपयशी ठरत आहोत. *POCSO कायदा असूनही अनेक शाळा, संस्था आणि स्थानिक समित्या प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष करतात. लैंगिक शिक्षणाला आजही टॅबू मानलं जातं, आणि मुलांच्या वर्तनातील धोकादायक संकेतांकडे आपण डोळेझाक करतो.*
आजची कटू वस्तुस्थिती अशी आहे की अनियंत्रित मोबाईल वापर, पॉर्नचा सहज प्रवेश, इंटरनेटवरील हिंसक व लैंगिकीकृत कंटेंट, मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष या सगळ्यामुळे समाजात विकृत प्रवृत्ती वेगाने वाढत आहेत. या घटनेने आपल्याला एकच प्रश्न विचारायला भाग पाडले आहे , *आपण आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याबाबत खरेच गंभीर आहोत का, की फक्त घटना घडल्यावर शोक व्यक्त करून विसरणारे समाजलोकी आहोत?*
बालसुरक्षा ही फक्त पालकांची जबाबदारी नाही; ती शासन, प्रशासन, शाळा, समाज आणि प्रत्येक नागरिकाची आहे. *प्रत्येक शाळेत POCSO जागरूकता, सामुदायिक Child Protection Committees, मानसिक आरोग्य समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक प्रशिक्षण अनिवार्य करणे हे आता पर्याय नसून अपरिहार्य आहे.* कारण आजचा आपला निष्क्रियपणा उद्याच्या आणखी एका निरपराध जीवाला किंमत चुकवायला लावू शकतो.
*बालकांच्या सुरक्षिततेबद्दलचा हा मौनभंग आजपासून आपणच करायला हवा, नाहीतर इतिहास आपल्यालाच दोषी ठरवेल.*
– *हर्षल पटवारी, संस्थापक, बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य*