28/05/2026
🟩 *कंदुरी ते कुर्बानी... मानली तर हत्या नाही तर श्रद्धा*❓
*...देवाच्या नावाने बळी देत खाणे काय ? आणि अल्हाह साठी बकरे कापून खाणे काय ? दोन्ही अंधश्रद्धाच आहे. विरोधासह प्रबोधन सर्वांचेच करावे लागेल न ? जे मांस खातात ते नैतिकदृष्ट्या विरोध करूच शकत नाही कारण , शेवटी कापतो आणि खातो माणूसच, हे ही आपण समजून घेतले पाहीजे...*
🔸 *बकरी ईद निमित्याने होणा-या 🐐 बोकडांच्या कत्तलीचा आधार घेत दर वर्षी समाजमाध्यमावरून वेगवेगळे संदेश , पोस्ट वायरल करत जनतेमध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती बद्दल गैरसमज निर्माण करण्याचा काहींकडून भेकाड प्रयत्न होत असतो. अशांना सडेतोड व मार्मिक उत्तर देणारा व प्रतिप्रश्न विचारणारा अ.भा.अंनिस युवा शाखेचे महाराष्ट्र राज्य संघटक पंकज वंजारे यांचा अभ्यासपूर्ण लेख*.🔹
➡️ ईद आली की, काहींना एकदम बोकड दिसतात आणि ते समाज माध्यमावरून, *"बघा, ते अंनिसवाले ईदच्या कुर्बानीबद्दल शांत आहेत. फक्त हिंदूच दिसतात त्यांना."* असं बोंबलून अंनिस बद्दल जनसामान्यांपर्यंत चुकीचा संदेश पोहचवतात.
असा प्रयत्न करणारे अंधश्रध्दांचे समर्थन करणारेच असतात. "आम्ही अचिकित्सक आहोत व अखंड अंधश्रध्दांमध्ये लिप्त राहू." असं तर ते अप्रत्यक्ष स्विकारतातच, सोबतच इतर धर्मांबद्दल समाजमनात व्देशही पसरवित विकृत समाधान मिळवतात. या सारख्या व इतर विरोध करणा-या संदेश, पोस्ट, चर्चे मध्ये *अंनिस* असा सर्वसाधारणपणे उल्लेख असतो. तर आधी , *"अंनिस' अशी आहे ?, आणि अंनिस तशी का ?"* असे प्रश्न विचारणा-यांनी आधी *अंनिस* समजून घ्यावी.
इ.स. 1982 पासून संपूर्ण भारतात, जादूटोणा विरोधी कायद्याचे रचनाकार , अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांच्या नेतृत्वात कार्य करणारी लोकचळवळ म्हणजे
1) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती .
या मुळ चळवळीतून फुटून बाहेर पडत डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांनी इ.स. 1989 मध्ये स्थापन केलेली
2) महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती.
अशा दोन संघटना कार्यरत आहे .
आपण ईद चा संदर्भ घेत ' अंनिस ' शब्द वापरत वरील पैकी कोण्या संघटनेला प्रश्न विचारत आहात ? हे आधी निश्चित केलं पाहीजे. तरीही ईदचा संदर्भ देत अ.भा.अंनिस बद्दल निर्माण करण्यात आलेले गैरसमज , अतार्किक दाव्यांचा हिशेब अ.भा.अंनिस च्या भूमिकेतून पुढे घेऊया. *(महाराष्ट्र अंनिसच्या उपक्रमांना घेऊन विचारण्यात येणा-या प्रश्नांची उत्तरे तेच समर्पकपणे देतील. )*
सर्वच आरोप , प्रश्न इथे पोस्ट विस्तारीत होईल, या भीतीने देता येणार नाही. परंतू आपण सुज्ञ वाचक असल्याने, आम्ही दिलेली उत्तरं, स्पष्टीकरण , विचारलेले प्रतिप्रश्न वाचून, कुठला आरोप, प्रश्न पुढच्यांनी केला असेल, हे आपण सहज समजू शकाल, हा विश्वास आहे.
तर मुख्य आरोप हाच की ,
*" ईद ला हजारो बोकडांची कुर्बानी दिली गेली तेव्हा अंनिस कुठे लपून होती... ?"* (यासाठी असभ्य भाषेचा वापर होतो.) अश्या आशयाचा प्रश्न हमखास विचारला जातो. या अशा पोस्ट, संदेशांमध्ये प्रश्न विचारणा-यांचे नाव , पत्ता, मो. क्र. मात्र नसतो. कधी कधी खोट्या नावाने अशा व इतर पोस्ट वायरल केल्या जातात. हे आमच्या तपासणीतून वारंवार स्पष्ट झाले आहे. असं का होत असेल तर , अ.भा. अंनिसच्या कुणी अंगावर आलं तर चळवळ त्याला शिंगावर घेतेच. हे ज्यांना माहीत आहे, असे आपले खरे नाव व मो. क्रमांक लिहूच शकत नाही. अरे , इतकी भीती वाटते ? प्रतिप्रश्नांना घाबरता ? तर पोस्ट वायरल करताच कशाला ? जर तुम्ही प्रामाणिक आहात तर सरळ आम्हाला फोन करा व उत्तर घ्या. आम्ही नाही करू, तुमचे नाव जाहीर. तरीही आम्ही आपल्या समाजमाध्यमावर वायरल होणा-या प्रश्नांचे स्वागतच करतो.
खर तर अंधश्रध्दा समाजात रुजाव्या व अ.भा.अंनिस बद्दल गैरसमज वाढवित, आपल्याला समाजाचे शोषण करता यावे, दोन धर्मात सतत तेड निर्माण व्हावे, त्याचे राजकीय फायदे लाटता यावे, हाच उद्देश ठेवत अशा पोस्ट दर बकरी ईदला मुद्दाम वायरल केल्या जातात. त्यात नवल काहीही नाही. जरा अशा पोस्टची चिकित्सा करूया.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रा. श्याम मानव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात *आमचा देवा - धर्माला विरोध नाही तर, देवा - धर्माच्या नावाने होणा-या शोषणा विरुद्ध ही लोकचळवळ आहे.* ही भुमीका घेऊन समाजात लोकसहभागातूनच यशस्वीपणे *1982 सालापासून* लोकजागृतीचे कार्य संपूर्ण भारतात लढाऊ पद्धतीने करत आहे. चळवळ सर्वच धर्मातील अंधश्रद्धा, चुकीच्या परंपरांना विरोध करत , समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी, संत - महापुरुषांचे विचार प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी लोकशाही मार्गाने कार्य करीत आहे. महाराष्ट्रात बळी प्रथेला संत गाडगेबाबांनी प्रखर विरोध केला आहे. त्यांनी शेकडो गावी देवांच्या नावानी होणारी कोंबड्या - बक-यांची आणि रेड्यांची हत्या कायमची बंद पाडलेली आहे. " ' ईद ' ला बोकडांचा दिल्या जाणार्या बळी प्रथेला विरोध का करत नाही ? फक्त हिंदूंच्याच अंधश्रध्दांवर , बळी देण्यावर बोलता का ? " अशी पोस्ट वायरल करणा-या लोकांनी आता पुढील प्रश्नाचे उत्तर द्यावे. नवस फेडायला , प्रथेप्रमाणे देवी - देवतेला देण्यात येणा-या बळी प्रथेला संत गाडगेबाबांनी कडाडून विरोध केला.
बळी प्रथेला संत कबीर, संत तुकारामांनी विरोध केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर म्हणतात ,
*"देवासि पाहिजे बलिदान ।*
*तो पशू आपुला भ्रम, अभिमान।*
*गावाचे गेल्याविण अज्ञान ।*
*सुखी जीवन न होई ।।"*
ईदची कुर्बानी सांगत आज तुम्ही 'अंनिस' साठी जी विकृत , अतार्किक भाषा वापरता, त्याच भाषेत संत कबीर, संत तुकाराम , संत गाडगेबाबांना विरोध करणार आहात का ? आणि त्यासाठी कोणते शब्द वापरणार आहात ? हिंमत असेल तर वापरून दाखवा. या सर्व संतांसह संत गाडगेबाबांनी हे कार्य केले की नाही, हे तपासायचे असेल तर त्यासाठी *मा. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील मा. प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहीलेले गाडगेबाबांचे 'श्री संत गाडगेबाबा' हे चरित्र आधी वाचावे लागेल* , ते वाचून घ्या.
*सर्वांना माहीत आहे अ.भा.अंनिस बळी प्रथेला विरोध करतेच. मग ती देवाला बळी देणारी कंदुरी असो की , अल्हाहला दिलेली कुर्बानी , दोन्ही सारख्याच. मांस खाणे किंवा शाकाहार करणे हा ज्याच्या – त्याच्या स्वातंत्र्याचा व अधिकाराचा विषय आहे. परंतु एका विशिष्ट धर्मातील लोकच मांसाहार करतात. हा खोटा प्रचार ईदच्या निमित्याने पसरवला जातो.*
वस्तुस्थिती काय आहे तर , मुस्लिम बांधव ईदला बोकड कापतात, आम्ही हिंदू तर वर्षभर विविध ठिकाणी व विवाह इ. प्रसंगी कंदुरी (भाव देण्या) करिता देवी - देवतांसाठी (काही देवळातही बळी दिले जातात. ), दर्ग्यावर बकरे, कोंबडे, रेडा, वराह यांचे बळी देतोच. गटारी , होळी , पोळ्याचा पाडवा आणि गरजे नुसार आपण रोजच कोंबडे - बकरे कापतोच की ? याची आकडेवारी तुम्ही थोडीच काढता ? पण आता काढाच आणि मग बोला . प्राणी हत्या होऊ नये, ही आपली वैयक्तिक भावना त्या मागे असेल, असं मान्य करू पण मग त्यात धर्म कशाला घुसडता ? आमच्या हिंदू देवी - देवतांसाठी बळी देण्यासाठी प्राणी हत्या होतात की नाही ? ते मास कोण खातं ? हिंदू मास खातात की नाही ? तेव्हा कुणाची शेपुट कुठे असते ? आता यावर "ही हिंदूंची श्रध्दा आहे , महान प्राचीन परंपरा आहे." अशी मुर्खमुजोरी तुम्ही कराल का ?
अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराच्या किनारी प्रदेशात राहणा-या हिंदूंच्या दैनंदिन आहारात तुम्हीच सांगा काय असते ? माशांची हत्या प्राणी हत्याच आहे, हे तुम्ही मानता की नाही ? की "तसे नाही, समुद्री जिवांच्या संख्येवर नियंत्रण राहावे म्हणून ते खातात" अस अर्थहीन बोलत मुजोरी कायम ठेवाल ? त्यांच्या रोजच्या आहारातील माश्यांची संख्या किती असते ? शोधा जरा. आता व तेव्हा कोण गप्प असते ? तिथेही बोला आपण ? फक्त दुसर्यांचच बघायचं ?
*"...बघा - बघा त्यांच्या शर्टच्या दोन बटणा तुटल्या आहे ."* अरे पण आपला तर शर्ट फाटलाय ना ? ते आधी आपण शिवूया, नाही तर बदलवून तरी टाकूया. तो बघेल न त्याला - त्याच्या शर्टच्या बटनांच काय करायचं आहे ते. त्या लावायच्या की नाही ते तो ठरवेल. आपण एकदा त्यांना सांगायचं . दुसऱ्याला तेच - तेच बोलायचं न आपला *उघडेपणा* सार्वजनिक करायचा, याला काय अर्थ आहे ?
देवाच्या नावाने बळी देत खाणे काय ? आणि अल्हाहसाठी बकरे कापून खाणे काय ? दोन्ही अंधश्रद्धाच आहे. विरोधासह प्रबोधन सर्वांनचेच करावे लागेल न ? जे मांस खातात ते नैतिकदृष्ट्या विरोध करूच शकत नाही कारण , शेवटी कापतो आणि खातो माणूसच, हे ही आपण समजून घेतले पाहीजे.
*बळीप्रथा प्रबोधनाने आपल्याला थांबवावी लागेल. असे विनाकारण खोटे आरोप करून गैरसमज निर्माण करण्या पेक्षा आपण अ. भा. अंनिसच्या कार्यात सहभागी व्हावं आणि सर्व धर्मातील बळी प्रथेला विरोध करावा ही ,आपणास विनंती.* आपले चळवळीत स्वागत आहे...
✒- *पंकज वंजारे , महाराष्ट्र राज्य संघटक- अ. भा. अंनिस - युवा शाखा* 9890578583
दि. 21 - 07- 21