29/10/2020
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेबांना राज्यातील संगणकपरिचालकांचे खुले पत्र !
आदरणीय महोदय,
आपणास खुले पत्र लिहिण्यास कारण की,महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत – पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून एप्रिल २०११ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत संग्राम (संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र )हा प्रकल्प राबवण्यात आला.या प्रकल्पाची अमलबजावणी यंत्रणा म्हणून महाऑनलाईन लिमिटेड या कंपनीची नियुक्ती शासनाने केली या कंपनीने ग्रामपंचायत स्तरावर २२७५० संगणकपरिचालक,पंचायत समिती स्तरावर ७०२ तर जिल्हा परिषद स्तरावर १७० संगणकपरिचालकांची नियुक्ती केली.या सुमारे २३६२२ संगणकपरिचालकानी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे महाराष्ट्र शासनाला ई –पंचायत मध्ये केंद्र शासनाकडून सलग ३ वर्ष देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
महाऑनलाईन ला त्यावेळी प्रती ग्रामपंचायतकडून १३ व्या वित्त आयोगातून ८००० रुपये देण्यात येत होते परंतु महाऑनलाईन कडून संगणकपरिचालकांना ५० रु,२०० रुपयापासून ३५०० ते ३८०० रुपये पर्यंत मानधन देऊन ही कंपनी उर्वरित निधी स्टेशनरीच्या नावाखाली हडप करून संगणकपरिचालकांची आर्थिक पिळवणूक करून मानसिक त्रास देत होती.त्यामुळे राज्यातील संगणकपरिचालकानी या कंपनीच्या हुकुमशाही व मनमानी त्रासाला कंटाळून राज्यात “महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना” स्थापन करून राज्यव्यापी लढा उभारला.त्यानुसार तालुका,जिल्हा व विभाग स्तरावर आंदोलने झाल्यावर ११ डिसेंबर २०१४ रोजी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून किमान वेतन देऊन जिल्हा परिषदे मार्फत नियुक्ती द्यावी तसेच या भ्रष्ट महाऑनलाईन कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यावेळी हजारोंच्या संख्येने संगणक परिचालक सहभागी झाले होते.त्यावेळी आपल्याच पक्षाचे असलेले तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री मा.दिपकजी केसरकर साहेब यांनी आंदोलन स्थळावर भेट देऊन मागणी मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले.परंतु त्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे संघटनेच्या माध्यमातून २ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत मुंबईत लाक्षणिक उपोषण केले त्यावेळी सुद्धा ग्रामविकास राज्यमंत्री दिपकजी केसरकर साहेबांनी लेखी आश्वासन दिले परंतु त्यानंतर सुद्धा निर्णय दिला नाही.३१ मार्च २०१५ रोजी मुंबई येथे भायखळा राणीबाग ते आझाद मैदान असा सुमारे १५००० ते २०००० हजार संगणकपरिचालकांच्या उपस्थितीत मोर्चा काढला.त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस साहेब व ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी लेखी आश्वासन दिले परंतु त्याची पुर्तता केली नाही.त्यानंतर १५ डिसेंबर २०१५ रोजी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला या मोर्चात सुमारे २२ हजार संगणकपरिचालक सहभागी झाले होते.त्या मोर्चावर १६ डिसेंबर ला ३ वेळा लाठीचार्ज झाला.तो लाठीचार्ज मोडून काढत २२ हजार संगणकपरिचालकानी नागपुरच्या टेकडी रोडवर सुमारे ८ दिवस म्हणजे २२ डिसेंबर पर्यंत ठिय्या आंदोलन केले.त्या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी १५ दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन आंदोलन स्थळावर येऊन दिले.परंतु त्यांनी ते दिलेले आश्वासन पाळले नाही.संग्राम प्रकल्प बंद झाला तरीही नियुक्ती मिळत नव्हती ना शासन निर्णय देत नव्हते त्यावेळी दरम्यानच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस साहेबांनी २ बैठका घेतला परंतु निर्णय दिला नाही.त्यामुळे २५ जुलै २०१६ रोजी मुंबई येथे भायखळा (राणीबाग) ते आझाद मैदान मोर्चा काढला असता सीएसटी जवळ सुमारे ३.५ तास रस्ता जाम केला त्यावेळी “आपले सरकार सेवा केंद्र” या प्रकल्पाच्या माध्यमातून संगणकपरिचालकांचा निर्णय देण्याची घोषणा ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी विधानसभेत केली.परंतु आपले सरकार प्रकल्पात संगणकपरिचालकांची निराशा करून दिल्ली च्या CSC e- Governance Services India Limited या कंपनीला या प्रकल्पाचे ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाने काम दिले ते डिसेंबर २०१६ पासून आजतागायत सुरू आहे.
आपले सरकार प्रकल्पासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करण्यात आल्याने ग्रामपंचायतच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित आपले सरकार सेवा केंद्र व कल्स्टर पद्धत आल्याने अनेक संगणकपरिचालकांना नियुक्ती मिळाली नाही त्यांना बेरोजगार व्हावे लागले तसेच पंचायत समिती स्तरावरील ७०२ व जिल्हा परिषद स्तरावरील १७० संगणकपरिचालक बेरोजगार झाला कारण की आपले सरकार प्रकल्प हा फक्त ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात आला.
CSC–SPV कंपनीने आपले सरकार प्रकल्पात सुमारे ३६०कोटींचा भ्रष्टाचार करून सुद्धा शासनाचे या कंपनीला अभय का ?
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणकपरिचालकांना प्रामाणिकपणे काम करून सुद्धा वर्ष वर्ष मानधन मिळाले नाही तसेच अनेकांचे मानधन या कंपनीने हडप केले.त्याच बरोबर प्रती आपले सरकार केंद्रासाठी दर महिन्याला ४४५० रुपये ग्रामपंचायत कडून गावच्या विकासासाठी असलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतुन csc –spv ला स्टेशनरी व हार्डवेअर – सॉफ्टवेअर व व्यवस्थापनासाठी दिले जातात परंतु या कंपनीने ग्रामपंचायतीना वर्षातून २ पेपर रिम व्यतिरिक्त काहीही दिले नाही.त्यामुळे या डिसेंबर २०१६ ते ऑक्टोबर २०२० या ४६ महिन्याच्या काळात या csc –spv कंपनीने सुमारे ३६० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे.याबाबत अनेक वेळा तक्रार करून सुद्धा शासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेता फक्त कंपनीला अभय देण्याचे काम झाले आहे.एकीकडे कंपनीचा भ्रष्टाचार व दुसरीकडे कंपनीची या प्रकल्पासाठी असलेली मुदत ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेली असताना कोरोंनाचे कारण पुढे करत याच कंपनीला मुदतवाढ दिली आहे.त्याच सोबत या प्रकल्पात भ्रष्टाचार केलेला असताना उमेद योजनेचे काम दिले म्हणजे कंपनीला पूर्णपणे पाठीशी घातले आहे.
आदरणीय मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब आपण आझाद मैदानावर संगणकपरिचालकाना दिलेले वचन विसरलात का ?
साहेब कुठलाही प्रश्न असेल तर तो प्रश्न सहजासहजी सुटत नसेल तर कोणतीही संघटना,एखादा समूह किंवा व्यक्ती हे आंदोलनाचा मार्ग अवलंबतात आणि मायबाप शासनापुढे आपली मागणी मांडतात त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात दिल्लीच्या csc –spv या कंपनीच्या माध्यमातून होत असलेला भ्रष्टाचार,संगणकपरिचालकांची आर्थिक पिळवणूक यासह संगणकपरिचालकानी मागील ९ वर्षापासून संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून केलेल्या प्रामाणिक कामाची दखल घेऊन राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणकपरिचालकांची नियुक्ती आपल्या राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा देऊन करून किमान मासिक वेतन द्यावे यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर २७ ते ३० नोव्हेंबर २०१८ रोजी रात्रंदिवस आंदोलन केले.या दरम्यान तत्कालीन विरोधी पक्षात असलेले व सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले सुमारे डझनभर मंत्री महोदयांनी आमच्या मागणीला व आंदोलनाला पाठीबा दिला व आज सरकार बदलले तरी हे लोक चिडीचूप आहेत.त्यात योगा योगाने का होईना पण आपण २९ नोव्हेंबर २०१८ रोजी आझाद मैदानावर आलात आमची मागणी व आंदोलन पाहिले राज्यभरातून आलेल्या हजारो आंदोलकांना आपण धीर तर दिलाच त्यासोबत आंदोलनाला पाठिंबा दिला,त्याच ठिकाणी लढल्या शिवाय काही मिळत नाही असे आपण म्हणाला होतात आणि महाराष्ट्र आय टी महामंडळात घेण्याचे आश्वासन नाही तर वचन दिले आणि ही मागणी मान्य होई पर्यंत शिवसेना तुमची साथ सोडणार नसल्याचे सांगितले.हे वचन आपण शिवसेनेचे तत्कालीन मंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब,मा.रामदासजी कदम साहेब,मा.सुभाषजी देसाई साहेब,मा.दिपकजी सावंत साहेब,मा.दिवाकरजी रावते साहेब,मा.दिपकजी केसरकर साहेब,मा.दादाजी भुसे साहेब,मा.विजयजी शिवतारे साहेब यांच्यासह अनेक आमदार तसेच हजारो संगणकपरिचालकांच्या समोर दिले आहे.तरीही वचन व आश्वासन न दिल्यासारखे आमचा प्रश्न आपण विसरून गेलात असे आम्हाला वाटत आहे.त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस साहेबांनी विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते ना.धनंजयजी मुंडे साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की येत्या १० दिवसात बैठक घेऊन संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात घेण्याचा निर्णय घेण्यात येईल.त्यांचे १० दिवसाला १० महीने लागले त्यावेळी त्यांनी संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली त्यानुसार ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाने कार्यवाही सुरू केली .त्याचे लेखी रेकॉर्ड ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागात व माझ्याकडे सुद्धा उपलब्ध आहे.
आपल्या सारख्या नेत्यावर आमचा किती प्रचंड विश्वास आहे,आपण दिलेला शब्द व वचन केव्हाच खाली टाकत नाहीत हे आम्हाला माहीत आहे.परंतु सत्ता आल्यावर मी आपल्याला ३ वेळा भेटलो निवेदने दिली आपल्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकार्याना भेटलो पण त्याचा काहीही उपयोग होताना मला दिसत नाही.कारण की आपण आम्हाला आझाद मैदानावर दिलेले वचन विसरलात की काय असे वाटत आहे.जर आमच्या सारख्या ग्रामीण भागात डिजिटल महाराष्ट्राचे काम करणार्या हजारो शेतकरी – शेतमजुरांच्या मुलांच्या आपल्यावर अपेक्षा आहेत आणि विश्वास आहे की आपण आम्हाला न्याय देणार याच साठी जरी कामाच्या व्यापात आपण आम्हाला दिलेले आश्वासन विसरला असाल तर कृपया विसरून न जाता दिलेल्या वचना नुसार आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर काम करणार्या व बेरोजगार झालेल्या सुमारे २३६२२ संगणकपरिचालकांना न्याय द्यावा याच साठी हे खुले पत्र आपणास लिहिले आहे.
धन्यवाद !
आपलाच
सिद्धेश्वर मुंडे ,
राज्यअध्यक्ष
महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना
मो.9604034877