25/08/2026
१४ कोटी खर्चूनही रस्ता खड्ड्यात! वसंतनगरी रस्ते कामातील कथित भ्रष्टाचाराची स्वतंत्र चौकशी करा; ठाकरेंची युवासेना आक्रमक
वसई : वसंतनगरी येथील रस्त्याच्या कामासाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे ₹१४ कोटींच्या निधीच्या वापराबाबत आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे काम आणि शासकीय निधीच्या संभाव्य गैरवापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.युवासेनेच्या शिष्टमंडळाने महापौर मा. अजीवजी पाटील, आयुक्त मा. पृथ्वीराज बी.पी. तसेच विरोधी पक्षनेते मा. मनोजजी पाटील यांची भेट घेऊन याबाबत निवेदन साद केले. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही मागील वर्षी तसेच यावर्षीदेखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने कामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य, प्रत्यक्ष मोजमाप आणि निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात केवळ प्रशासकीय चौकशी न करता स्वतंत्र वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी व तांत्रिक तपासणी करण्यात यावी. तसेच प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, मंजूर अंदाजपत्रक, प्रत्यक्ष कामाचे प्रमाण, ठेकेदारास केलेली देयके, मोजमाप पुस्तिका, बिले आणि गुणवत्ता नियंत्रण अहवालांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.रस्त्याच्या कामात वापरण्यात आलेल्या डांबर, खडी, मुरूम व इतर साहित्याची गुणवत्ता निर्धारित मानकांनुसार होती का, त्यांचे प्रयोगशाळा अहवाल काय आहेत, याचीही चौकशी करण्यात यावी. प्रत्यक्ष कामापेक्षा अधिक काम कागदोपत्री दाखवण्यात आले का, निकृष्ट साहित्य वापरूनही बिले मंजूर करण्यात आली का किंवा मोजमाप व देयकांमध्ये अनियमितता झाली का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सदर कामाशी संबंधित सैतान सिंग या ठेकेदाराची कार्यपद्धती व करारातील अटींचे पालन यांची चौकशी करून काम निकृष्ट असल्याचे निष्पन्न झाल्यास ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करावी, नुकसानभरपाई वसूल करावी तसेच संबंधित अधिकारी, अभियंते व ठेकेदार दोषी आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची तातडीने तांत्रिक पाहणी करून दर्जेदार डागडुजी करण्यात यावी, अशी मागणीही युवासेनेने केली आहे.
“जनतेच्या करातून जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्ता खराब होत असेल, तर या निधीचा हिशोब जनतेसमोर आला पाहिजे. दोषी कोणत्याही स्तरावरील असो, चौकशीत दोष सिद्ध झाल्यास कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
यावेळी युवासेना जिल्हा अधिकारी अतुल मोटे, जिल्हा सचिव प्रतीक जाधव, जिल्हा चिटणीस निशांत बिरजे, जिल्हा समन्वयक रोहन पठारे, वसई उपजिल्हा अधिकारी भरत म्हात्रे, नालासोपारा उपजिल्हा अधिकारी रुपेश चव्हाण, बोईसर उपजिल्हा अधिकारी जयेश पाटील ,भूषण वैती, कौस्तुभ म्हात्रे ,गणेश साठे, ब्रह्मेश सावंत, गौरव झांजे,अमित राणे, प्रथमेश सुर्वे,अर्जुन खैरे, कैलास टोपले यांच्यासह सागर बागले शहर समन्वयक विनित जाधव सहसचिव नालासोपारा ,युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.